आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
‘ किमान तापमान घसरतेयं, थंडी वाढतेयं!’
किमान तापमान –
शुक्रवार दि. ३ जानेवारीपासुन पहाटेचे किमान तापमानात घसरण होत असुन, आज संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके तर भाग परत्वे बऱ्याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडे तीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही ह्या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे.
आज तर जळगांव, नगर, पुणे, नागपूर शहरातील पहाटेचे किमान तापमान तर एकांकी संख्येवर पोहोचले आहे. कोकणात सुद्धा डहाणू, हर्णाई, मुंबई, सांताक्रूझ येथेही सरासरीपेक्षा अर्ध्या डिग्रीने किमान तापमान खालावले आहे.
कमाल तापमान –
ह्या उलट दुपारी ३ चे कमाल तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात भाग परत्वे सरासरीपेक्षा एक डिग्रीपासून ७ डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवसा ऊबदार पणा तर रात्री थंडी जाणवत आहे.
आर्द्रता –
आज सकाळची सापेक्ष आर्द्रता ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात डहाणू ,सांताक्रूझ, नगर, सोलापूर वगळता भाग परत्वे सरासरीपेक्षा एक पासून २९ % पर्यन्त खालावली असल्यामुळे, हवेतही त्यामानाने कोरडेपणा असुन पहाटे पडणारे दव, धुके ही विशेषकरून जाणवणार नाही, असे वाटते. त्यामुळे एकूणच हे वातावरण रब्बी पिकास अत्यंत लाभदायक ठरु पाहत आहे.
सध्या पुढील १५ दिवस तरी म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यन्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. तोपर्यंत चांगल्या लाभदायक थंडीची अपेक्षा करू या !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.