- विजेत्या कवितेला 10 हजारांचे पारितोषिक
- समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उपक्रम
सिंधुदुर्ग – कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे खुली दीर्घ काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेसाठी ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून 10 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार आहे.
नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत या गावचे सुपुत्र. मुंबईच्या गिरणगावात हमाली करणाऱ्या, रस्त्यावर झोपणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहिरनामा’ यांसारख्या संग्रहांतून त्यांनी शोषितांच्या वेदनेला क्रांतीची धार दिली. श्रमिकांचे जीवन, मुंबईची झोपडपट्टी, भुकेलेले जग आणि व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यामुळेच त्यांना ‘क्रांतिकारी कवी’ म्हणून ओळखले जाते. पद्मश्री, कबीर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना लाभले.
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग गेली अनेक वर्षे ‘समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते’ या ब्रीदवाक्याने साहित्यिक उपक्रम राबवत आहे. प्रतिष्ठान दरवर्षी समाज साहित्य विचार संमेलन’ आयोजित करते. कोकणातील कवी-लेखकांबरोबर महाराष्ट्रातील इतर भागातील साहित्यिकांनाही मंच उपलब्ध व्हावा, या हेतूने प्रतिष्ठान मुंबईसह राज्यभर उपक्रम राबवते. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे अनोखे स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित या दीर्घ काव्य स्पर्धेला राज्यभरातील कवींनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह सुरेश बिले यांनी केले आहे.
स्पर्धेचे स्वरूप
कवी सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गुणवत्ता असणाऱ्या जुन्या नव्या कवींना व्यासपीठ मिळावे, या हेतूने ही दीर्घ काव्य लेखन स्पर्धा घेतली जात आहे. कवितेला विषयाचे कोणतेही बंधन नाही. कोणताही कवी कोणत्याही आशयावरील दीर्घ कविता पाठवू शकतो. एका स्पर्धकाने एकच कविता पाठवावी. कविता कितीही मोठी असली तरी चालेल. लेखन पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविणे बंधनकारक आहे. मान्यवर कवी – समीक्षक स्पर्धेचे परीक्षण करणार असून त्यात संस्थेचा हस्तक्षेप असणार नाही.
कविता पाठविण्याची अंतिम तारीख : 5 सप्टेंबर 2026.
कविता पाठविण्याचा पत्ता –
अजय कांडर, अभंग, कलमठ-गोसावीवाडी, कणकवली, जि. सिंधुदुर्ग – 416602 मो. – 9404395155
