Marathi Children’s Literature या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ठेवा ठरलेल्या ‘Chanda Te Banda’ या बबन शिंदे लिखित समीक्षा ग्रंथाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील १११ बालसाहित्यिकांच्या साहित्याचा विस्तृत आणि समावेशक आढावा घेत बालसाहित्याचा एक समग्र ज्ञानकोषच उभा केला आहे. कथा, कविता, कादंबरी आणि नाटक या चार विभागांतून उलगडणारा हा ग्रंथ बालसाहित्य अभ्यासक, संशोधक आणि रसिकांसाठी मोलाची संदर्भसंपदा ठरतो. गुलाब बिसेन
मराठी बालसाहित्यातील एक संवेदनशील लेखक बबन शिंदे हे कथा – कवितांच्या माध्यमातून बालसाहित्यात आपले मोलाचे योगदान देत आहेत. त्यांनी लेखन करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे संपादित ग्रंथ प्रकाशित करून लिहित्या हातांना बळ दिले आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे बालसाहित्यकार बबन शिंदे यांची तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एकूण साहित्याला नामवंत संस्थाचे अठ्ठेचाळीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. अनेक कार्यक्रमातून ते कविता गाऊन आणि बहारदार कथाकथन करून श्रोत्यांची मने जिंकून घेतात.
यापूर्वी त्यांचा ‘मराठवाड्याचे बालसाहित्य आकलन आणि समीक्षा’ हा समीक्षाग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्यात मराठवाड्यातील एकूण पंचाहत्तर बालसाहित्यकारांच्या साहित्याचा समावेश आहे. बालसाहित्यात भरीव काम करणारे लेखक बबन शिंदे यांचा बालसाहित्याचा समीक्षाग्रंथ ‘चांदा ते बांदा’ प्रकाशित झाला आहे. आजपर्यंत अनेक नामवंत लेखकांनी बालसाहित्याची समीक्षा केली आहे. अनेक समीक्षाग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. परंतु बबन शिंदे यांच्या ‘चांदा ते बांदा’ या समीक्षा ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सिमेत बसणाऱ्या चंद्रपूरपासून ते बांद्यापर्यंतच्या साहित्यिकांच्या बालसाहित्याची विस्तृत समीक्षा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एकशे अकरा बालसाहित्यिकांच्या या समीक्षाग्रंथात कथा, कविता, कादंबरी आणि नाटक या साहित्याचा समावेश आहे.
चारशे ब्याऐंशी पानांच्या या विस्तृत समीक्षा ग्रंथामध्ये राज्यातील एकशे अकरा बालसाहित्यिकांच्या कविता, कथा, कादंबरी आणि नाटक या साहित्य कृतींचा समावेश आहे. हेच या समीक्षा ग्रंथाचे वेगळेपण आहे. एवढा समावेशक आणि विस्तृत समीक्षा ग्रंथ बालसाहित्यामध्ये प्रथमच प्रकाशित झाला आहे. लेखकाने या ग्रंथाची चार विभागांत विभागणी केली आहे. कविता विभाग, कथा विभाग, कादंबरी विभाग आणि नाट्य विभाग हे चार विभाग आहेत. लेखक बबन शिंदे यांनी या ग्रंथात मनोगतामध्ये बालसाहित्याचा विस्तृत मागोवा घेतला आहे. बालसाहित्याच्या सुरूवातीपासूनचा झालेला प्रवास उलगडला आहे. कविता विभागाची सुरुवात करताना लेखकाने शांता शेळके यांच्या ‘वेडा वेडा खातो पेढा’ या कवितासंग्रहाच्या समीक्षेने केली आहे. यामध्ये लेखकाने कवितासंग्रहातील कवितांमध्ये असलेली बालसुलभ भाषा, साहित्यमूल्य आणि कवितांतील गोडवा या अंगाने साहित्यकृतीचे सुंदर परीक्षण केले आहे.
‘चांदा ते बांदा’ या समीक्षा ग्रंथामध्ये बालसाहित्याची समीक्षा करताना शांता शेळके, विंदा करंदीकर, डॉ. लीला पाटील, अरुणा ढेरे या दिग्गज साहित्यिकांच्या साहित्यासोबतच अलीकडील साहित्यिकांच्या साहित्याचीही समीक्षा केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कालखंडातील साहित्याचा वाचकाला गोडवा चाखता येतो. काळानुरूप मुलांच्या भावविश्वात होणारे बादल, महाराष्ट्रात भागानुसार बदलत जाणारा मराठीचा लेहजा या पुस्तकात लेखकाने टिपले आहेत. कविता विभागामध्ये एकुण पन्नास कविंच्या बालकवितांची समीक्षा कलेली आहे. त्यामध्ये काळानुसार साहित्यकृतींचा समावेश केल्यामुळे समतोल राखला गेला आहे. नावाप्रमाणे ‘चांदा ते बांदा’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या बालसाहित्यिकांच्या बालसाहित्याचा लेखकाने समावेश केला आहे. त्यामुळे हा समीक्षा ग्रंथ इतर समीक्षा ग्रंथांपासून वेगळा ठरला आहे.
डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘गुगलबाबा’, सदानंद पुंड्याळ यांच्या वारा गाई माणी, प्रा. देवबा पाटील यांच्या आकाशगंगा, एकनाथ आव्हाड यांच्या शब्दांची नवलाई डॉ. कैलास दौंड यांच्या ‘सांग ना गं आई इत्यादी बालसाहित्यिकांच्या वाचकप्रिय अशा कविसासंग्रहांच्या समीक्षेचा लेखकाने या ग्रंथात समावेश केला आहे. कथा विभागामध्ये लेखकाने एकुण एकेचाळीस बालसाहित्यिकांच्या कथासंग्रहांची समीक्षा केली आहे. यामध्ये लीलावती भागवत, गिरीजा कीर, प्रतिमा इंगोले, लीला शिंदे, फारूख काझी, डॉ. पृथ्वीराज तौर, आबा महाजन, बबन शिंदे, गुलाब बिसेन, आबासाहेब घावटे अशा लेखकांच्या कथासंग्रहांचा समावेश केला आहे. कथांची समीक्षा करताना ‘लेखकाने कथेतील नितीमूल्य, कथेच्या जमेच्या बाजू, वयोगटाला अनुरूप कथेतील भाषा, कथेतील संवाद, कथेची वाचनीयता, श्रवणीयता, पुस्तकांची आकर्षकता, रेखाटने इत्यादी गोष्टींचा लेखकाने लेखाजोखा मांडतानाच कथेची लंगडी बाजू नकळत अधोरेखीत केल्या आहेत.
कादंबरी विभागामध्ये डॉ. विजया वाड, बाबुराव शिरसाट, डॉ. श्रीकांत पाटील, नामदेव माळी, सुभाष विभुते, स्वाती कान्हेगारकर, डॉ. माधव जाधव, कल्पना मलये, रा. र. बोराडे अशा नामवंत बारा बालसाहित्यिकांच्या वाचनिय कादंबरींची समीक्षा लेखक बबन शिंदे यांनी केली आहे. बालकुमार वाचकांना आवडणारे कादंबरींचे विषय, त्यातून नकळत दिली जाणारी शिकवण, मनोरंजनातून मूल्यांकडे कादंबरीचा होणारा प्रवास लेखक या समीक्षेतून मांडतो. बबन शिंदे हे उत्तम साहित्यिक तर आहेतच, सोबतच ते उत्तम समीक्षकही आहेत. हे त्यांच्या या समीक्षाग्रंथासाठी घेतलेल्या मेहनतीवरून सिद्ध होते. कादंबरी वाचताना कथानकात पुढे काय होईल याची उत्सुकता लागणे गरजेचे असते त्यामुळे कादंबरी उत्कंठावर्धक, विविध मूल्य वाचकानातून रुजवण्याचा प्रयत्न, समकालीन समस्या, त्यांची होणारी उकल, मानवी सहसंबंध आदी गोष्टींचा झालेला विचार लेखक बबन शिंदे यांनी समीक्षेतून उजागर केला आहे.
नाट्य विभागामध्ये सुनंदा गौर, दिनेश काळे, बबन शिंदे, नसीम जमादार, डॉ. श्रीकांत पाटील, प्रभाकर शेळके, विनिता पिंपळखरे या लेखकांच्या आठ साहित्य कृतींची समीक्षा लेखकाने केली आहे. नाटकामध्ये संवादाला अधिक महत्त्व असते. त्यादृष्टीने लेखकाने नाटकातील संवादांची परिणामकारकता, वाक्यांची रचना, नाटकातून दिलेला संदेश, मुखपृष्ठ इत्यादी बाबींचा सखोल विचार करून समीक्षा केली आहे. ‘चांदा ते बांदा’ हा समीक्षा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बालकांसाठी काम करणाऱ्या लेखकांच्या साहित्यकृतींचा ज्ञानकोषच म्हणावा लागेल. लेखक बबन शिंदे यांनी एकशे अकरा लेखकांचे साहित्य मिळवून ते वाचून त्यांची आत्मीयतेने समीक्षा करून ग्रंथ सिद्ध केला, याबददल ते अभिनंदनास पात्र आहेत. बालसाहित्याविषयी कणव असलेल्या प्रत्येकाने हा ग्रंथ नक्की वाचावा.
पुस्तकाचे नाव – चांदा ते बांदा
लेखक – बबन शिंदे
प्रकाशक – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा
किंमत – ५२०/- रु.
समीक्षक – गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर)
संपर्क – 9404235191
