वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून राज्यातील साहित्य तसेच शेती-पाणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारांतर्गत जळगाव येथील वैशाली प्रभाकर पाटील आणि जालना येथील सीमा क्षीरसागर यांची शेती-पाणी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर मुंबई येथील अविनाश उषा वसंत, बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, चंद्रपूर येथील श्रीकांत साव आणि सातारा येथील विठ्ठल खिलारी यांना साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगावचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
प्रत्येक पुरस्कारार्थ्यास २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. साहित्य आणि शेती-पाणी या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा या पुरस्कारामागील उद्देश आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करताना सुप्रिया सुळे यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.राज्यभरातील साहित्य आणि शेती-पाणी क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
निवड समितीत मान्यवरांचा सहभाग
या पुरस्कारांसाठी पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी अशोक जैन,डॉ.जब्बार पटेल,डॉ.प्रज्ञा दया पवार,डॉ.नितीन रिंढे,शंभू पाटील,अजित भुरे आणि पत्रकार रमेश जाधव यांचा समावेश असलेली निवड समिती कार्यरत होती.यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्यावतीने हे पुरस्कार देण्यात येत आहेत. साहित्य, शेती आणि पाणी या क्षेत्रांत समाजाभिमुख काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याबरोबरच कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कार्याची आणि विचारांची स्मृती जपण्याचा प्रयत्न या पुरस्कारांच्या माध्यमातून केला जात आहे.
पुरस्कारार्थी :
शेती-पाणी पुरस्कार: वैशाली प्रभाकर पाटील (जळगाव), सीमा क्षीरसागर (जालना)
साहित्य पुरस्कार: अविनाश उषा वसंत (मुंबई), प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (बुलढाणा), श्रीकांत साव (चंद्रपूर), विठ्ठल खिलारी (सातारा)
