fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 4, 2026
Home » माझं भारतीयत्व : आत्मशोधातून मानवतेकडे ( उत्तरार्ध )
गप्पा-टप्पा

माझं भारतीयत्व : आत्मशोधातून मानवतेकडे ( उत्तरार्ध )

An introspective journey exploring Indian identity, poverty, caste realities, secularism and humanity through personal experiences, self-reflection and social awakening.
भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध घेण्याचा अखंड प्रवास आहे. गरिबीच्या वनवासात जगणाऱ्या गंगुबाईची वेदना, जातिव्यवस्थेबाबत स्वतःच्या मनातील दडलेले पूर्वग्रह आणि धर्मनिरपेक्षतेविषयीची व्यापक समज या अनुभवांनी लेखकाचे भारतीयत्व घडवले. राष्ट्र, धर्म, समाज आणि माणूसपण यांचा वेध घेणाऱ्या या आत्मकथनातून एका संवेदनशील भारतीयाचा अंतर्मुख प्रवास उलगडतो.

डॉ. यशवंत थोरात

माझी आई म्हणत असे की जगात दर दहा मिनिटांनी एक मूर्ख जन्माला येतो. कदाचित मला उद्देशूनच ती हे म्हणत असावी.
मागचा लेख मी कुठं थांबवला होता? मी पुटपुटलो.
‘मै हिंदुस्तानी हूं—‘ उषानं नेमकं वाक्य सांगितलं.
भारत स्वतंत्र कसा झाला ही एक गोष्ट आहे, पण आपण त्याकडे कसं बघतो ही वेगळी गोष्ट आहे. देशाविषयी प्रेम आणि अविचल निष्ठा म्हणजे काय? स्वातंत्र्यानंतरच्या त्या काळात प्रत्येकाला राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी व्हायचं होतं. सारं वातावरण एका आदर्शवादाने भरून गेलं होतं आणि आमच्यासारखी सामान्य माणसंहि त्यामुळे प्रेरीत झाली होती.

देशासमोरचं दारिद्र्य आणि भांडवलशाही व शोषण यांच्यातील अभद्र युतीची जाणीव असलेल्या काहीजणांनी डाव्या विचारांची कास धरली. देश कसा चालला पाहिजे याविषयीची मांडणी ते साम्यवादी विचारसरणीच्या अंगाने करायला लागले. काहीजणांनी सद्यःस्थितीला आपली अंधश्रध्दा, परंपरागत रुढी आणि पुराणमतवादी जीवनशैली जबाबदार असल्याचं मानून पाश्चात्य जीवनपध्दतीचा अंगीकार केला. तर काहींनी पाश्चात्य मूल्यं आणि भौतिक चंगळवाद यांच्या अगदी विरुध्द जाऊन आध्यात्मिक मार्गाने इतिहासाचा पुन्हा शोध घ्यायला सुरुवात केली.

माझी परिस्थिती ना खुदा हे मिला ना विसाले सनम सारखी होती. माझं भारतावर प्रेम होतं पण विवेकाच्या कसोटीवर पारखून घेतल्याशिवाय देशाच्या कोणत्याहि धोरणाचं समर्थन किंवा प्रशंसा करण्यास मी तयार नव्हतो. चीनच्या हेतुंचा अंदाज चूकल्यामुळे १९६२ च्या युध्दात आपला जो पराभव झाला होता त्यामुळे मनात तीव्र वेदना झाल्या. तरुणाईच्या छातीवरचा गुलाब हिमालयातल्या बर्फात कोमेजून गेल्याचं दुःख माझ्या मनात सलत होतं. इंदिरा गांधी यांच्या गरिबी हटावच्या धोरणाला माझा पाठिंबा होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेश युध्दात विजय मिळवला तेंव्हा सगळ्या देशाबरोबर मीहि जल्लोष केला होता. पण २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागु झाली त्यादिवशी पाचोरा इथं रेल्वेने जात असतांना ती कृती बरोबर नसल्याची स्पष्ट नोंद मी माझ्या डायरीत केली होती. एखादी व्यक्ती कितीहि मोठी असली तरी देशातल्या लोकभावनेपेक्षा आपण मोठे आहोत असं तिने मानू नये असं मी त्या नोंदीत म्हटलं होतं. कोणतीहि गोष्ट वरवर पाहून स्वीकारायची नाही हा माझ्या मनात दडलेल्या ‘भारतीया’चा आग्रह होता आणि आजहि तो कायम आहे.

