मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता असली तरी कमी पावसामुळे भात रोपवाटिकेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १५ ते ३० दिवसांच्या महत्त्वाच्या कालावधीत तण नियंत्रण, गिरीपुष्पाच्या पाल्याद्वारे आच्छादन आणि आवश्यकतेनुसार संरक्षणात्मक सिंचन करून रोपवाटिका निरोगी व जोमदार ठेवण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस, सिंधुदुर्ग🌾
भात रोपवाटिकेची घ्यावयाची काळजी
मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार दि. 13 ते 17 जून या कालावधीत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच उगवून स्थिर झालेल्या भात रोपवाटिकेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
✅ तण नियंत्रणावर भर द्या
भात रोपवाटिकेमध्ये 15 ते 30 दिवसांचा कालावधी हा तण-पिक स्पर्धेचा महत्त्वाचा काळ असतो. या कालावधीत तणांचे नियंत्रण न केल्यास मृदेतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये तणांकडून शोषली जातात. परिणामी रोपांची वाढ खुंटून रोपवाटिका निकृष्ट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर तण काढून रोपवाटिका तणमुक्त ठेवावी.
✅ ओलावा संवर्धन करा
गादीवाफ्यावर तयार केलेल्या रोपवाटिकेमध्ये मोकळ्या जागी गिरीपुष्पाच्या पाल्याचे आच्छादन (Mulching) करावे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
✅ संरक्षणात्मक सिंचन द्या
कमी पावसामुळे रोपांची वाढ मंदावत असल्यास आणि पाण्याची उपलब्धता असल्यास रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन द्यावे. यामुळे रोपांची वाढ चांगली होऊन निरोगी रोपे तयार होतात.
🌱तण नियंत्रण, ओलावा संवर्धन आणि वेळेवर सिंचन यामुळे भात रोपवाटिका निरोगी व जोमदार राहते.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
9423300762 / 9422449018
कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस, सिंधुदुर्ग
