महाराष्ट्राच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या तंजावरच्या मातीत मराठी संस्कृतीचा दीप चारशे वर्षांहून अधिक काळ अखंड तेवत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी दक्षिणेत उभारलेल्या मराठी सत्तेने केवळ राजकीय इतिहास घडविला नाही, तर मराठी भाषा, साहित्य, संगीत, नाट्य, कला, शिक्षण आणि ज्ञानपरंपरेला नवे क्षितिज दिले. मराठी आणि तामिळ संस्कृतीच्या या अनोख्या संगमातून निर्माण झालेले तंजावर म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे दक्षिणेतील एक तेजस्वी प्रतिबिंबच. युद्ध, राजकीय उलथापालथ आणि अस्थिरतेच्या काळातही मराठीपणाची ज्योत जपणाऱ्या या भूमीची गाथा आज नव्याने समजून घेण्याची गरज आहे. तंजावरच्या मराठा राजांच्या बहुआयामी योगदानाचा मागोवा घेणारा ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ हा ग्रंथ याच विस्मृत वैभवाची दारे महाराष्ट्रातील वाचकांसाठी पुन्हा उघडतो. या पुस्तकासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावना लिहीली आहे. ती अशी...
तंजावर ही केवळ एक ऐतिहासिक नगरी नाही,तर मराठी संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचे दक्षिणेतील तेजस्वी प्रतीक आहे.चारशे वर्षांहून अधिक काळ मराठी अस्मिता,कला,साहित्य,संगीत आणि सामाजिक मूल्ये जतन करणारी ही यक्षनगरी महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक ऐक्याची जिवंत साक्ष ठरली आहे.मराठ्यांच्या तंजावरमध्ये आगमनाने केवळ राजकीय सत्तेचे हस्तांतरण झाले नाही,तर मराठी आणि तामिळ संस्कृतींच्या सुंदर संगमातून एका वैभवशाली संस्कृतीचा उदय झाला.या समृद्ध परंपरेमुळेच तंजावरला पूर्वेचे व्हेनिस आणि दक्षिणेचे एडन अशा गौरवपूर्ण उपमा प्राप्त झाल्या.
महाराष्ट्रात युद्ध,अस्थिरता आणि धामधुमीचा काळ सुरू असताना, महाराष्ट्रापासून कित्येक मैल दूर असलेल्या तंजावरने मराठी संस्कृतीचा दीप अखंड प्रज्वलित ठेवला. मराठी भाषा, साहित्य, कला आणि सामाजिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे जे अद्वितीय कार्य तंजावरने केले,ते भारतीय सांस्कृतिक इतिहासातील एक विलक्षण पर्व मानावे लागेल.
तंजावरच्या मराठा राजांचा दरबार विद्वान,कलावंत आणि अभ्यासकांनी सदैव गजबजलेला असे.राज्यकर्ते स्वतः विद्वान,कलाप्रेमी आणि दूरदृष्टीचे होते. परिणामी मराठी वाङ्मय, नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला आणि शिल्पकलेला अभूतपूर्व चालना मिळाली. या सांस्कृतिक उत्कर्षाचे संपूर्ण श्रेय तंजावरच्या मराठा राजांना जाते.
तंजावर म्हटले की, मराठी मनाला सर्वप्रथम आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे उपाख्य एकोजी राजे भोसले. व्यंकोजी महाराजांनी दक्षिणेत स्थापन केलेले हे मराठी राज्य पुढे तब्बल १८० वर्षे टिकले.इसवी सन १६७६ ते १८५६ या कालखंडात तेरा मराठी राजांनी तंजावरच्या मराठी सत्तेचा आणि संस्कृतीचा दीप तेवत ठेवला.या उदार,व्यासंगी आणि संस्कृतिप्रिय राज्यकर्त्यांनी तंजावरच्या प्राचीन सांस्कृतिक वारशात मराठीपणाची भर घालून त्याला अधिक समृद्ध केले.
तंजावरच्या राजसत्तेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जनकल्याणवादी दृष्टिकोन.बृहदीश्वर मंदिरातील भिंतींवर कोरलेला मराठी रियासतीचा इतिहास असो,अथवा शिक्षण आणि ज्ञानसंवर्धनासाठी उभारलेली भव्य ग्रंथसंपदा, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रगल्भ विचारांची साक्ष दिसून येते. मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करून स्त्री शिक्षकांची नेमणूक करणे, भूगोल आणि इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचे मराठी व तामिळ भाषांतर करणे, विज्ञान, वेदशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत आणि शिल्पकला यांसारख्या विषयांचे अध्यापन सुरू करणे, या सर्व गोष्टी त्या काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या होत्या. सतराव्या शतकात शिक्षणाचा असा सर्वसमावेशक विचार करणे, हे तंजावरच्या राजघराण्याच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे.
दस्तावेजीकरणाची परंपरा हे देखील तंजावरच्या मराठा राज्याचे वैशिष्ट्य होते.दरबारातील कामकाजाच्या नोंदी,फ्रेंच आणि मराठी भाषेतील पत्रव्यवहार, विविध राजकीय व सांस्कृतिक दस्तावेज अत्यंत जतनपूर्वक संग्रहित करण्यात आले.या ऐतिहासिक दस्तावेजीकरणाची दखल ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’सारख्या जागतिक संदर्भग्रंथानेही घेतली आहे.
तंजावरच्या मराठा राजांच्या या बहुआयामी कार्याचा परिचय व्यापक समाजाला करून देण्यासाठी प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘Contributions of Tanjavur Maratha Kings’ या ग्रंथाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आता हा महत्त्वपूर्ण ग्रंथ मराठीत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प अत्यंत स्वागतार्ह आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. डॉ. मनोहर इंगळे यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले “तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान” हे मराठी रूपांतर महाराष्ट्रातील वाचकांना दक्षिणेतील मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास नव्याने उलगडून दाखवेल.
हा ग्रंथ केवळ तंजावरच्या मराठी राजांचा गौरव करणारा नाही, तर दक्षिण भारतातील विस्तारित मराठी समाजाशी सांस्कृतिक नाळ अधिक दृढ करणारा एक सशक्त पूल आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक संवाद, परस्पर आदर आणि ऐतिहासिक बंध अधिक बळकट करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. इतिहास संशोधक, विद्यार्थी आणि संस्कृती-अभ्यासक यांच्यासाठी हा ग्रंथ निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असा दृढ विश्वास वाटतो.
पुस्तकाचे नाव – तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान
लेखक – डॉ. मनोहर इंगळे
प्रकाशक – डायमंड पब्लिकेशन
किंमत – ३०० रुपये
