स्टेटलाइन –
डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यु झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला. बारामती येथे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच कोसळले, काही क्षणातच मोठा स्फोट झाला, आगीचा मोठा लोळ उसळला आणि अजित पवार यांच्यासह वैमानिक , सहवैमानिक, अंगरक्षक, अटेंडंट यांचाही मृत्यू झाला विमान अपघातात राजकीय नेत्याचा बळी घेणारी ही काही पहिलीच घटना नव्हे. संजय गांधी ( १९८० ), माधवराव शिंदे ( २००१ ), वाय. एस. राजशेखर रेड्डी ( २००९ ), विजय रूपाणी ( २०२५ ) आदी नेत्यांचा विमान अपघातात मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतरही देश हळहळला होता. विमान अपघातात मृत्युंची मालिका आणखी किती काळ चालू राहणार आहे ?
भारतीय राजकारणात विमान प्रवास ही काही चैनिची बाब राहिलेली नाही. कार्यक्रम, दौरे, सभा, निवडणूक प्रचार यासाठी देशभर सर्वच पक्षाचे प्रमुख व उच्च पदस्थ विशेषत: सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री विमानाने सतत प्रवास करीत असतात. जोपर्यंत काही अनुचित घडत नाही तोपर्यंत नेत्यांचे विमान प्रवास नित्य नेमाने चालू असतात. अचानक दुर्घटना घडली की गमावलेला नेता किंवा त्याच्याबरोबर प्रवास करणारे सहकारी परत येत नाहीत. अजितदादांच्या पार्थिवावार बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात लक्षावधींच्या साक्षीने अंत्यसंस्कार चालू असताना, परत या परत या, अजितदादा परत या, असा आक्रोश चोहोबाजूने प्रकट होत होता. लोकांच्या त्यांच्याविषयी भावना प्रेमाच्या व आदराच्या असल्या तरी ते खरंच परत येऊ शकणार आहेत काय ?
आपली विमान प्रवास व्यवस्था सदोष आहे की मानवी चुकांमुळे विमान अपघात होत आहेत ? प्रत्येक वेळी ब्लॅक बॉक्सची तपासणी झाली की विमान अपघाताचे नेमके कारण समजेल असे सांगण्यात येते. आजवर लहान मोठे असंख्य विमान अपघात झाले. त्यात अनेक महत्वाच्या व्यक्तिंचे बळी गेले. विमान अपघात झाल्यावर सर्वसारखेच असतात. प्रसिध्दी केवळ नेते, राजकारणी, सेलेब्रेटींना मिळते. इतर प्रवासी किंवा क्रु मेंबर्स तर दुर्लक्षित राहतात. अजितदादांच्या मृ्त्युनंतर हाच अनुभव आला. फ्लाईट अटेंडंट २९ वर्षांची पिंकी माळी ही मुंबईची. तिचाही विमान अपघातात मृत्यु झाला. तिच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यस्कार झाला. अजितदादांच्या अंत्यसंस्काराचे सर्वच वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशी व्हीव्हीआयपी नेत्यांची तेथे गर्दी होती. मात्र पिंकीच्या मृत्युनंतर विमान कंपनीने किंवा सरकारकडून तिच्या कुटुंबियांशी कोणीही संपर्कही साधला नाही म्हणून तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात अनेक नेते आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी, राजधानीत पोचण्यासाठी विमान प्रवास करीत असतात. प्रवासी विमानतून जाण्याऐवजी नेत्यांना आता खाजगी छोटी विमाने अधिक पसंत असतात. आपल्या सोयीनुसार निघता येते. खाजगी विमानात मोजकेच सहकारी असतात व प्रायव्हसी मिळते. शिवाय प्रवासाच्या वेळेत बचत होते. एकाच दिवसात चार पाच ठिकाणी जाता येते. निवडणुकीच्या काळात तर खाजगी छोट्या विमानांना, हेलिकॉपटर्स, चार्टर्ड फ्लाइटसना राजकीय नेत्यांकडून मोठी मागणी असते. विमानाची देखभाल, नियमित तांत्रिक तपासणी, सुरक्षितता,, हवामान, वैमानिकांचा अनुभव, खाजगी कंपनीचे अगोदरचे रेकॉर्ड, नागरी विमान सेवा संचालनालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र, कंपनीची सेवा, असे अनेक मुद्दे महत्वाचे असतात.
विमान अपघात कुठे ना कुठे होत असतात. पण त्यातून आपण काही बोध घेऊन सुधारणा करणार की नाही ? मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान अपघात होतात हे प्रमुख कारणनंतर ऐकायला मिळते. अनुभवी व उत्तम प्रशिक्षित वैमानिक असणे हे महत्वाचे आहे. सतत उड्डाणामुळे वैमानिकाला पुरेशी विश्रांती मिळाली आहे काय हेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.
बारामतीत कोसळलेले विमान हे व्हीआरएस एव्हीएशन या खाजगी कंपनीचे होते. गेली सोळा वर्ष ते सेवेत आहे. या लिएरजेट विमानाला २०२३ मधे मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार पाऊस व कमी व्हिजिबलटी असताना धावपट्टीवर उतरताना विमान घसरले होते. पण त्यावेळी विमानातील आठही प्रवाशांचे जीव वाचले होते.
लोकसभा माजी अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी आंध्र प्रदेशात हेलिकॉपटर कोसळून मृत्यु झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचे एनडीए सरकार असताना ते लोकसभा अध्यक्ष होते. तेलगु देशमचे बॉस एन. चंद्राबाबू नायडू यांचे ते विश्वासु सहकारी म्हणून ओळखले जात असत. ३१ मार्च २००५ रोजी उद्योगपती व राजकारणी ओ. पी जिंदाल यांचा विमान अपघातात मृत्यु झाला. त्याच विमानात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंग होते, त्यांचाही मृत्यु झाला. जिंदाल हे काँग्रेस सरकारमधे उर्जामंत्री होते तर सुरेंद्र सिंग हे कृषीमंत्री होते. चंदिगडहून दिल्लीली परताना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाला.
अरूणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खंडू यांचा ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु झाला. इटानगरहून तवांगला जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. मोठ्या शोध मोहीमेनंतर पाच दिवसांनी त्याचे अवशेष पाच हजार मीटर उंचीवर बर्फांच्छादीत पर्वतावर सापडले. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा २ सप्टेंबर २००९ रोजी हेलिकॉप्टर कोसळून मृत्यु झाला. चित्तूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी ते निघाले होते. लष्कराच्या मदतीने हेलिकॉप्टरचे अवशेष दाट जंगलात सापडले.
काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात मृत्यु झाला. ते कानपूरला सभेसाठी जात होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळावर मृत्यु झाला. ते स्वत:च खाजगी विमान चालवत होते. त्यांच्या सोबत सुभाष सक्सेना सहवैमानिक होत, विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यांचाही मृत्यु झाला.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यु झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी होते, त्यांचाही मृत्यु झाला. ऑगस्ट २०१६ मधे आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रूपाणी हे मुख्यमंत्री झाले. सन २०२१ च्या मध्यापर्यंत ते या पदावर होते. अहमदाबादच्या दुर्घटनेत भारतीय वंशाचा एक ब्रिटीश प्रवासी मात्र बचावला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न