मी काही काळ जरी राजकीय वर्तुळाच्या जवळ वावरलो तरी ‘आपलंच म्हणणं बरोबर’ हा कुठल्याहि पक्षाचा, नेत्याचा किंवा धोरणाचा दावा मान्य करु शकलो नाही. माझ्या आयुष्यात मी अनेकांना आदर दिला आणि अनेकांची स्तुती केली. पण एक गोष्ट मनात पक्की होती की ते माझ्यासारखेच चिखलामातीचे बनलेले आहेत आणि सर्व मानवांमध्ये असलेली शक्ती आणि दुर्बलता त्यांच्यातहि आहे. आज माझ्या भोवतीच्या तरूणांना पूर्वीच्या राजवटीतली अनिश्चितता आणि ठोसपणाचा अभाव जाणवतो. त्याच्या तुलनेत त्यांना निश्चित आणि योजनाबध्द निर्णय घेण्याचं आकर्षण वाटतं. त्यांच्या बाबतीत काही प्रश्न नाही. तो प्रत्येक पिढीचा अधिकार असतो. माझं म्हणणं एवढच आहे की निर्णय विवेकावर आधारीत असावा. आद्य शंकराचार्यांचा उपदेश कायम स्मरणात ठेवा.

वैराग्य बोधाय पुरुषस्य पक्षिवत
पक्षाऊ विजनीहि विचशांतवम

पक्षाला दोन पंख असतात. उडण्यासाठी दोन्हींची गरज असते. त्याप्रमाणे सत्यशोधकाने सम्यक दृष्टिकोन आणि विवेकाचा आधार घ्यावा. त्यामुळेच माझं भारतीयत्व माझ्या माणुस म्हणजे काय या शोधात गुंतलं आहे. अर्थात तो एक प्रवास नसून अनेक प्रवास आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे मी ज्या संपन्नतेत जन्मलो आणि जी परिस्थिती मी अवतीभवती पाहिली त्यातला विरोधाभास. सगळीकडे विषमता होती. पण लहानपणी मी ती बघीतली का? कदाचित लष्करी वातावरणातल्या भव्यतेत ती विषमता लपली असेल. मेयो स्कूलमध्ये तर ती अस्तित्वातच नव्हती. कोल्हापूरात ग्रामीण भागात गरीब लोक होते, पण ते मी नंतरच्या आयुष्यात पाहिले तसे नव्हते. बॅंकेत असतांना कृषी कर्ज विभागाचा अधिकारी या नात्याने मला देशभर प्रवास करावा लागला . या काळात मला गरिबी काय असते ते खऱ्या अर्थानं कळलं. अर्थात ते समजायला आणि त्यावर मार्ग काढायला खूप वर्षं जावी लागली.

जातीविषयीची गोष्टहि जवळपास तशीच होती. जातीची जाणीव मला मी मेयो स्कूलमध्ये असतांनाच झाली. रजपूत संस्थानिकांच्या मुलांसाठी ती शाळा काढण्यात आली होती. लढवय्यांचे गुण हेच सर्वोच्च आहेत असा एक समज होता. पण त्यात विखार नव्हता. आमच्या घरी तर जातीपातीचा विषयच नव्हता. निवृत्तीनंतर माझे आई वडील कोल्हापूरला स्थायिक झाले. माझ्या वडिलांबरोबर निवृत्त झालेले माझ्या वडिलांचे मदतनीस शिपाई गंगाराम मामा हे आमच्या घरचे सर्वेसर्वा होते. संपूर्ण घरावर त्यांची करडी नजर होती. ते महार रेजिमेंटमध्ये होते हे मला माहित होतं. पण महार असण्यात काही चूक आहे हा विचारहि माझ्या मनाला कधी शिवला नाही.

पददलितांबद्दल आडूनआडून पण बोचरी वाक्यं मी पहिल्यांदा ऐकली जेव्हा मी मुंबईत रिझर्व्ह बॅंकेचा पर्सनल ऑफिसर असतांना माझ्याकडे क्लार्क आणि त्या खालच्या अन्य पदांसाठीच्या भरतीची जबाबदारी सोपविण्यात आली. तेंव्हा रोस्टर हा शब्द मला समजला आणि रोस्टर पॉईंट्स भरायचे नसतात कारण अनुसूचित जाती जमातीचे लोक बिनकामाचे असतात असंहि मला अडून अडून सांगण्यात आलं.

