नांदेड : आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड यांच्या वतीने आयोजित ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार – २०२६’ चे तिसरे वर्ष यंदा साजरे होत असून, यासाठी राज्यभरातील नवोदित व प्रतिभावंत साहित्यिकांकडून साहित्यकृती मागविण्यात येत आहेत.
दि. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृती या पुरस्कारासाठी पात्र असतील. कवितासंग्रह, कादंबरी, कथा/ललित, चरित्र/आत्मचरित्र, वैचारिक/समीक्षा या पाच वाङ्मयप्रकारांपैकी केवळ एका प्रकारातील एकच साहित्यकृती पाठविता येणार आहे. या पाचपैकी एका साहित्यकृतीस मुख्य पुरस्कार प्रदान केला जाणार असून, उर्वरित चार प्रकारांतील प्रथम क्रमांकाच्या साहित्यकृतींना विशेष सन्मान देण्यात येईल.
या पुरस्काराअंतर्गत मुख्य पुरस्कार म्हणून निवड झालेल्या एका साहित्यकृतीस रु. ५,०००/- रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित चार वाङ्मयप्रकारांतील गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाच्या साहित्यकृतींना विशेष सन्मान म्हणून प्रत्येकी रु. २,०००/- रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारी साहित्यकृती संबंधित वाङ्मयप्रकारातील लेखकाची पहिलीच प्रकाशित कृती असणे आवश्यक आहे. (उदा. पहिला कवितासंग्रह, पहिली कादंबरी इ.) याबाबत शपथपत्र जोडणे बंधनकारक आहे. प्रत्येक साहित्यकृतीच्या दोन प्रती अंतिम तारखेपूर्वी पाठवाव्यात. परीक्षणासंबंधीचे सर्व हक्क संयोजकांकडे राखीव असतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख १० मे २०२६ असून, साहित्य पुढील पत्त्यावर पाठवावे :
संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार,
द्वारा डॉ. माधव जाधव, ६, ‘कुळवाडी’, साईनगरी, तरोडा पो. ऑ., काबरानगर जवळ, वाडी (बु.), नांदेड – ४३१६०५.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी : ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
