कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३वे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाची खासियत म्हणजे ते आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे असून सर्व विद्या शाखांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
कोकणात प्रथमच या स्तरावर इतिहास परिषदेचे आयोजन होत असून, त्यामुळे अभ्यासकांना शैक्षणिक वातावरणासोबत कोकण व गोवा पर्यटनाचीही सुवर्णसंधी मिळणार आहे. या परिषदेत भाषा, सामाजिक शास्त्रे, अर्थशास्त्र, भूगोल, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान यांसह कायदा, व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विषयांवरील संशोधननिबंध स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे सर्व विषयांतील विद्वानांना आपापल्या संशोधन प्रवाहांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
परिषदेसाठी संशोधन निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. हे निबंध ईमेलद्वारे (kckconference@gmail.com) पाठवावेत. सादर केलेले सर्व शोधनिबंध विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त मासिकात प्रकाशित करण्यात येतील आणि परिषदेदरम्यानच सहभागींना त्या अंकाची प्रत देण्यात येईल.
परिषदेचे शुल्क प्राध्यापकांसाठी १५०० रुपये तर विद्यार्थ्यांसाठी ७०० रुपये आहे. सहभागींना शोधनिबंध पत्रिकेची ई-प्रत दिली जाईल; मात्र हार्ड कॉपी आवश्यक असल्यास अतिरिक्त ५०० रुपये शुल्क आकारले जाईल.
विविध शैक्षणिक शाखांतील विषयांमध्ये संत साहित्य, लोकनाट्य, अभिजात भाषा व साहित्य, आर्थिक सिद्धांत, वित्तीय व्यवस्थापन, पर्यावरण, जागतिकीकरण, ग्रामीण विकास, स्त्रीवाद, आंबेडकरी इतिहास, विज्ञान संशोधन, स्थापत्य तंत्रज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान अशा विस्तृत विषयांचा समावेश आहे.
अधिवेशनाचे प्रमुख समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम (मो. ९४२३७३१३८२), ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर (मो. ९४२११४४५३१) आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ. बी. एल. राठोड (मो. ९८२२३४८८५५) यांनी अभ्यासकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अधिवेशनाच्या माध्यमातून संशोधकांना नवे विचार, संशोधनाच्या दिशा, आणि विविध विषयांतील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कोकणातील हे अधिवेशन केवळ इतिहासकारांसाठी नव्हे, तर सर्व शाखांतील अभ्यासकांसाठी ज्ञानसंवाद आणि संशोधनाचा उत्सव ठरणार आहे.
