सखाराम डाखोरे, स्मिता दातार, दिवाकर आचार्य, सूरज चौगुले, आलोक जत्राटकर पुरस्कारांचे मानकरी
वर्धा: महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२६ च्या मारोतराव नारायणे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मारोतराव नारायणे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिवाकर कृष्ण आचार्य (अकोला) यांच्या ‘पीळ’ या कांदबरीला जाहीर झाला आहे.
मारोतराव नारायणे उत्कृष्ट – कथासंग्रह पुरस्कार सूरज चौगुले (इस्लामपूर, सांगली) यांच्या ‘काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा’ या कथासंग्रहाला, उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार सखाराम डाखोरे (वसई, पालघर) यांच्या ‘हूलबिगूल’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला असून उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार आलोक जत्राटकर (कोल्हापूर) यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखिका म्हणून ‘एक होती हिडिंबा’ या कादंबरीच्या लेखिका डॉ. स्मिता दातार (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी ६,००० रुपये रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून २५२ ग्रंथ प्राप्त झाले होते.
पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून नाशिक येथील प्रयोगशील कादंबरीकार व प्रसिद्ध साहित्यिक राकेश वानखेडे, नागपूर येथील शांती विद्या भवनचे प्राचार्य व समीक्षक डॉ. प्रकाश राठोड, तसेच पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर व सूर्यकांत पाटील यांनी काम पाहीले.
मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. साहित्यिक व ‘उपरा’कार लक्ष्मण माने आणि मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा नारायणे यांनी सांगितले आहे.
