आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा ॲड. देवदत्त परुळेकर लिखित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ समकाळाचा आवाज आहे, असे मत डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले. आजरा येथे झालेल्या परिसंवादात वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
आजच्या काळासाठी तुकोबा ग्रंथात समकाळाचा आवाज – डॉ. रणधीर शिंदे
कोल्हापूर – कोणतेही संत साहित्य हे त्या-त्या काळाला समजून घेण्यासाठी लिहिले जायला हवे. ॲड. देवदत्त परुळेकर यांनी लिहिलेला ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ या अर्थाने समकाळाचा आवाज आहे. आजच्या काळातील अगदी महत्त्वाची उदाहरणे देऊन अतिशय सोप्या भाषेत तुकाराम महाराजांचे विचार समाजाला त्यांनी समजावून सांगितले आहेत. तुकाराम महाराजांचे विचार अशा पद्धतीने लेखनातून समाजापर्यंत पोहोचवणे ही मौलिक साहित्यकृती आहे. आपल्यातील विकारांपासून दूर जाण्यासाठी आणि आपले वैयक्तिक जीवन अधिक समृद्ध करत विवेकाच्या मार्गावर पोहोचण्यासाठी हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायला हवा, असे प्रतिपादन नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.
प्रभा प्रकाशन, कणकवली यांनी प्रकाशित केलेल्या ॲड. देवदत्त परुळेकर लिखित ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ या ग्रंथावर आजरा येथे राम कृष्ण हरी संस्थेच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मुकुंदराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात वक्ते म्हणून सुभाष विभुते, प्रा. सुनील शिंत्रे, कवी अजय कांडर, ॲड. देवदत्त परुळेकर आदी सहभागी झाले होते. यात डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रमुख मांडणी केली. यावेळी शिंदे म्हणाले की, आधुनिक समाज नकली आहे, जाहिरातबाजी करणारा आहे आणि अहंकाराचा गंड त्याला आहे. या सर्वांचे उत्तम विवेचन करून या सर्वांवर उपाय म्हणून तुकाराम महाराजांचे विचार किती महत्त्वाचे आहेत, हेच या ग्रंथात परुळेकर यांनी सांगितले आहे.
सुभाष विभुते म्हणाले, तुकाराम महाराजांचे विचार सर्वकालीन कसे आहेत हे समजून घेण्यासाठी ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ वाचला गेला पाहिजे. गुलामगिरीच्या काळात तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकारामांनी कोणतेही क्षेत्र सोडले नाही. समाजाच्या मनातील वास्तव तुकारामांनी मांडले. या वास्तवाचे दाहक अनुभव या पुस्तकातून आपल्याला घेता येतात. आजच्या काळासाठी तुकोबा हा ग्रंथ आजचा काळ किती गुंतागुंतीचा आहे हे समजून घेण्यासाठी वाचला गेला पाहिजे.
अजय कांडर म्हणाले, आजच्या काळात आपण आपला विवेक बाजूला ठेवून जगत असल्यामुळे आपले जगणेच अडचणीत आले आहे. अशा वेळी ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा मार्गदर्शक ग्रंथ आहे. ज्या समाजाने विवेक गमावला तो समाज अशांती निर्माण करतो. तुकाराम महाराज मात्र आपल्याला विवेकाचे बोट धरून चालायला लावतात. या सर्वांचे मूलभूत चिंतन ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ या ग्रंथात आहे. आजचा समाज समजून घेण्यासाठीही हा ग्रंथ वाचला गेला पाहिजे.
ॲड. परुळेकर म्हणाले, जो माणूस भेदाभेद करतो तो वारकरी संप्रदायाच्या विचाराचा नाही. संतांचा विचार आपण सोडत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. व्यवसाय करणाऱ्या आणि शाळकरी मुलांनी हे पुस्तक वाचण्याची गरज आहे. तुकाराम हे औषध आहेत. त्यांना समजून घेतले तर समाजाचे आरोग्य सुदृढ होईल. आज समाजाचे मानसिक आरोग्य नीट करण्याची गरज असणाऱ्या काळात ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ हा ग्रंथ लिहिला गेला आहे.
यावेळी मुकुंदराव देसाई आणि प्रा. सुनील शिंत्रे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक काॅ. संपत देसाई, जि. प. सदस्य सुधीर देसाई, युवराज पोवार, रणजीत देसाई, गौरव सुतार, पांडुरंग जोशीलकर, गंगाराम येडगे, दीपाली गुरव, कल्पना जाधव, मंगल परुळेकर, मधुकर मातोंडकर, शांताराम पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते. युवराज जाधव यांनी प्रास्ताविक केले. संजय घाटगे यांनी स्वागत केले. काशिनाथ मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश मोरूसकर यांनी आभार मानले.
