▪️चपराक प्रकाशनची निर्मिती
▪️कोरोना काळातील लेख संग्रह
संगमेश्वर – कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२३-२४ चे वाड:मयीन पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये लोवले संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या पुणे येथील चपराक प्रकाशित ‘ अक्षरयात्रा ‘ या लेखसंग्रहास द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
अक्षरयात्रा हे जे. डी. पराडकर लिखित सहावे पुस्तक पुणे येथील चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुठ्ठा बांधणी आणि २५६ पानांचे तयार केले. या पुस्तकाचे प्रकाशन पुणे पुस्तक महोत्सवात खासदार सुप्रिया सुळे, महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, संपादक घनश्याम पाटील यांच्या हस्ते झाले होते.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट यांनी तर नावाची रचना कोल्हापूर येथील निर्मितीचे अनंत खासबागदार यांनी, प्रस्तावना सोलापूरचे लेखक समीर गायकवाड, पाठराखण मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. सतीश डिंगणकर यांनी देखील या पुस्तकासाठी मोलाचे सहकार्य केले.
कोकणातील व्यक्तिमत्व, चालिरिती, परंपरा, पर्यावरण, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर लेखन करणाऱ्या संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांची चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी आजवर दहा पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अक्षरयात्रा या पुस्तकात पराडकर यांनी कोरोना काळात सलग १०० दिवस लिहिलेल्या १०० ललित लेखापैकी ६४ लेखाचा समावेश आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेने जे. डी. पराडकर यांच्या लेखनाचा गौरव केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराबद्दल जे. डी. पराडकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद आणि घनश्याम पाटील संपादक चपराक प्रकाशन यांना धन्यवाद दिले आहेत.
जे. डी. पराडकर यांचे ‘अक्षरयात्रा’ हे ‘चपराक’ तर्फे प्रकाशित होणारे पाचवे पुस्तक आहे. कोकण म्हणजे सुंदर निसर्ग, अंतर्मनाला साद घालणारी बोली भाषा, येथील चालीरीती-परंपरा हे सारंच अद्भूत आहे. पराडकर यांनी आपल्या ३२ वर्षांच्या लेखन प्रवासात कोकणची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या लेखणीतून कोकण केवळ वाचायला मिळते असे नव्हे तर ते डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पराडकर यांच्या लेखणीत आहे. छोटे-छोटे विषय हलक्या फुलक्या शब्दात वाचकांसमोर उलगडताना वाचकही या विषयात समरस होऊन जातो.
कोरोनाचा सामना करताना लॉकडाऊनचा कालावधी म्हणजे प्रत्येकाला काळजी वाटणारा, भीतीदायक आणि कंटाळवाणा ठरत होता. अशावेळी घरी असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या लेखणीतून तणावमुक्त करण्यासाठी पराडकर यांनी २७ मार्च २०२० ते ५ जुलै २०२० या कालावधीत सलग शंभर दिवस १०० लेख लिहून वाचकांसाठी आपली लेखनसेवा रुजू केली. हे लेख वाचकांना नवचैतन्य देणारे ठरले. एका शब्दावरून विस्तृत लेख लिहिण्याची जे. डी. यांची खासियत आहे. लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या १०० लेखात त्यांचे सारे लेखनकौशल्य अनुभवायला मिळाले. आपले लेखन आपल्यासह वाचकांनाही आनंद देत राहावे हा त्यांचा उद्देश नक्कीच अभिनंदनीय आहे. ‘अक्षरयात्रा’ या पुस्तकात त्यांनी निवडक लेखांचा समावेश केला आहे.
– एस. एम. देशमुख, मुख्य विश्वस्त
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
