अकोला – माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया जन्मशताब्दीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे १८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे, संमेलनाचे संयोजक बबन कानकिरड व गजानन चौधरी यांनी ही माहिती दिली.
प्रा. प्रतिमा इंगोले यांची पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी चित्तथरारक रोमहर्षक व जीवनदायी कुमारकादंबरी ‘पुराच्या वेढ्यात अभय’ ही लोकप्रिय ठरली आहे. स्वप्नातील राजा, बोरवली बाई ह्या कादंबऱ्यासह लाजाळू, सोन्याचा बाळ, माध्यम, बापू गुरुजी, मोठं व्हायचं कसं ?, नवी बडबड गीते, उजळ आजोबा, खरा निवाडा, दृष्ट या बालवाङयासह ‘संख्यांच्या गोष्टी ‘ इत्यादी बालकथा संग्रह प्रकाशित झाले आहे. याशिवाय त्यांनी ‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास हा संशोधन पर संदर्भ ग्रंथ लिहिला आहे. त्यांच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक ललित लेख, वैचारिक लेख, संशोधन पर लेख, समीक्षा लेखन, भाषाशास्त्र विषयक लेखन प्रसिद्ध आहे.
वनराई युथ फाऊंडेशन अकोल्याच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीवजागृती, निसर्गप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. इंगोले यांच्या पर्यावरणविषयक बाल वाङ्मयाची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये सदस्य अमित वाडेकर, मधुभाऊ घारड, डॉ. विजय निलावार, डॉ. रावसाहेब काळे, प्रा. प्रवीण वाघमारे, प्रा. गजानन वाघ, डॉ. ज्योत्स्ना कानकिरड, अॅड. अंजली हिवाळे. डॉ. किरण वाघमारे, ज्ञानेश्वर मांडेकर यांचा समावेश होता.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
