गणपती – होळीसाठी हजारो एसटी बसेस सोडल्या जातात. एकाच गावचे लोक संपूर्ण बसचे बुकींग करून जातात. कितीही बसेस व रेल्वे गाड्या सोडल्या तरी पुरेशा पडत नाहीत. कोकणात जाणे व येणे ही मोठी दगदग व कसरत असते. खचाखच भरलेल्या बस व रेल्वेतून आणखी किती वर्षे असाच प्रवास करायचा ?
डॉ. सुकृत खांडेकर
या वर्षी गणेशोत्वाच्या काळात एसटी बसेसमधून सहा लाखापेक्षा जास्त कोकणवासियांनी प्रवास केला व एसटी महामंडळाला जवळपास २४ कोटी रूपये उत्पन्न मिळाले असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीच जाहीर केले आहे. गणपती आणि होळी हे कोकणवासियांचे सण म्हणजे सर्वकाही असते. कोकणातील लक्षावधी लोक नोकरी, धंदा, व्यवसायानिमित्त मुंबईत लहानशा खोलीत दाटीवाटीने कसेतरी राहतात. अनेकांची प्रगती झाल्याने त्यांनी स्वत:च्या मालकीचे फ्लॅटही घेतले आहेत. कोकणवासी कितीही श्रीमंत झाले तरी गणपती व होळीला आपल्या गावाची नि घराची ओढ कायम असते. मुंबईत ऑफीसचे कितीही काम असो, घरी कितीही अडचण असो, बसचे किंवा रेल्वेचे तिकीट मिळो किंवा न मिळो, कोकणातील माणूस गणपती व होळीला आपल्या गावी जाणारच. कोकणाने अनेक नेते दिले. निवडून आलेले आमदार खासदार धनाढ्य झाले. अनेक मंत्रीही झाले पण ते सुध्दा गणपती व होळीला आपल्या गावी जातातच. आपल्या गावची व घराची ओढ कशी असते हे कोकणी माणसाकडून शिकण्यासारखे आहे.
गणपती – होळीसाठी हजारो एसटी बसेस सोडल्या जातात. एकाच गावचे लोक संपूर्ण बसचे बुकींग करून जातात. कितीही बसेस व रेल्वे गाड्या सोडल्या तरी पुरेशा पडत नाहीत. कोकणात जाणे व येणे ही मोठी दगदग व कसरत असते. खचाखच भरलेल्या बस व रेल्वेतून आणखी किती वर्षे असाच प्रवास करायचा ? अहमदाबादवरून मुंबईला बुलेट ट्रेन आणतील, वंदे भारत जिकडे तिकडे सुरू करतील, कोस्टल रोड नि समृध्दीमार्ग वेळेपूर्वी तयार करतील पण मुंबई- गोवा महामार्ग चांगला बनविण्यास गेले पंचवीस वर्षे मुहूर्त सापडत नाही. एसटीकडे आता लाल परी नवीन बसेस चांगल्या आहेत, मग कोकणासाठी जास्तीत जास्त का देत नाहीत ? कोकणातील एसटी स्थानकावरील स्वच्छता गृहे स्वच्छ नि चकाचक कधी होणार? स्थानकावरील उपहारगृहाचा दर्जा कधी सुधारणार ? गणपती, होळी नि तुळशीच्या लग्नाला घरी जाण्यासाठी आरामदायी प्रवास मिळू दे एवढीच चाकरमान्यांची अपेक्षा असते.
गेली काही वर्षे राजकीय पक्षांचे नेते कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत विशेष रेल्वे सोडतात. अशावेळी पक्षाचे झेंडे व नेत्यांचे फोटो झळकताना दिसतात. रेल्वे प्रवासात चहा, पाणी, नाष्टा व भोजनही दिले जाते. पण येतानाचा प्रवास तुमचा तुम्ही बघा असे सांगतात. एका बाजुच्या मोफत प्रवासावर कोकणी माणूस खूश असतो. येताना मरणाच्या गर्दीतून घुसमटत येतो.
उत्सवाच्या काळात विशेष रेल्वे गाड्या धावतात. सर्व गाड्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. रेल्वेतील स्वच्छतागृहे तर घाणीने भरलेली असतात, वॉश बेसिनला- टॉयलेटमधे पाणी नसते, गाड्या आठ ते दहा तास उशीरा धावतात, गाड्यांमधे पेस्ट कंट्रोल केले जात नसल्याने उंदीर व झुरळे यांचा मुक्त संचार असतो. प्रवाशांचे सामान कुरतडले जाण्याचे अनेक प्रकार घडतात. लक्झरी बसेसचे दर तर आवाच्या सव्वा असतात. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. कोकणातील रिक्षांची भाडीही तशीच आकारली जातात. मुंबई स्टेशनवरून गावच्या रेल्वे स्टेशनपर्यंतच्या भाड्यापेक्षा किती तरी जास्त पैसे रिक्षाने घरी पोचायला मोजावे लागतात. चाकरमान्यांची वर्षानुवर्षे होणारी घुसमट संपणार कधी ?
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
