कणकवली, जि. सिंधुदुर्ग – समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार, पत्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारामध्ये १० हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असा समावेश आहे. निवड समितीत राजन गवस, नितीन रिंढे व रणधीर शिंदे यांचा सहभाग होता. यापूर्वी या पुरस्काराने उल्का महाजन, कॉ. सुबोध मोरे, चंद्रकांत वानखडे व अतुल पेठे यांचा गौरव झाला आहे.
संदेश भंडारे हे गेली ३५ वर्ष छायाचित्रण, लेखन, संशोधन आणि डॉक्युमेंट्री फिल्म क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. तमाशा आणि वारी या महाराष्ट्राच्या दोन महान परंपरा त्यांच्या छायाचित्रणातून दस्तऐवजीकरण होऊन जतन व संवर्धन झाल्या. त्यांच्या “तमाशा – एक रांगडी गंमत”, “वारी – एक आनंदयात्रा” आणि “असाही एक महाराष्ट्र” या पुस्तकांना मोठी दाद मिळाली आहे. “देवळी–कोनाडा” ही त्यांची छायाचित्रमालिका जागतिक कीर्तीचे रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांच्या खाजगी संग्रहात स्थान मिळवते.
भंडारे यांनी महाश्वेता देवी यांच्या कथेवर आधारित ‘म्हादू’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून आदिवासी वंचित समूहाचे प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनांचे कोची, दिल्ली, लंडन, पॅरिस, हॉलंडसह जगभरात आयोजन झाले असून मराठी संस्कृतीचे मान उंचावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
भटक्या (DNT) समाजाच्या प्रश्नांवर ते सध्या “स्वातंत्र्याचा शोध” या विषयावर कार्यरत असून, तमाशा आणि वारी परंपरेचे छायाचित्र संग्रहालय ‘आत्मभान’ चिंचणी, पंढरपूर येथे उभारले जात आहे.
संदेश भंडारे यांना यापूर्वी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (२००८), महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार (२००७), इंद्रधनू पुरस्कार (२००३) आणि ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट पुरस्कार (१९९५) यांसारखे अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या बहुमोल योगदानाची दखल घेतच यंदाचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
