fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 20, 2026
Home » देईल गुरुसेवा…
विश्वाचे आर्त

देईल गुरुसेवा…

Guruseva Dnyneshwari Reading article by Rajendra Ghorpade

एकतरी ओवी अनुभवावी या अनुभवाने एक एक ओवी आपणाशी गप्पा मारू लागते. तसा बोध ज्ञानेश्वरी देत राहाते. त्या बोधातून, अनुभवातून, अनुभुतीतून आपण आपली आध्यात्मिक प्रगती साधायची असते. ही गुरुसेवा निश्चितच आपणाला ज्ञान देणार आहे हा विश्वासही यातून मिळतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।। 167।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळते या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात.

ज्ञानेश्वरी वाचनाने काय होणार ? हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पारायणे हजार केली, पण अद्याप काही बोधच झाला नाही. असेही म्हणाणारे खूप आहेत. वाचनाने निश्चितच ज्ञान प्राप्त होते. फक्त आपले अवधान वाचनावर असायला हवे. हे कोणी विचारातच घेत नाही. नुसते घोकमपट्टी करून गुण मिळतात, पण तो विषय समजत नाही. विषय समजून घेण्यासाठी त्या विषयाच्या अंतरंगात जावे लागते. त्याचे विविध पैलू अभ्यासावे लागतात. मग त्या विषयाची गोडी निश्चितच लागते. वर वर विषय वाचून तो समजणार नाही. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सुद्धा हेच आहे.

सद्गुरुंनी सेवा म्हणून ज्ञानेश्वरी वाचण्यास सांगितले. ज्ञानेश्वरी समजण्यास इतकी सोपी नाही हे सर्वांनीच सांगितले होते. पण एकदा समजल्यानंतर किंवा त्यातील बोध होण्यास प्रारंभ झाल्यानंतर त्यापासून दूर जाणेही तितके सोपे नाही. हे विचारात घेण्यासारखे आहे. सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सेवा म्हणून ज्ञानेश्वरी पारायणे सुरु झाली. पण नुसतेच वाचन होत होते. काही ओव्या तोंडपाठ सुद्धा झाल्या, पण त्याचा बोध मात्र कोठे होताना दिसत नव्हता. गुरुंची आज्ञा सेवा म्हणून हे कार्य सुरु राहीले. नंतर लक्षात आले की आपण वाचतो कि वाचन कोणी तरी करुन घेत आहे. ओवी आपोआप येत राहाते. वाचताना पुढची ओवी कोणती आहे हे पाहावे लागत नाही ती आपोआपच तोंडात येते. याचाच अर्थ वाचन मी करत असलो तरी सुचवणारे कोणी तरी दुसरे आहे. तो मी नाही. हा बोध होऊ लागतो. हळूहळू एकएक ओवी मनात उतरायला लागते. आपोआपच ती ओवी आपल्याशी बोलायला लागते. ज्ञानेश्वरी वाचावी लागत नाही, तर ज्ञानेश्वरीच वाचायला लागते. आपोआप शब्द बोध उमटायला लागतात. बोध व्हायला लागतो. प्रत्येक ओवी आपणाला काही तरी उपदेश देऊन जाते. आपणाला जागे करते. त्यामुळे साहजिकच ज्ञानेश्वरी आपलीशी वाटू लागते.

दिवसभरात घडणाऱ्या घटनाक्रमाचा सुद्धा वाचणात बोध होऊ लागतो. कुठे चुकतो याची जाणीवही त्यातून व्हायला लागते. चुक समजून देणे हे गुरुंचे काम आहे, पण चुक सुधारणे हे आपले काम आहे. तो आपला धर्म आहे. हे विचारात घ्यायला हवे. तरच आपली आध्यात्मिक प्रगती होत राहाते. गुरुंनी पारायणाची सेवा सांगितली. पण पारायण आपल्याकडून ते करवून घेऊ लागले. इतकेच काय अनुभुतीतून त्यामध्ये त्यांनी गोडी निर्माण केली. कशी समजेल मला ज्ञानेश्वरी या प्रश्नाचे उत्तर सद्गुरुंकडून ज्ञानेश्वरी वाचनातून मिळणाऱ्या बोधातून मिळते.

एकतरी ओवी अनुभवावी या अनुभवाने एक एक ओवी आपणाशी गप्पा मारू लागते. तसा बोध ज्ञानेश्वरी देत राहाते. त्या बोधातून, अनुभवातून, अनुभुतीतून आपण आपली आध्यात्मिक प्रगती साधायची असते. ही गुरुसेवा निश्चितच आपणाला ज्ञान देणार आहे हा विश्वासही यातून मिळतो. यातूनच आत्मज्ञानाची वाट सुकर होते. गुरुंची सेवा निश्चितच फलद्रुप होते. ती फलद्रुप करणारेही गुरुच आहेत. यासाठी गुरुसेवा निरंतर घडावी हीच सद्गुरु चरणी प्रार्थना.  

Related posts

एकतरी ओवी अनुभवावी हे यासाठीच…

प्राणाची चैतन्याशी एकरूपता

ते तुझिये गुरूकृपादृष्टी । निर्विष होय ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!