January 24, 2025
The ego of self is removed only through the feeling of breath
Home » श्वासाच्या अनुभूतीतूनच दूर होतो मीपणाचा अहंकार
विश्वाचे आर्त

श्वासाच्या अनुभूतीतूनच दूर होतो मीपणाचा अहंकार

आपण म्हणतो मी हे करतो. मी ते करतो. श्वसनाची क्रिया कोण करते ? ही तर नित्य सुरु असते. हे कर्म तर नित्य सुरुच आहे. म्हणजेच ही क्रिया आपणाला शरीरापासून वेगळी आहे ही अनुभूती देते. श्वासोच्छस्वासाच्या आकलनाद्वारे थेट याची जाणीव होते. यासाठीच श्वासाची साधना आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जें श्वासोच्छवासवरी । होत निजेलियाही वरी ।
कांही न करणेचि परी । होती जयाची ।। २२५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – जे स्वाभाविक कर्म श्वासोच्छवासाच्यारुपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न करण्यातही सारखा चालूच असतो.

श्वास हे नित्य कर्म, स्वाभाविक कर्म आहे. आपण झोपल्यानंतरही आपला श्वास सुरुच असतो. श्वास आत येतो आणि बाहेर जातो. आत येताना तो शुद्ध म्हणजे ऑक्सिजन रुपात असतो तर बाहेर पडताना तो अशुद्ध अर्थात कार्बनडायऑक्साईडच्या रुपात असतो. ही क्रिया नित्य सुरु असते. या श्वसनाच्या क्रियेमुळेच आत्मा हा शरीरात राहातो. ही क्रिया बंद होते तेव्हा आत्मा हा आपल्या शरीरातून निघून जातो. यासाठीच श्वसनाच्या या क्रियेला महत्त्व आहे. शुद्ध आहे ते घ्या अन् अशुद्ध आहे ते बाहेर सोडा. हे नित्य सांगणे या क्रियेत सुरु असते. जो पर्यंत शुद्ध हवा आत येत राहाते तो पर्यंत आत्मा हा आतमध्ये राहातो. अशुद्ध हवेमुळे त्याला गुदमरल्यासारखे होते. अशुद्ध हवेतर राहीला तर तो गुदमुरून मरूनही जातो. अर्थात आत्मा त्या शरीरातून बाहेर पडतो. शुद्ध अर्थात चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा. अशुद्ध अर्थात वाईट गोष्टी सोडून द्या हेच नित्य सांगणे आपणास श्वासाच्या साधनेतून केले जाते.

आपण म्हणतो मी हे करतो. मी ते करतो. श्वसनाची क्रिया कोण करते ? ही तर नित्य सुरु असते. हे कर्म तर नित्य सुरुच आहे. म्हणजेच ही क्रिया आपल्या शरीरापासून वेगळी आहे ही अनुभूती देते. श्वासोच्छस्वासाच्या आकलनाद्वारे थेट याची जाणीव होते. यासाठीच श्वासाची साधना आहे. सोहमची साधना आहे. या साधनेतूनच शरीर आणि आत्मा वेगळा असल्याची अनुभूती येते. मी आत्मा आहे. याचे आत्मज्ञान आपणास होते. नित्य अनुभूतीने मग आपणास आत्मज्ञानाची प्राप्ती होते. नित्य सोहम साधनेतून ही अनुभूती येते. यासाठी चालता, बोलता, उठता, बसता सर्व क्रियात श्वासाची जाणीव, अनुभूती नित्य ठेवायला हवी. यातूनच मीपणाचा अहंकार जाऊन ज्ञानाची प्राप्ती होते.

श्वासाच्या क्रियेवर अनेक पातळ्यावर संशोधन झालेले आहे. एका मिनिटामध्ये १८ वर्षापेक्षा अधिक वयाची व्यक्ती ही कमीत कमी १२ ते २० वेळा श्वास आत घेते अन् बाहेर सोडते. पण अठरा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती ही ३० ते ६० वेळा श्वास आत घेते अन् बाहेर सोडते. मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्यावर श्वासाचे परिणाम होत असतात. साधनेमुळे मनाची प्रसन्नता वाढते. ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे श्वासाच्या क्रियेमध्ये मोठा बदल होतो. राग आल्यानंतर आपला श्वास हा जोरात सुरु असतो. पण आपण श्वासावर नियंत्रण मिळवू शकलो तर आपण आपल्याला आलेल्या रागावरही सहज नियंत्रण मिळवू शकतो. काम, क्रोध, भावना यावरही आपण श्वासावरील नियंत्रणामुळे मर्यादेत ठेऊ शकतो. साहजिकच आपली मानसिक स्थिती सुधारण्यावर साधनेमुळे मदत होते. यातूनच आत्मसाक्षात्कार होतो. यासाठीच सोहम साधना ही महत्त्वाची आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading