June 2, 2026
Home » मी कोण ? मराठा, पंजाबी की भारतीय ?
गप्पा-टप्पा

मी कोण ? मराठा, पंजाबी की भारतीय ?

A deeply personal reflection by Yashwant Thorat exploring identity, culture, diversity and the essence of Indianhood through a lifetime of experiences across India.

माझं भारतीयत्व – ( पूर्वार्ध )
मराठा वडील, पंजाबी आई, तमिळ पत्नी, देशभरातील शिक्षण-नोकरीचे अनुभव आणि विविध संस्कृतींशी आलेला जवळचा संबंध—या साऱ्यांच्या संगमातून घडलेल्या एका भारतीयाची ही आत्मशोधाची कहाणी आहे. ‘मी नेमका कोण?’ या प्रश्नापासून सुरू झालेला हा प्रवास अखेरीस भारतीयत्वाच्या व्यापक, समावेशक आणि विविधतेला कवेत घेणाऱ्या अर्थापर्यंत पोहोचतो. वैयक्तिक अनुभवांच्या धाग्यांतून विणलेले हे चिंतन भारताच्या अस्मितेचा अर्थ नव्याने उलगडून दाखवते.

डॉ. यशवंत थोरात

स्वतःच स्वतःवर लादून घेतलेल्या शिक्षांपैकी संपादकांना पाक्षिक सदरासाठी नियमितपणे लेख लिहून देणं यापेक्षा आणखी कठोर शिक्षा दुसरी कुठली नसेल. हे म्हणजे फेरविचार करण्याचा कुठलाहि पर्याय नसतांना लग्न करण्यासारखं आहे. वाघाच्या पाठीवर बसण्याचा निर्णय तुमचा आणि तुम्हाला तिथून उतरवायचा अधिकार मात्र त्यांचा असतो.

नुकताच मी अशा विमनस्क अवस्थेत सापडलो होतो. मन लॉकडाऊन झालं होतं. लेखाची डेडलाईन अवघ्या चार दिवसांवर आली तेंव्हा मी मनोमन देवाला प्रार्थना केली. काहीतरी सुचव बाबा….. तीन दिवस उरले तेंव्हा देवाला नवस म्हणून वहायच्या नारळाची संख्या मी दुपटीने वाढवली. दोन दिवस उरले तेंव्हा मी माझ्या एका मित्राला फोन करून तू येत्या रविवारच्या लेखासाठी काही विषय सुचवू शकतोस का असं विचारलं.

तिथं आशेचा धागा निर्माण झाला. त्याच्या आश्वासक आवाजात तो म्हणाला, यशवंतराव, तुमचं जीवन एवढं अनुभवसंपन्न आहे की तुम्हाला एखादा विषय सहज सुचू शकेल. तुम्हीच विचार करा – तुमचे वडील मराठा होते. आई पंजाबी. वडील लष्करात अधिकारी, तर आई डॉक्टर जिने दुसऱ्या महायुध्दात भाग घेतला. तुमच्याएका बहिणीचं सासर बंगालमधलं, तर दुसरीचं उत्तर प्रदेशातलं. एक आकाशवाणीवरची प्रोग्राम आर्टिस्ट. दुसरी बुध्दिमान अर्थतज्ञ. ( तिचं वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झालं.) तुमचा एक भाचा परदेशात यशस्वी डॉक्टर तर दुसरा अभिनेता. तुम्ही कावेरी ओलांडून तामीळनाडूतल्या मुलीशी लग्न केलंत. तुमची पत्नी एक यशस्वी बॅंकर. तुमच्या दोन्ही मुली इंग्लंडमध्ये स्थाईक झालेल्या. एक मानवी हक्कांसाठी काम करणारी तर दुसरी ब्रिटीश राजघराण्याकडून विविध देशांना मानवतावादी भूमिकोतून दिल्या जाणाऱ्या देणग्यांची व्यवस्था पाहणारी. तुमच्या एका मुलीनं जैन धर्मीयाशी लग्न केलं तर दुसरीने ब्रिटीश व्यक्तीशी. केवढा हा व्यापक नातेसंबंध. शिवाय तुमची कारकीर्दही अशीच, विविध पैलू असलेली. रिझर्व्ह बॅंक, नाबार्ड, लिबरल आर्टस् कॉलेजमध्ये अध्यापन, समाजसेवेच्या क्षेत्रात काम, कॉर्पोरेट जगात संचालक म्हणून लक्षणीय कामगिरी, लेखक आणि आता आवड म्हणून प्रवराच्या शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन. किती विविधांगी अनुभव….

त्यात काय विशेष, मी म्हणालो.

विशेष आहे की नाही, मला माहित नाही, पण हे विविधरंगी आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही. आपल्यापैकी बहुतेकजण सरळमार्गी जीवन जगत असतात. पण तुम्ही चाकोरीबाहेर गेला, अनेक गोष्टी केल्या. आता तुमच्यापुढे हे आव्हान आहे. या विविध प्रवाहांचा तुमच्यावर जो प्रभाव आहे आणि ज्या विविध अनुभवांना तुम्ही सामोरे गेला ते पाहता आपलं भारतीयत्व म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे ?

त्याच्या या प्रश्नाने मी थोडा चमकलोच.

तू स्वतः तरी याचा कधी विचार केला आहेस का?, मी विचारलं.

नाही. पण मला त्याची गरजही कधी वाटली नाही. तो शांतपणे म्हणाला, कारण भारतीय आणि मराठी म्हणून माझी ओळख सुस्पष्ट आहे. माझे आचारविचार आणि रितीरिवाज परंपरेने आलेले आहेत. मी त्यात कालानुरुप काही बदल केले असले तरी आपल्या कुटुंबाचे रितीरिवाज म्हणून हा वारसा मी माझ्या मुलांकडे सोपवणार आहे. त्याबाबत माझ्या मनात कसलीहि शंका नाही. पण तुम्ही तुमच्याबाबत असं म्हणू शकता का ? आपण एकाचवेळी वेगवेगळ्या प्रभावांमुळे वेगवेगळ्या दिशांना ओढले जात आहोत असं तुम्हाला वाटत नाही का, त्यानं विचारलं.

त्याच्या फोननंतर मी कितीतरीवेळ याच प्रश्नाचा विचार करत होतो. भारतीय असणं म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, हा त्याचा प्रश्न मनातून जात नव्हता.

या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही.

मला काही गोष्टी जन्मजात मिळाल्या. आयुष्य पुढे सरकत गेलं तशा अन्य काही गोष्टी जीवनात आल्या. काही गोष्टी नशीबाने मिळाल्या तर काही मी माझ्या प्रयत्नांनी मिळवल्या. एक माणुस आणि एक भारतीय म्हणून मी जो काही आहे त्यात या सगळ्या गोष्टींचा वाटा आहे.

माझे वडील लष्करात असल्याने बदल्या मॉन्सूनसारख्या ठरलेल्या होत्या. दर दोन – तीन वर्षांनी त्यांची बदली होत असे आणि बोरी-बिस्तर गुंडाळून आम्ही नव्या ठिकाणी जात असू. प्रत्येक पोस्टींगची किंवा शहराची एक वेगळी भारतीय ओळख होती. प्रत्येक जागेने मनावर भारताचा एक वेगळा ठसा उमटवला. झाशीला असतांना माझे वडील मला झाशीच्या किल्ल्यात घेऊन जायचे आणि महाद्वाराकडे बोट दाखवत ते मला सांगायचे, भय्या, ते बघ. त्या महाद्वारातून पाठीवर आपल्या मुलाला बांधून बाहेर येत लक्ष्मीबाई ब्रिटीशांवर तुटून पडली आणि इतिहासात अमर झाली. जीवन जगावं तर असं. मी त्यांना महाराणी लक्ष्मीबाईंची गोष्ट पुनः पुन्हा सांगायला लावायचो आणि ते सांगायचेहि. झाशीमध्ये ख्रिश्चन धर्माशी माझा संबंध आला. मला कॉन्व्हेंट शाळेत घातलं होतं. आपल्या धर्मासाठी का असेना पण निस्वार्थ भावनेने काम करण्याची त्यांची वृत्ती माझ्या मनावर ठसली आणि ती आजतागायत कायम आहे.

जालंदर म्हणजे पंजाब म्हणजे मजा. बैशाखी, होळी, भांगडा आणि हास्य विनोद यांचा मजा काही औरच होता. तिथल्या पुढारलेल्या, धीट होत्या आणि मुलं माझ्या दुप्पट आकाराची. गव्हाची लांबचलांब शेतं आणि पाटाच्या बाजुला आमरस पुरीचं जेवण आणि सहल. मामा चीफ इंजिनियर असल्यामुळे भाकरा नांगल धरणाखालच्या बोगद्यात चकरा. जीवन आनंदाने आणि निर्भयपणे कसं जगायचं ते पंजाबनं मला शिकवलं.

त्यानंतर जवळपास ४० वर्षं मी उत्तरेत गेलो नाही. साधारणतः वयाच्या ५० व्या वर्षी दिल्लीत पोस्टिंग झाल्यामुळे माझं लहानपण पुन्हा माझ्यापुढे उभं राहिलं. आजोळची माणसं पुन्हा सहवासात आली. खूप वर्षांपूर्वी शिकलेली पंजाबी भाषा जणु विसरलीच नाही अशा थाटात पुन्हा आठवली. सरसो दा साग आणि मक्के दी रोटी याविषयीचं माझं प्रेम पुन्हा उसळून आलं. पण या उत्साहाने उधाणलेल्या पंजाबी जीवनाला देशाच्या फाळणीच्या आठवणींची एक दुःखी किनार होती. या फाळणीचे दुर्दैवी दिवस ज्यांनी अनुभवले, ज्यात माझ्या आजोळच्या माणसांचाहि समावेश होता, ते त्या काळातल्या करूण कथा आम्हाला सांगत असत. ते ज्या मुस्लिमांचं वर्णन करत असत ते मी नंतर लखनौमध्ये अनुभवलेल्या ‘पहले आप’ संस्कृतीवाल्या मुस्लिमांपेक्षा खूपच वेगळं होतं. मधल्या काळातल्या प्रदीर्घ वाचनानंतर आणि चिंतनानंतर मी शिकलो की गुन्हा माणसं करतात. माणसं दोषी असतात. संपूर्ण जातीला दोषी ठरवणं कितपत बरोबर आहे? फाळणीच्यावेळी पंजाब आणि बंगालमध्ये वेडेपणा पसरलेला होता. अतिरेक दोन्ही बाजुंनी झाला. इतिहासाचा निर्णय स्पष्ट आहे. पाकिस्तान दोषी आहे. भारत दोषी आहे. हिंदू दोषी आहेत, मुसलमानही दोषी आहेत.

उषा रजा घेऊन आली तेंव्हा आम्ही आमचं परंपरागत घर पाहण्यासाठी अमृतसरला गेलो होतो. तिथं असतांना सुवर्ण मंदिरात दर्शनाला गेलो, गुरु नानकांचा प्रेमाचा संदेश देणारं शब्द किर्तन ऐकलं. मनाला बरं वाटलं.

उषाला जालियनवाला बागेत घेऊन गेलो. मन दुःखाने भरून आलं. डोळे पाणावले. उषाला बागेसमोरचा तो रस्ता दाखवला. बागेतला नरसंहार १३ एप्रिल १९१९ रोजी झाला होता. १४ एप्रिल रोजी डायरने एक विचित्र आदेश काढला. बागेजवळ जे लोक राहतात त्यांना सरळ चालत घरी जाता येणार नाही. त्याना सैनिकांसारखं पोटावर रांगत जावं लागेल. माझ्या आजोबांचं घर बागेच्या जवळच होतं. ते शहरातले ख्यातनाम वकील असतांनाही त्यांना त्या रस्त्यावरून पोटावर रांगत जावं लागलं होतं. त्यामुळे माझ्या आईच्या माहेरचे सगळेजण हिंदू मदासभेचे कट्टर समर्थक होते.

