📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 24, 2026
मुक्त संवाद

समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता

Mandakini Patil Poetry Book Review by sangeeta arbune

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते.

संगीता अरबुने

समकालीन कवितेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या मंदाकिनी पाटील यांच्या ‘आत्मपीठ’ या संग्रहातील कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचा चिंतनशील, आणि बुद्धीनिष्ठ आविष्कार आहे. प्रखर असा आत्मिक हंकार आहे. यातील कविता जितकी आस्तित्व भानाची आहे तितकीच ती समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणारी आहे.

या कवितेचा आंतरिकतेशी जेवढा घट्ट अनुबंध आहे तेवढीच ती भवतालाशी एकरूप होताना दिसते. त्यातली घाई गडबड, काळाचं सुसाटनं दिवसरात्रीचं हुंकारणं, ऋतूंचं हेलकावणं हे सगळंच ती मानवीय पातळीवर विलक्षण संवेदनशीलतेने समजून घेते. आणि आपल्या विचक्षण प्रतिभेने त्याला एका उंचीवर घेऊन जाते.

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते. त्यातली धारदार शब्दकळा, प्रतिमा प्रतीकांचं वेगळेपण, तितकंच नेमकेपण याबरोबरच कवयित्रीची प्रगल्भ अशी जीवनजाणीव यामुळे या कवितांमधील आशयाचा पोत अधिक अधिक घट्ट होताना दिसतो. त्याचे अंतस्तर उलगडताना एकीकडे आपण भोवंडून जातो तर दुसरीकडे त्यातल्या अनुभुतीशी आणि अभिव्यक्तीशी आपण आतून जोडले जातो. हेच या संग्रहाचं यश म्हटलं पाहिजे.

पुस्तकाचे नाव – आत्मपीठ
कवयित्रीमंदाकिनी पाटील
प्रकाशनशब्दालय प्रकाशन

मंदाकिनी पाटील यांच्या आत्मपीठमधील एक कविता...

कदंबा

 तू रूजलास ती जमीन तशी खडबडीतच
पण मोठ्या तोलामोलानं जपलं तिनं तुझं वृक्षपण
तू वाढत राहिलास फांद्यांच्या पिसाऱ्यात
अवकाशाच्या रेषा जुळवीत
 आणि इकडे......

तुझ्या पानापानांतून लगडत राहिले
नाजूक वर्तुळांचे देखणे सुमनसोहळे
त्यांच्या सुगंधी सुमधुरतेवर
भारद्वाजाचेही मन जडले
पण तू स्थितप्रज्ञ
माथ्यावर घेत आभाळाचे डोहकडे
तू  साधा सरळसोट !

अस्वस्थेचे पोपडे फेडत फेडत
आपोआपच झळाळून उठलेलं तुझं खोड
कृष्णस्पर्श भिनलेलं तुझं प्रगल्भ दर्शन
भक्कम करतं मला
कितीही झाली जरी मनाची मोडतोड
तुझं माझ्या अंगणात असणं
आश्वासक करत जातं मला माझं जगणं

जेव्हा तुझ्या लांबचलांब फांद्या
फिरतात माझ्या घराच्या छतावरनं
कनवाळू बापानं फिरवावा हात
जसा मुलीच्या माथ्यावरनं
शांतरसाचा परिपोष अनुभवत जातं मन
तुझं हे

माझ्यासह घरादाराला वेढून उरलेलं अस्तित्व सघन
संजीव आहे तुझ्यात माझ्या बापाचं बापपण
 बा कदंबाS असाच सळसळत राहा तू !
तुझ्या या मुलीच्या जीवाचं तुला लिंबलोण

 मंदाकिनी पाटील, बदलापूर

Related posts

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

झाडीबोली पुर्नजीवीत करणार्‍या संशोधन महर्षीचा थक्क करणारा प्रवास – हरिश्चंद्राची फॅक्टरी

नवदुर्गाः सोशिकतेला स्वतःची शक्ती बनवून स्वतःला सिद्ध करणारी ॲड. सुदर्शना जगदाळे

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406