विविध कारणांनी शेतीमध्ये मिसळत असलेले प्लास्टिक किती धोकादायक आहे याचा विचार आता शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. आपण पिकवतो ते अन्न आहे ते विष होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी. यासाठी प्रदुषणाच्या मुद्द्यावर आता जागरूक होऊन पाऊले उचलायला हवीत. शेतीतील प्रदुषणाने होत असलेले नुकसान विचारात घेऊन ठोस उपाय योजायला हवेत.
निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर
9423180393,8668779597.
शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कृषीशास्त्रज्ञांनी मल्चिंगचे तंत्रज्ञान विकसित केले. सुरुवातीला शेतातील काडीकचरा, गवत असे जैविक घटक वापरून मल्चिंगने उत्पादनवाढीत चांगलीच भर घातली परंतु जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतसे मल्चिंगनेही आपले रूप बदलवले आणि सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या प्लास्टिकचा मल्चिंगसाठी वापर होऊ लागला.
‘प्लास्टिक मल्चिंग’ हा घटक सुरुवातीला जरी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांना साधा, सोपा आणि सरळ दिसत असला तरी त्याचे दुष्परिणाम मात्र अजून तरी कोणाला ठाऊक झाले असं दिसत नाही ! चार आठ दिवसांपूर्वी सहज एका शेताच्या बांधावर मागच्या खरिपातील वापरलेलं मल्चिंग गोळा करून टाकलेलं मला दिसलं ! बारीक बारीक तुकडे इतरत्र वाऱ्याने उडताना पाहिलं. पाच डिसेंबर निमित्ताने येणारा ‘जागतिक मृदा दिन’ आणि त्या अनुषंगाने मातीचं प्रदूषण होताना जाणवलं. प्रत्येक सहा महिन्याला एका पिकासाठी वापरलेलं मल्चिंग जर असं बांधावर किंवा शेतातल्या मातीत तुकडे होऊन मिसळणार असेल तर चार दोन वर्षांमध्ये मल्चिंगचं तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माती आणि शेतीची काय अवस्था होईल याची थोडक्यात कल्पना माझ्या मनी आली.
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने कृषी अधिकारी म्हणून आजचा दिवस साजरा करताना शेतकऱ्यांसोबत याबाबत प्रकर्षाने मी हा विषय मांडला. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कमी वयोगटापासून तर अगदी ज्येष्ठांपर्यंत हा विषय त्यांच्या प्रथमच लक्षात आल्याचं माझ्या निदर्शनास आलं. प्रत्येकाला मातीच्या भविष्याची जाणीव सुद्धा झाली. आरोग्याचे अनारोग्य कसे होत जाईल याची कल्पना आली. जर प्लास्टिक मल्चिंगचा असाच वापर वाढला तर सुपीक मातीच्या प्रत्येक कणाकणात हे प्लास्टिक मिसळून ते अगदी विहिरीचं पाणी, जनावरांचा चारा यामध्ये सुद्धा मिसळायला मागेपुढे बघणार नाही ही पण जाणीव यानिमित्ताने सर्वांनाच झाली.
सेंद्रिय पदार्थांपासून मल्चिंगचं विकसित झालेलं तंत्रज्ञान पुढे प्लास्टिक मल्चिंगपर्यंत येऊन थांबलं परंतु या अजैविक मल्चिंगचा योग्य तो पुनर्वापर व्हायला हवा अथवा शेतातून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे हे झालं तरच आशा सुपीकशेतांमधील मातीचे आरोग्य अबाधित राहील अन्यथा मातीच्या भविष्यकाळासाठी आज ही एक धोक्याची घंटा…! शेतकरी बंधूंनो असं जर सतत होत राहिलं तर आपली माती पण अस्वस्थ व्हायला काही वेळ लागणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