लखनौचा अनुभव सर्वस्वी वेगळा होता. ते एक साचेबंद शहर नव्हतं. ते शहर नसून जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता. तिथं उर्दू भाषेची नजाकत, खानदानीपणा, तेज आणि लावण्य सर्व काही होतं. ईस्ट इंडिया कंपनीनं तिथं एक बाग तयार केली होती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना हुलकावणी देऊन त्याच बागेतून निसटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला तेंव्हा ते गोळीबारात शहीद झाले. तिथल्या लष्करी छावणीच्या परिसरातील बागांमध्ये मी माझ्या आई वडिलांबरोबर जेंव्हा फिरत असे तेंव्हा माझी आई मला त्या ठिकाणी घेऊन जायची आणि नमस्कार करायला सांगायची तिथं भरलेल्या डोळ्यांनी ती मला म्हणाली होती की आझाद यांच्यानंतर भगतसिंग यांनी गदर पार्टीचं नेतृत्व हाती घेतलं आणि लढा चालू ठेवला. ‘तेनु पता है, भगत ने कि लिख्यासी’, ( भगतसिंगांनी काय लिहिलय ते तुला माहित आहे का ) असं ती पंजाबीत मला विचारत असे. ‘मै इष्कभी लिखना चाहू तो इन्कलाब लिखा जाता है’, असं भगतसिंगांचं वाक्य ती सांगत असे. ( मी प्रेम असा शब्द लिहायला गेलो तरी कागदावर क्रांती असा शब्द उमटतो. )

माझा आठवा वाढदिवस माझ्यासाठी बोर्डींग स्कूल घेऊन आला. वह्या पुस्तकांची बॅग आणि एक पत्र्याची पेटी ज्यावर लिहिलं होतं, ‘यशवंत थोरात, रोल नंबर २३८, जोधपूर हाऊस, मेयो कॉलेज , अजमेर’. ब्रिटिशांनी रजपूत संस्थानिकांच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये मला घालण्यात आलं. मेयोला त्याकाळी भारताचं एटन म्हणत असत. तिथल्या राजे रजवाड्यांच्या मुलांमध्ये मी अगदी वेगळा होतो. शाळेतील इंडिया आणि बाहेरचा भारत यात खूप तफावत होती. सुरुवातीला त्यांच्या झगमगाटापुढे मी थोडा बुजलो. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की केवळ जन्मदाखल्यामुळे ते राजे आहेत. कर्तृत्वामुळे नाहीत. राजेशाहीचा भपका दाखवून मेयोने मला खऱ्या भारतीयत्वाच्या मार्गावर आणलं.

शालेय शिक्षण पूर्ण करून मी मुंबईच्या एलफिंस्टन कॉलेजमध्ये गेलो. मी प्रथम विज्ञान शाखेत गेलो, पण विज्ञान आणि गणितात माझं पानिपत झालं. पहिल्या वर्षात नापास झाल्यानंतर मला कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये घालण्यात आलं. मी आर्टस् ला गेलो. अनपेक्षितपणे आलेला तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता. तिथं मी खऱ्या अर्थाने फुललो. माझ्यात आत्मविश्र्वास निर्माण झाला. इतिहास, राज्यशास्त्र आणि तत्वज्ञानाच्या विषयात मी चांगलंच प्राविण्य मिळवलं. विद्यापीठात पहिला आलो. जमीन, संस्कृती आणि लोकांशी माझं खऱ्या अर्थाने नातं जुळलं. ही सामान्य माणसं असामान्य असल्याचं मला जाणवलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं. त्यांच्याकडे भौतिक संपन्नता नव्हती, पण श्रध्दा आणि निष्ठेच्या बळावर समोर येईल त्या प्रसंगाला तोंड हेण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. मला त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटायला लागला आणि त्यांनी त्यांच्या घरात आणि हृदयात मला स्थान दिलं. अरुण आणि गाजापूर यांची आठवण आजहि माझ्या मनात कायम आहे. दीर्घ सुटीतली ती जंगलातली सहल, उडणाऱ्या तितराला गोळी मारून खाली पाडण्यातला थरार, दिवसभरच्या ट्रेकनंतर झोपडीच्या अंगणात घेतलेला विसावा, रात्रीच्या जेवणापूर्वी जवळच्या नदीच्या थंडपाण्यात मारलेली डुबकी, ऊसाच्या शेतातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, रात्री पोटात कावळे ओरडत असतांना आणि आम्ही गरमागरम झुणका भाकरीची वाट पहात असतांना त्याच्या वडिलांनी केलेलं गीतेविषयीचं भाष्य … कितीतरी गोष्टी. गाजापूर आता पाण्याखाली आहे, पण त्याच्या आठवणी मनातून जात नाहीत. त्याचा वारसा संपत नाही.