संविधानात राखीव जागा थोड्या कालावधीपुरत्या निर्माण करण्यात आल्या होत्या, पण त्या आता जवळपास कायमच्याच झाल्या आहेत आणि त्या सवलतींचा ज्यांना फायदा मिळतो ते तो आपला जन्मसिध्द अधिकारच मानत आहेत असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यांच्या दृष्टीने ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती आणि अन्य गोष्टींप्रमाणे याचंहि खापर राजकारण्यांवर फोडलं जात होतं.

हा काही भारतातील जाती व्यवस्था किंवा आर्थिक विषमता या विषयीचा निबंध नाही. पण याचा माझ्या अंतर्मनावर काय परिणाम झाला आणि त्याने माझ्या विचारांना कशी दिशा दिली हे सांगणं महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींसाठी कारणीभूत ठरलेले दोन प्रसंग कमालीचे नाट्यपूर्ण आहेत.

मी १९९७ – ९८ या काळात एक वर्षाची अभ्यास रजा घेतली होती. ग्रामीण भागाला ज्याची खरी गरज होती त्या गोष्टी त्यांना कर्जाच्या माध्यमातून मिळतायत की नाही हेही मला पहायचं होतं. विशेषत: शेती करणाऱ्यांपेक्षा आपल्याला जास्त कळतं असं ग्रामीण भागात पतपुरवठा करणाऱ्या आणि त्याबाबतचं धोरण ठरवणाऱ्या मंडळींना नकळत वाटत होतं, ज्यात मीहि एक होतो, आणि त्याबाबत माझा भ्रमनिरास झाला होता. त्यामुळं मला वस्तुस्थिती तपासायची होती.

पश्चिम घाटातल्या एका खेड्यात मी सुमारे एक वर्ष घालवलं. एकेदिवशी मी पाहणीसाठी त्या भागातल्या पडसाली या छोट्या पाड्यावर गेलो. तोडक्या मोडक्या झोपड्यांचा तो एक पाडा होता.

मी तिथल्या एका झोपडीत गेलो, माझी ओळख सांगितली, टेपरेकॉर्डर सुरु केला आणि तिथं असलेल्या गंगुबाई या वृध्द महिलेला तिच्या स्थिती विषयी विचारलं. तिचं उत्तर धक्कादायक होतं. “विकास म्हणजे काय असतं हे काही मला माहित नाही. माझ्या झोपडीला आतापर्यंत कुणी भेट दिली नाही आणि पुढंही कुणी देईल असं वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकत नाही. कृपया इथून जा”असं ती म्हणाली. गरीबीत जन्म घेणं हा एक शाप आहे. गरिबी म्हणजे एका कुलूपबंद खोलीत अडकून पडणं जिची किल्ली परमेश्वरानं बाहेर फेकून दिली आहे. ‘गरीबी लई दांडगा वनवास आहे भाऊ,लई दांडगा वनवास आहे !’ हे तिचं वाक्य माझ्या काळजावर चरे उमटवून गेलं.

गरीबी काही मला नवी नव्हती आणि मी ती पहिल्यांदाच पहात होतो असंही नव्हतं. पण ज्या निश्चलतेनं, भावनाशून्य आवाजात आणि निस्तेज डोळ्यांनी ती जे बोलली त्यानं माझं काळीज जणु उभं चिरलं गेलं. तिच्या त्या वाक्यानं मला स्वत:ला तपासावं असं वाटायला लागलं. मी एक असा माणुस आहे की जो श्रीमंतीत जन्मला आणि आता गरीबांविषयीचा कळवळा दाखवतोय. त्या वाक्याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला.

पठारावरून खाली उतरतांना मनात दाटलेल्या अंधाराशी माझा सामना चालू होता. मनाच्या त्या अवस्थेत मी गरीबीविरुध्दच्या युध्दातील सर्वात ख्यातनाम असलेल्या बांगला देशाच्या ग्रामीण बॅंकेचे संस्थापक महमद युनूस यांना एक पत्र लिहून मदतीची विनंती केली. मला त्यांच्या कार्याची माहिती होती, पण त्यांना कधी भेटलो नव्हतो. माझ्या ड्रायव्हरने दुसऱ्या दिवशी ते पत्र पोस्टात टाकलं. आपण असं काही पत्र पाठवल्याचं मी नंतर विसरूनही गेलो.

