तळकोकणातील रंगकर्मींच्या नाटक – चित्रपट साहित्य पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती
मुंबई – आजूबाजूला काहीही घडू दे, मात्र लोकांनी एकत्र येत बोलत राहिले पाहिजे. पण ज्यांनी बोलू नये ते वायफळ बडबडत आहेत आणि ज्यांनी बोलायला पाहिजे ते बोलतच नाहीत. हा संवाद वाढविण्याचा आणि एकमेकाला समजून घेण्याचा काळ आहे. अशाच काळात तळकोकणातील नाट्यकर्मी एकत्र येत दीपतारांगण क्रिएशनच्या माध्यमातून नाटक चित्रपट साहित्य आणि चळवळ यासंदर्भातले अतिशय गंभीरपणे काम करत आहेत, ही आजची महत्वाची सांस्कृतिक घटना आहे असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी केले.
तळकोकणातील नाट्यकर्मी एकत्र येत दीपतारांगण क्रिएशनच्या माध्यमातून मुंबईत नाटक चित्रपट साहित्य आणि चळवळ आदी संदर्भातील पुरस्कार वितरण सोहळा कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाटककार शफाअत खान, मराठी भाषा विकास संस्थेच्या उपसंचालक तथा कवयित्री अंजली ढमाळ यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई गोरेगाव केशवराव गोरे स्मारक मध्ये आयोजित केला. यावेळी अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांना पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार, कवी सायमन मार्टिन यांना लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना प्रा.गोपाळराव दुखंडे पुरस्कार शफाअत खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी पुरस्कार सोहळ्याचे संयोजक नाटककार उदय जाधव आणि दीपा सावंत खोत त्याचबरोबर पुरस्काराचे परीक्षक नाटककार प्रेमानंद गज्वी,रंगकर्मी दीपक राजाध्यक्ष तसेच लेखक-दिग्दर्शक डॉ अनिल बांदीवडेकर, सुप्रसिद्ध कवी दिनकर मनवर, सुप्रसिद्ध लेखिका निर्मोही फडके, ज्येष्ठ पत्रकार संजय परब, श्रीमती दुखंडे आणि परिवार, अभिनेता कवी अक्षय क्षींपी, टाटा इंस्टूटूटच्या माया बार्शीगे, रविकिरणचे अनिल सावंत, लेखक दिग्दर्शक प्रकाश पवार, प्रिया पवार, अभिनेता नीलेश भेरे तसेच देवानंपिय असोक नाटकातील कलाकार किरण मोरे, आदित्य शिर्के, मधुकर कांबळे, महादेव जाधव, अक्षय तायडे आदी उपस्थित होते.
अजय कांडर म्हणाले, ज्या लेखक- कलावंत यांच्याकडून आपण अपेक्षा बाळगत आहोत त्यांच्याकडून काही अपेक्षाच बाळगू नये अशी परिस्थिती आहे. अशाच काळात जो लेखक कलावंत अस्वस्थ आहे, त्यांनी एकत्र येत चांगलं काम करत राहिलं पाहिजे. म्हणूनच दीपतारांगण क्रिएशनच्या माध्यमातून नाटक चित्रपट साहित्य यासंदर्भातील एक नव सांस्कृतिक काम मुंबईत सुरू करण्यात आले आहे. या चळवळीच्या माध्यमातून ज्यांचा गौरव केला जाईल ते सगळे लेखक कलावंत प्रत्यक्ष समाजाशी जोडलेले गेलेले असतील. कारण आता लिहिणारे खूप आहेत पण व्यवस्थेच्या विरोधात बोलणारे अपवादानेच आढळतात. अशा अपवादाने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या लोकांनाच सोबत घेऊन पुढे जाण्याचा काळ आहे..
अंजली ढमाळ म्हणाल्या, लेखणी आणि कला याची जबाबदारी सत्य दाखविणे आहे.या सत्याचा वसा पेलण्यासाठी काही महत्वाच्या क्वालिटीजची आवश्यकता असते; जी कलाकार, साहित्यिक म्हणून आवश्यक आहे आणि त्यासाठी भेदांच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून उभ राहिले पाहिजे. सच्चेपणा,संवेदनशीलता कमिटमेंट आणि धैर्य,माणसं वाचणं यातून आसपासच्या घटनांचे योग्य अर्थ लावता येणं गरजेचं आहे. हे अर्थ लावत दीप तारांगण क्रिएशनच्या माध्यमातून हा पुरस्कार गौरव सोहळा आयोजित केला गेला याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!
यावेळी पुरस्कार विजेते शुभांगी भुजबळ, सायमन मार्टिन मधुकर मातोंडकर यांनीही विचार व्यक्त केले. दीपा सावंत खोत यांनी सूत्रसंचालन केले. उदय जाधव यांनी स्वागत केले तर निलेश भरे यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