कॉलेज शिक्षणानंतर कायद्याची पदवी घेतल्यानंतर मी स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून चेन्नईच्या रिझर्व्ह बॅंक स्टाफ कॉलेजमध्ये गेलो. सुमारे ५० वर्षापूर्वीची ही घटना. तत्वज्ञानातून बॅंकिंगकडे जाणं हा बौध्दिक धक्का होता. पण माझी सहकारी आणि तमिळ अय्यर घराण्यातली उषा हिच्याबराबरच्या मैत्रीने सगळंच बदललं. मंतरलेले दिवस होते ते. आम्ही लग्न करणार असल्याचं सांगितलं तेंव्हा दोन्ही घरांच्या भिंती हादरल्या. आंतरजातीय विवाहात अनेक अडचणी होत्या, पण आम्ही ठाम राहिलो आणि आई वडिलांची मनं जिंकून विवाहबध्द झालो. शेवटी प्रेमाचा विजय झाला. हा विवाह आनंददायी होताच पण त्यातून दोन संस्कृतींच्या मीलनातून निर्माण होणारी अनेक सामाजिक व सांस्कृतिक आव्हानं समोर उभी राहिली.

प्रेमाबाबत मी ठाम होतो, पण रसम सांबारपेक्षा तांबडा – पांढरा रस्साच अधिक रुचकर असतो यावरही मी ठाम होतो आणि आहे.

याचवेळी मला जाणवायला लागलं की उषा आणि मी किती वेगळे आहोत किंबहुना सगळेच भारतीय परस्पराहून किती वेगळे आहेत याचा मी विचार करायला लागलो. याचवेळी मला माझ्या ओळखीबाबतच प्रश्न निर्माण झाला. मी मराठा होतो की पंजाबी की भारतीय की तिन्ही मिळून बनलेला ?

नोकरीमुळे मला सर्व देशात फिरावं लागलं. त्यावेळी सर्वप्रथम लक्षात आली ती एकता नव्हे तर परस्परांना विभागणारी भिन्नता.

आम्ही सगळे एक राष्ट्र कसे झालो ? अगदी सुरुवातीला आम्ही म्हणजे ५०० पेक्षा जास्त संस्थानांचं एक कडबोळं होतं. स्वातंत्र्याच्यावेळी एक ब्रिटीश राज्य होतं आणि अन्य तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र – सार्वभौम राज्ये होती. राजकीयदृष्ट्या भारत एक होता की फक्त ब्रिटीशांना घालवून देण्याच्या भावनेतून सगळे एकत्र आले होते. आम्ही एक राष्ट्र होतो की अनेक राष्ट्रांचं बनलेलं राज्य होतो ? आजही काहीही म्हटलं तरी वंश, जात आणि धर्म याविषयीची आपली भिन्नता जशी त्यावेळी होती तशीच आहे. सत्य हे आहे की आपण एक देश नव्हतो, तर एक देश बनवलो गेलो. आपण सुरुवातीला भारतीय नव्हतो, भारतीय बनवले गेलो हे समजायला मला सगळं आयुष्य घालवावं लागलं.

आपण एक देश बनलो ते आपली भिन्नता दडपून नव्हे तर ती स्वीकारून. त्या विभिन्नतेतील एकतेतूनच आपली भारत अशी नवी ओळख निर्माण झाली. या विविधतेतील एकतेचा जेंव्हा आपण गौरव करतो तेंव्हा आपले सर्व हक्क आणि अधिकार यांचा गौरव करतो. आपण हिंदु , मुस्लिम, ज्यू, किंवा ब्राह्मण, क्षत्रीय, महाराष्ट्रीय किंवा पंजाबी आहोत म्हणून आपण भारतीय आहोत असं नाही. आपण या भूमीत जन्म घेतला म्हणून आपण भारतीय आहोत. देशाच्या रक्षणाची शपथ आपम घेतो म्हणून आपण भारतीय आहोत. ही भावना हाच माझ्या भारतीयत्वाचा वारसा आहे. खऱ्या अर्थानं भारतीय असणं म्हणजे मी या भूमीचा हिस्सा असणं आहे.

‘मै हिंदुस्थान हूं. हिमालय मेरी सरहदकी निगेहबान है और गंगा मेरी पवित्रताकी सौगंध.

Related posts

इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…

आक्रोश आणि आव्हानमय कविता – अंतस्थ हुंकार

अवयवदानातून २०२२ मध्ये १५ हजाराहून अधिक जणांचे पुण्यकर्म

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!