मुंबईत बदलते जगला व्यंकटेश माडगुळकर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार
मुंबई – मराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. ती आपल्याला फुकटात मिळालेली नाही. तिच्यात खूप स्थित्यांतरे झालेली आहेत. मराठी भाषेची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत आहे. दिवाळी अंकानी आजवरच्या परंपरेत मराठीतील बोली टिकविण्यात आणि नवे लेखक घडविण्यात मोलाची कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केले.
ते मुंबईतील दादर सार्वजनिक वाचनालयात आयोजित मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी विशेषांक पुरस्कार वितरण समारंभामध्ये बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या बदलते जग दिवाळी अंकाला ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर सुवर्णमुद्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपादक रावसाहेब पुजारी यांनी तो स्विकारला. यावेळी बदलते जगचे कार्यकारी संपादक अजयकुमारही उपस्थित होते.
श्री. घाडी म्हणाले, मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. ती आपली मराठी माऊली आहे. शतकापासूनची दिवाळी अंक परंपरा यापुढेही जोपासायची असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांनी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत. मराठी भाषा आपल्याला फुकट मिळाली नाही अनेक शतकांपासून बदलत स्थित्यंतर घेत पुढे प्रगल्भ होत आली आहे. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि लवचिक भाषा आहे. मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत आहे. ती जपणे प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे.
यावेळी मनमाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अनिल शिनकर यांना दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्कार देण्यात आला, तर ज्येष्ठ पत्रकार रविकिरण कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर महाराष्ट्रातील ५० हून अधिक दिवाळी अंकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी उद्योगपती अशोक पाटील, अरूण शेवते, निलिमा कुलकर्णी, रवींद्र मालुसरे आदी यावेळी मनोगते झाली. साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
