विश्लेषण
जून २०२२ मधे ठाकरेंच्या शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार कोसळले. स्वत: उद्धव यांना वर्षा सोडून मातोश्रीवर अडिच वर्षात परत यावे लागले. त्याचे बक्षिस भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. अगोदर अडिचवर्षे मुख्यमंत्री व आता देवाभाऊंच्या महायुती सरकारमधे उपमुख्यमंत्रीपदावर असलेले शिंदे भाजपला उपयुक्त आहेत. गेल्या चार वर्षापासून शिंदे विरूध्द ठाकरे चालू असलेला संघर्ष आजही कायम आहे हेच दोन ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या दोन स्वतंत्र दसऱ्या मेळाव्यावरून स्पष्ट झाले.
डॉ. सुकृत खांडेकर
शिवसेनाप्रमुख हयात असताही शिवसेनेत फूट पडली होती. पण शिवसेनाप्रमुखांचा दरारा जबर होता. आता उद्धव यांचा दरारा नाही, धाकही नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेला उठाव ते विसरू शकत नाहीत. आपला पक्ष फोडला, पळवला, पक्षाचे चिन्ह चोरले, त्यांच्या बंडामुळेच आपले मुख्यमंत्रीपद गेले ही भावना उद्धव यांच्या मनात कायमची घर करून बसली आहे. दुसरीकडे आपणच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे खरे शिलेदार आहोत, असा दावा शिंदे करीत आहेत. उद्धव यांनी हिंदुत्वाचा विचार सोडून पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला असा आरोप ते सातत्याने करीत आहेत. शिंदे व ठाकरे यांचे स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. दोन्ही नेते एकमेकांना आपल्या राजकीय हल्ल्याचे टार्गेट करीत करीत आहेत.
यावर्षीचा उबाठा सेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को इन डोअर स्टेडियममधे झाला. उबाठा सेनेचा मेळावा पावसात उघड्यावर पार पडला. पावसामुळे शिंदे यांनी शिवसैनिकांची काळजी घेत तो बंदिस्त स्टेडियममधे घेतला. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुगारून बंडाचा झेंडा फडवणारे शिंदे हे सत्तेत आहेत तर ठाकरे हे सत्तेविना आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईने उबाठासेनेच्या शाखांचे जाळे मुंबई, ठाणे , कोकण, राज्यात सर्वत्र आहे. पण सत्ता गेल्यापासून पक्षाचे सारे नेटवर्क दिशाहिन झाले आहे. शिंदे हे सत्तेत असले तरी ठाणे वगळता अन्यत्र शाखांच्या माध्यमातून पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष झाले आहे. रामदास कदम, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रताप सरनाईंक, नीलम गोऱ्हेंसह शिवसेनेचे बहुसंख्य दिग्गज, मात्तबर आणि सशक्त नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बरोबर आहे. दहा मंत्री सरकारमधे असणे ही पक्षाकडे मोठी ताकद आहे. शिवाय उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते म्हणून ते पक्षातील सर्वांची मनापासून काळजी घेतात ही मोठी जमेची बाजू आहे. या उलट उबाठा सेनेत संघटनेकडे बघायला कोणीच नाही, पक्षाच्या कार्यकर्त्यांची विचारपूस करायलाही कोणी पुढे येत नाही.
आपली काळजी घेण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत असा विश्वास शिवसेनेत प्रत्येकाला असतो. उबाठा सेनेत आपले पुढे काय होणार, या काळजीने सारेच चिंताग्रस्त असतात. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भक्कम पाठबळ आहे. दुसरीकडे उद्धव यांना देवेंद्र फडणवीसपासून शहांपर्यंत सर्वांशी संघर्ष करावा लागतो आहे.
शिंदे यांनी उद्धव यांच्या नाकर्तेपणावर टीकेची झोड उठवली. कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते, तेव्हा सहाशे कोटी जमले पण त्यातला एक रूपयाही खर्च केला नाही, तीस वर्षात महापालिका किती लुटली याचा हिशेब नाही, आम्ही दिल्लीला जाऊन दहा जनपथपुढे मुजरे करीत नाही, संघावर टीका करणारे हे हिंदू कसे असू शकतात ? असा प्रश्न विचारला. दहा वर्षात मोदींनी महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांसाठी दहा लाख कोटी दिले असे सांगत अटल सेतू, नवी मंबई विमानतळ, मेट्रो अशी यादीच शिंदेंनी वाचून दाखवली. उद्धव हे गटप्रमुखही नाहीत ते तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत, अशी त्यांची खिल्ली उडवली. पक्षप्रमुख कधी आपल्या पक्षाच्या लोकांना संपविण्याचे कारस्थान करतो का ? या प्रश्नाने शिंदे यांनी उध्दव यांच्या कार्यपध्दतीवरच त्यांनी प्रहार केला. शिंदे यांच्या भाषणात भाजप, मोदी-शहांची प्रशंसा आणि हल्ल्याचा नेम हा उद्धव ठाकरे हाच होता.
रामदासभाईं कदम यांच्या भाषणने तर मोठा स्फोट झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले ? त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता ? माहिती काढा, मी जबाबदारीने बोलतोय, निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले अशीही चर्चा आहे… रामदासभाईंच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या तोंडून अरे बाप रे असे उद्गार निघाले…
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप, मोदी, शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ले चढवले. ठाकरेंच्या मेळाव्यात शिवतीर्थासमोरच राहणारे मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे आले नाहीत आणि राज- उद्धव यांच्या युतीच्या घोषणाही झाली नाही. मराठीच्या मुद्यावर आम्ही एकत्र आहोत, यापलिकडे युतीची चर्चा पुढे सरकत नाही हेच गेले तीन महिने दिसते आहे. उबाठा सेनेबरोबर निवडणुकीत मनसे युती करणार की नाही, यावर राज ठाकरे मौन पाळून आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.
वाघाचं कातडे पांघरणारा लांडगा माहीत होता, पण मी आज बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र पाहिलं, अशी भाषेत उद्धव यांनी आपल्या मुख्य प्रतिस्पर्ध्यावर टीका केली. भाजपवाले ( महापालिकेत निवडून आल्यावर ) समर्पयामी म्हणत मुंबई अडाणींच्या चरणावर अर्पण करतील, संघाला १०० वर्षे होताहेत. पण तुमच्या ( भागवतांच्या ) मेहनतीच्या वृक्षाला विषारी फळं आली आहेत, तुम्ही समाधानी आहात का ? बटेंगे तो कटेंगे च्या घोषणा देता आणि तिकडे मोदी मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्यायला सांगतात, मग खरी भूमिका कोणती ? भाजप म्हणजे अमिबा आहे, तो वेडावाकडा पसरतो, जिथे गरज वाटेल तिथे युती करतो, शरीरात गेला की पोट बिघडवतो… अशा भाषेत पक्षप्रमुखांनी हल्ले केले. मुंबई- ठाणे, कल्याण -डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई, पुणे, नाशिक अशा महापालिकांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्या की मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिंदे विरूध्द ठाकरे संघर्षाल धार चढेल व त्याचा लाभ घेण्यासाठी भाजप पुढे सरसावलेला दिसेल.
