March 21, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Dnyneshwair Spiritual article by Rajendra Ghorpade
Home » आत्मज्ञानी शिष्य व्हावा यासाठीच संग्राम
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानी शिष्य व्हावा यासाठीच संग्राम

मादुगरी मागूण स्वतःची आत्मज्ञानी शिष्यांसाठीची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता ते घडवत असतात. मन स्वच्छ असेल तर त्यात उत्पन्न होणारे विचारही स्वच्छ असतात. अशा स्वच्छ विचारांनी, आचारांनी शिष्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू असते. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

अर्जुना तुझें चित्त । जऱ्ही जाहलें द्रवीभूत ।
तऱ्ही हे अनुचित । संग्रामसमयीं ।।183।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा 

ओवीचा अर्थ – अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. 

जगात स्वयंघोषित महाराज गल्लोगल्ली आढळतात. जनता सुद्धा त्यांच्या नादात फसते. राजकीय नेतही अशा महाराजांच्या आश्रयाला असतात. जे खरे संत असतात. ते आत्मज्ञानी असतात. ते स्वतःला कधीच महाराज म्हणवून घेत नाहीत किंवा तसल्या फंदातही पडत नाहीत. ते कर्माने संत होतात. कर्मच त्यांना हे देवत्व देते. यासाठी त्या कर्माला महत्त्व आहे. 

हे कर्म कर असे सद्गुरू शिष्याला शिकवतात व शिष्याला गुरुपदावर नेऊन ठेवतात. हीच परंपरा आजपर्यंत अध्यात्मात सुरू आहे. सद्गुरू झाल्यानंतर असे आत्मज्ञानी शिष्य घडविणे हेच त्यांचे कर्म असते. शिष्याला ते यासाठी प्रेरित करत असतात. हा लढा देण्यासाठी शिष्याला ते प्रोत्साहित करत असतात. हा युद्धाचा प्रसंग आहे. अशावेळी अनेक आमिषे, मोह माया यांचा मारा होत असतो. त्यातून या शिष्याला सावरण्याचा, त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला सद्गुरू हे देत असतात. विषयामध्ये गुंतलेल्या शिष्याला आत्मज्ञानाच्या लढ्यासाठी उभे करण्यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करत राहतात.

बाहेर पडणे म्हणजे मनाने या गोष्टीबाबत विरक्त होणे. पाय जमिनीवर ठेवून वागणे. सत्कर्म करत राहणे. सौजन्य पाळणे. पण हे सहज शक्य होत नाही. यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मनाचा दृढ निश्चय करावा लागतो. चूक प्रत्येकाकडून होत असते. पण ती सुधारता येणे गरजेचे आहे. सुधारत राहणे यातच खरी प्रगती आहे. सद्गुरू ही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिष्याची प्रगती हेच गुरूचे आद्य कर्तव्य असते. 

शिष्याच्या मनात सुधारणा घडवणे. त्याच्या बोलण्यात, वागण्यात सौजन्य उत्पन्न करणे हेच त्यांचे ध्येय असते. मनाला बळकटी सद्गुरू देत असतात. भोंदू साधू हे करत नाहीत. शिष्यांचे शोषण हेच त्यांचे ध्येय असते. पण जनता येथेच फसते. गुरू कसा असावा हे यासाठीच समजून घेणे गरजेचे आहे. गुरू कोणाला करावे ? गुरू कोणाला म्हणावे ? आध्यात्मिक गुरूचे कर्तव्य काय आहे. हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या शिष्याच्या शोधात असतात. यासाठी त्यांचा संग्राम सुरू असतो. यासाठी त्यांनी चळवळ उभी केलेली असते. तेच कर्म ते करत असतात. 

मादुगरी मागूण स्वतःची आत्मज्ञानी शिष्यांसाठीची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता ते घडवत असतात. मन स्वच्छ असेल तर त्यात उत्पन्न होणारे विचारही स्वच्छ असतात. अशा स्वच्छ विचारांनी, आचारांनी शिष्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू असते. अशा शिष्यास आत्मज्ञानाच्या वाटा सापडतात. तो ठेवा तो सर्वोच्च आनंद त्याला प्राप्त होतो. यासाठी त्याचा हा लढा सुरू असतो.  शिष्याला आत्मज्ञानी करणे अन् आपल्या पदी बसवणे यासाठी त्यांचा लढा सुरु असतो. जरी ते समाधीस्थ झाले तरी त्यांचा लढा सुरु असतो. कारण त्यांची समाधी ही संजिवन समाधी असते. शिष्याला अनुभूतीतून आत्मज्ञानी करणे हेच त्यांचे कार्य अखंड सुरु असते. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

विमान अपघाताच्या शोधात दौंड्या डोंगरात भटकंती

निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच

मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!