त्यानंतर अभ्यास सुट्टीच्या अंतर्गत मी अमेरिकेत गेलो होतो. वॉशिंग्टनमध्ये असतांना एक फोन आला. ‘प्रोफेसर युनूस यांना उद्या सकाळी नाष्ट्याच्यावेळी भेटू शकाल का ?’ या युनूस साहेबांचं नाव त्यावेळी नोबेल पुरस्कारासाठी सर्वात आघाडीवर होतं.

दुसऱ्यादिवशी मी नाष्ट्याच्यावेळी त्यांना भेटलो. माझं पत्र त्यांच्या हातात होतं. हे पत्र तू लिहिलंय का असं त्यांनी विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. तू अंत:करणापासून लिहितोस, एखाद्या कवीसारखं. मग रिझर्व्ह बॅंकेसारख्या रुक्ष संस्थेत कसं काय काम करतो असं ते म्हणाले. माझ्याकडे उत्तर नव्हतं. “तुझा देवावरचा राग निरर्थक आहे, दु:खं माणसानं निर्माण केलंय, त्यानं नव्हे.” तुझ्या प्रश्नांना अंतिम उत्तर देण्याची विनंती तू मला केलीय, पण असं काही उत्तर नसतं. या विश्र्वात गोंधळ आहे की न्याय असं तू विचारलंय. पण ते नेमकं कुणाला माहित असणार? जीवनाचा अर्थ जाणून घ्यायची मला फारशी फिकीर नाही. स्वामी विवेकानंद यांनी एकदा म्हटलं होतं, की सृष्टी हळुहळू विनाशाकडे जात आहे. मला ते मान्य आहे. पण ते घडण्यापूर्वी आपण थोडावेळतरी स्वत:ला विसरून इतरांसाठी काही करणार आहोत का? तू तसं करु शकलास तर तुला जाणवेल की आपल्या प्रयत्नातून इतरांच्या जीवनामध्ये बदल होतांना पाहून जे सुख मिळतं त्या सुखात स्वत:चीच अशी एक वेगळी शक्ती असते. कुठल्याही दु:खावर फुंकर घालणारी. हे काही अंतिम उत्तर नव्हे. पण मी या श्रध्देवर जगत आहे.

तुझ्या विषयी बोलायचं तर तुझा मार्ग तुला स्वत:ला शोधला पाहिजे. ऑफिसमधून थोडा वेळ काढ आणि आपलं पद आणि नाव विसरून ज्यांना कधीच कुठलं पद किंवा नाव मिळालेलं नाही त्यांच्यासाठी काहीतरी कर. ग्रामीण बॅंकेत ये, बांगला देशाच्या ग्रामीण भागात काम कर. कदाचित यातूनच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल.

मी तसं केलं आणि त्यातून अनेक गोष्टी बदलल्या. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. माझा मार्ग मला दिसायला लागला. मी बदललो. चांगला झालो की नाही मला माहित नाही. पण संवेदनशील अधिकारी बनलो.

खूप दिवसांनी गंगुबाईच्या गावात मी पुन्हा गेलो. रस्ता तसाच होता. ते पठार पूर्वी होतं तसंच होतं, आणि दूरवरचं क्षितीजही ! डोंगरावर जाणारी वाट आणि तिच्या कडेकडेनं असणारी झाडंही तशीच होती. तिच्या झोपडीचे आता फक्त अवशेष उरले होते. केवळ दगडांचा ढिगारा ! मला जाणवलं की फक्त मी बदललो होतो. मी बदललो होतो पण गंगुबाई आता कुठल्याही बदलाच्या पलीकडे गेली होती. मी तिच्या आठवणीत क्षणभर तिथं बसलो. मला असं वाटतं की तिच्या खोलीच्या किल्ल्या बाहेर फेकणाऱ्या परमेश्र्वराला त्या पुन्हा सापडल्या असतील आणि तिच्या मृत्युपूर्वी त्यानं त्या तरुंगाची दारं उघडली असतील.

