कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार – कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा पाटील लिखित आणि रावा प्रकाशन प्रकाशित ‘काहूर’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी साडे दहा वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार आणि कवयित्री उषा परब, नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर, तसेच समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तर कार्यक्रमाला डॉ. धनश्री तायशेटे सावंत – अध्यक्ष, कणकवली शिक्षण संस्था; डॉ. संदीप सावंत चेअरमन- कणकवली शिक्षण संस्था; डॉ. एस. एन. तायशेटे चेअरमन- शालेय समिती, कणकवली शिक्षण संस्था; डी. एम. नलावडे सचिव- कणकवली शिक्षण संस्था; एम. ए. काणेकर उपकार्याध्यक्ष- कणकवली शिक्षण संस्था; आणि जी. एन. बोडके प्राचार्य- एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवली यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.समाज साहित्य प्रतिष्ठान आणि मिळून साऱ्याजणी परिवार यांच्या वतीने हा साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या उपाध्यक्ष म्हणून कोकणच्या साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या तसेच गेली अनेक वर्ष काव्य लेखन करणाऱ्या कवयित्री मनीषा पाटील यांच्या या दुसऱ्या ‘काहूर ‘ कवितासंग्रह प्रकाशनाला साहित्यरसिक, वाचक आणि कविता प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कवयित्री मनीषा पाटील यांचे मनोगत –
कॉलेज जीवनात मला ज्या कवयित्रींच्या कविता आवडत होत्या. त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे वाटते ते ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचे. इंदिराबाईंच्या कवितेतील वैविध्य आणि भावस्पर्शी शब्दरचनेने मनाला मोहिनी घातली होती, पण त्यांच्या विरह कविता वाचत असताना मला नेहमी प्रश्न पडत असे की, इतक्या दुःखी, वेदनादायी, विरह व्याकूळ काळात इंदिराबाईंना हे शब्द कसे सुचले असतील? कविता लिहिताना त्यांच्या मनाची किती घालमेल झाली असेल? विरहाच्या अवस्थेत अश्रूंच्या धारांसोबत काही शब्द विरून गेले असतील का?
पण आता जेव्हा त्यांचेच दुःख माझ्या वाट्याला आले, तेव्हा समजले विरह म्हणजे फक्त दुःख, वेदना किंवा दुरावा नसतो तर त्या विरहातही एक प्रेमाचा, आपुलकीचा, नात्यातील सच्चेपणाचा धागा गुंफलेला असतो. खरं तर या परिस्थितीतच दुरावलेली व्यक्ती शब्दांमधून पुन्हा पुन्हा भेटत राहते. मग काही काळासाठी पुन्हा दुरावते. या दुराव्यात येते ते एकाकीपण आणि याच एकाकीपणात भूतकाळात अनुभवलेले, जगलेले क्षण पुन्हा वेचता येतात. त्यातूनच जगण्याची असोशी निर्माण होते. माझ्या या साऱ्या कविता अशाच अस्वस्थतेत आणि तीव्र विरहात लिहिल्या आहेत.
या कविता म्हणजे निव्वळ लेखन नाही. फक्त आठवणीही नाहीत. तर आमच्या सहजीवनातील अनमोल क्षण, सहचराचे गुणविशेष आणि एकटेपणाच्या जाणिवेतून त्यांच्याप्रति असलेल्या कृतार्थतेच्या सद्भावना आहेत. कधी रात्रीच्या निरव शांततेत उमगलेल्या, कधी गर्दीत असूनही जाणवलेल्या एकटेपणात सापडलेल्या, तर कधी माझ्या भवतालात निर्माण झालेल्या पोकळीतून निपजलेल्या या कवितांनी माझ्या तनामनात माजलेले काहूर शमवण्याचा काहीसा प्रयत्न केला आहे.
या कविता आज जरी माझ्या असल्या तरी मला वाटते, ज्यांनी ज्यांनी कुणाला तरी मनापासून हृदयस्थ केले असताना अगदी तीच जिवलग व्यक्ती आपल्यापासून दूर गेली तर त्या व्यक्तीला या कवितांमध्ये शोधता येईल. जर वाचकांना या कवितांमध्ये आपली जवळची व्यक्ती भेटली आणि काही काळासाठी त्यांच्या वेदनांचे ओझे हलके झाले तर माझे शब्द सार्थकी लागले असे वाटेल.
आठवणी आणि विरहाचे हे काहूर तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचून माझ्या अंतरीचे भाव तुमच्या हृदयात विरघळावेत हीच मनीषा.
मनीषा रवींद्र पाटील
संपर्क : 94228 19474
