March 28, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Bhakti Movements for spiritual Development
Home » आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग
विश्वाचे आर्त

आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग

भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्गुरूंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तरि झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।।516।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ – तरी या मृत्यूलोकाच्या राहाटीतून झटकन् मोकळा हो, आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की, त्या भक्तीच्या योगानें माझें निर्दोष स्वरुप पावशील.

आत्मज्ञान प्राप्तीचा साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. मनापासून केलेली भक्ती निश्चितच फळाला येते. योगाचा मार्ग हा कष्टदायक आहे. त्यासाठी काही जण संसाराचाही त्याग करतात. वणवण भटकतात. तरीही मनःशांती होत नाही. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी बारा-बारा वर्षे तपश्चर्या करावी लागते. बरेच कष्ट पडतात. शरीराला त्रास होतो. एवढे करूनही आत्मज्ञान मिळेलच, याची खात्री नाही.

अनेक साधू शांतीच्या शोधात हिमालयात जाऊन साधना करतात, पण सध्या खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधात फिरणाऱ्या साधूंची संख्या कमी झाली आहे. संधिसाधूच अधिक आहेत. काही साधूंना आत्मज्ञान प्राप्ती झाली तरीही त्यांचा उपयोग समाजासाठी करणारे फारच कमी आहेत. खडतर तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्तीपेक्षा भक्तीचा मार्ग हा सोपा आहे. सद्गुरूंच्या भक्तीत मन रमवणे सहज शक्य आहे. यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. संसारात राहूनही मुक्ती मिळवता येते.

भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्गुरूंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे. भजन, कीतर्न हे सुद्धा भक्तीचेच मार्ग आहेत. भजन, कीर्तन, निरूपण, पारायण हे ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. यात सद्गुरूंचे स्मरण होते. नुसत्या श्रवणाने सुद्धा येथे मोक्ष सिद्धी होऊ शकते. यासाठी संत सहवासात जाणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांची, गोष्टीची, उपक्रमांची सवय लावून घेणे गरजेचे आहे. यातून मन आनंदी राहते.

चांगल्या गोष्टींची सवय लागायला थोडा वेळ लागतो. मनाला ते लवकर रुचत नाही, पण साधासोपा भक्तीचा मार्ग अवलंबणेच या बदलत्या युगात सोईस्कर आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी सर्वात सोपा मार्ग हा भक्ती हाच आहे.

Related posts

Navratri Biodiversity Theme : राखाडी रंगातील जैवविविधतेची छटा…

साहित्यकणा फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

निसर्गाच्या विचारातूनच निसर्गाचे संवर्धन शक्य

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!