जात या शब्दाची माझी ओळख झाली ती व्यक्तिगत पातळीवर. मला विद्यापीठाच्या स्तरावरील एका व्याख्यानात ‘भारतातील जाती व्यवस्थेच्या विविध बाजू’ हा विषय मांडायचा होता. माझी मोठी कन्या आभा केंब्रिजमधला अभ्यासक्रम संपवून नुकतीच परतली होती. मी भाषणाची तयारी करत असतांना तीहि मदतीला आली. भाषणात तुम्ही नेमके कोणते मुद्दे मांडणार आहात?, तिनं विचारलं. मी असं मांडणार आहे की प्रत्येक समाजात लोकांमध्ये काही न काही फरक असतोच. जोपर्यंत सामाजिक दर्जा ठरविण्यासाठी त्याचा आधार घेतला जात नाही तोपर्यंत त्यात फारसा धोका नाही. पण जेंव्हा हा फरक लादला जातो आणि संपत्ती, उत्पन्न, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी हाच एकमेव आधार मानला जातो तेंव्हा त्यातून अक्षम्य अशी विषमता निर्माण होते.

‘अगदी बरोबर’, ती म्हणाली.

नंतर आम्ही तिचं करिअर, पुढची योजना, लग्न अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. अचानक ती गप्प झाली आणि कुठल्यातरी विचारात हरवून गेली. आणि एकदम विचारलं, ‘मी एखाद्या दलित मुलाशी लग्न केलं तर तुम्हाला चालेल’?

काही क्षण मी नि-शब्द झालो. काळ थांबला.

मला तिला सांगायचं होतं की ‘अगं असं काय विचारतेस ? तू मला पूर्णपणे ओळखतेस. असं झालं तर ते चांगलंच आहे. त्याला विरोध कशासाठी? तुझा आनंद महत्वाचा आहे. जातीपातीचा विचार हे एक थोतांड आहे. बेधडक पुढे पाऊल टाक’. पण हे शब्द माझ्या गळ्यातच अडकले. त्या एका क्षणी माझी उदारमतवादी वृत्ती जी माझ्या व्यक्तिमत्वाची अंगभूत घटक आहे असं मी मानत होतो, ती उघडी पडली. तो एक मुखवटा होता. त्याच्याखाली उच्च जातीतला असल्याचा वर्चस्वाचा एक भाव दडलेला होता. आपल्या वडिलांचं भाषण हे चांगल्या पध्दतीने श्रोत्यांवर फेकलेले कोरडे शब्द आहेत हे तिच्या क्षणार्धात लक्षात आलं. वडिल दलित चळवळीचे खंदे पुरस्कतर्ते होते. पण तोपर्यंतच, जोपर्यंत एक दलित मुलगा त्यांचा जावई म्हणून उभा राहणार नव्हता.

त्या दिवसानंतरच्या घटना हा एक प्रदीर्घ प्रवास आहे. त्या प्रसंगानं मला खूप काही शिकवलं. मुख्य गोष्ट म्हणजे कोणी कितीहि प्रयत्न करो, पण ‘नाहीरे’ वर्ग ‘आहेरे’ वर्गाला कायमच परका वाटत असतो. एकाचं दुःख दुसरा पाहू शकतो पण अनुभवू शकत नाही. तिथं नकार आणि अन्याय हा परंपरेने असतोच. तो अन्याय झुगारून देऊन एक नवा समाज निर्माण करण्याचा ‘नाहीरे’ वर्गाचा प्रयत्न असतो. समाजाचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून उदारमतवाद्यांनी परिस्थितीचं हे वास्तव स्वीकारलं पाहिजे.

म्हणून भाषणं देण्यात, आपल्या उदारमतवादाचं प्रदर्शन करण्यात फारसा अर्थ नाही. उगाच अश्रू गाळण्यापेक्षा प्रत्येकाने जर आपल्या कृतीतून संवेदनशीलतेचा प्रत्यय आपलं कुटुंब, मित्र आणि समाजाला दिला तरी ते पुरेसं आहे. सामाजिक स्थिती सुधारायला त्याचा फार उपयोग होईल.

या गोष्टींनी माझ्या धर्मनिरपेक्षतेला आकार दिला. ‘मी हिंदू आहे’ हे महात्मा गांधीजींचं वाक्य मी स्वतःच्या बाबतीतही अनेकदा उच्चारलं आहे. माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी प्राणही देण्याची माझी तयारी आहे; पण धर्म हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. राज्याच्या धोरणाचा तो भाग असू नये.

