तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव
बाप म्हणायचा काढलेली नखं
दारात कधीच नयेत टाकू
दाणे समजून खातात चिमण्या
आणि मरतात आतडी फाटू फाटू
सुगी संपली की बाप
देवळात नेऊन कणसं बांधायचा
सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी
पाण्याचं मडकं बांधून पुण्य साधायचा
पाखरं असल्या तरी ओळखायच्या
बापाच्या मनीचा भाव
तेंव्हा सुगी संपली तरीही
चिमण्या सोडीत नसायच्या गाव
इंद्रजीत भालेराव
