कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तेलबिया पिकांच्या शाश्वत वाढीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने भुईमूग आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांची अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचे १०० टक्के मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच काढणीपश्चात पायाभूत सुविधांसाठीही विविध अनुदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तेल काढणी युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
सुरक्षित साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी ५० टक्के किंवा कमाल १४.४० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मिनी ऑईल मिल किंवा एक्सपेलर युनिटसाठी फिल्टर प्रेससह कमाल ४ लाख रुपये, तर फिल्टर प्रेसशिवाय युनिटसाठी कमाल ३ लाख रुपयांपर्यंत (किंमतीच्या ४० ते ५० टक्के) अनुदान मिळणार आहे.
सन २०२६-२७ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आल्याने महिला शेतकऱ्यांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या MahaDBT पोर्टल वर त्वरित अर्ज सादर करावेत. या योजनेचा लाभ “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” (FCFS) या तत्त्वावर दिला जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅक (Agristack) आयडीद्वारे करण्यात येणार आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), FPO, SHG तसेच इतर गटांनीही अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