एक नागरिक म्हणून माझे हक्क आणि माझी कर्तव्यं इतरांसारखीच आहेत. तात्त्विक मुद्दे काही असले तरी लोकशाहीचे नियम स्पष्ट आहेत. देशातला अल्पसंख्याकवर्ग हा गरीबवर्ग आहे हे मान्य करूनच आपण भविष्यात वाटचाल करायला पाहिजे. हा वर्ग आपल्या समाजाचा एक भाग आहे, म्हणूनच उपलब्ध गोष्टींची न्याय्य आणि योग्य वाटणी झाली पाहिजे. यातल्या त्रुटी शोधून त्यांच्यावर उपाय योजायला हवेत. लोकशाहीनं बहुमताला राज्य करण्याचा अधिकार दिला आहे; पण त्याच वेळी अल्पमताचं रक्षण आणि विकास करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली आहे. राज्यघटनेत तसं स्पष्टपणे म्हटलेलं नसलं तरी राज्यघटनेला तेच अभिप्रेत आहे. अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. त्यासाठी गरज असेल तर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये सुधारणा किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा त्यांच्या संमतीनं फेरविचार करायला पाहिजे. तसं झालं नाही तर किंवा आपण या देशाचे समान घटक आहोत असं अल्पसंख्याकांना वाटलं नाही तर देशाच्या ऐक्याला आणि एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. वास्तववादी उदारमतवाद आणि खरी खरी धर्मनिरपेक्षता या केवळ वरवरच्या गोष्टी नाहीत, तर देशाच्या अस्तित्वासाठी त्या अत्यावश्यक गोष्टी आहेत.
माझ्या या मतांमुळे ‘हा सौम्य हिंदू आहे, असा हिंदू, जो स्वतःच्या धर्माऐवजी इतर धर्मांबद्दल बोलतो,’ अशी टीका माझ्यावर अनेकदा होते.

ही टीका रास्त आहे; पण टीकाकारांचं लक्ष्य चुकीचं आहे. माझ्या विचारांची वाट चुकली आहे, असं म्हणायचं असेल तर ज्या लोकांकडून मी शिकलो, ज्यांना आदर्श मानलं, जे केवळ फुकाचा उपदेश न करता स्वतः आयुष्यात प्रेमपूर्ण आणि सहिष्णुतेनं जगले ते जबाबदार आहेत. त्यांनीच मला शिकवलं की तू हिंदू आहेस ही भाग्याची गोष्ट आहे… त्यांनीच मला सांगितलं की हिंदू असणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे… कारण, त्यात खुले विचार, उदार दृष्टी आणि निर्मळ मन अभिप्रेत आहे. हिंदू मन हे असं मन आहे की ज्यात प्रत्येकाला जागा मिळते…हिंदू असणं म्हणजे आपल्या मनातली मानवता जागवणं आणि इतरांमध्ये माणूस पाहणं होय…इतरांचा स्वीकार, त्यांना सामावून घेणं आणि त्यांना आपल्यात एकरूप करणं हीच त्याची जीवनशैली आहे.

जो धर्म माणसाला अस्तिक किंवा नास्तिक असण्याचं अथवा समूर्ताची पूजा किंवा अमूर्ताची उपासना करण्याचं अथवा देवालयात जाण्याचं किंवा स्वतःमध्येच देव शोधण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देतो असा जगात अन्य कुठलाही धर्म नाही. धर्माची तत्त्वं सांगण्याची पात्रता माझ्यात नाही. मी अगदीच सामान्य आहे. माझा धर्म हा काही
उथळ आणि संकुचित असा अरुंद ओढा नव्हे, जो जराशा उन्हानंही आटून जावा! माझा धर्म हा अमोघ गंगेसारखा आहे, जिनं हजारो वर्षं या भूमीला सुजलाम् सुफलाम् केलं आहे आणि येणारी हजारो वर्षं ती हेच कार्य अविरतपणे करेल…

मैं हिंदुस्थान था…मैं भारत हूँ…मैं हिंदुस्थान रहूँगा.

Related posts

माझी बोली, माझी कथा पुस्तकाच्या निमित्ताने मनोगत

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…

फेब्रुवारीतील तापमान कसे राहील ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!