मुंबई कॉलिंग
ऑन लाइन ते जंतरमंतर….
झुरळ म्हणून हिणवले गेलेले तरुण आता स्वतःलाच ‘कॉक्रोच’ म्हणत रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर सुरू झालेली ही उपहासात्मक मोहीम काही दिवसांतच लाखो तरुणांच्या असंतोषाचे व्यासपीठ बनली आणि जंतरमंतरवर हजारोंचा जमाव जमवून तिने व्यवस्थेला एक स्पष्ट संदेश दिला—आम्हाला दुर्लक्षित करता येईल, पण मिटवता येणार नाही. डॉ. सुकृत खांडेकर
भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी बेरोजगार तरूणांवर केलेल्या टीका टिपणीनंतर अमेरिकेत बोस्टनमधे शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके या ३५ वर्षाच्या तरूणाने सोशल मिडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केल्याची संकल्पना मांडली आणि देशभरातून लक्षावधी तरूणांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. न्या. सूर्य कांत सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीच्या प्रसंगी म्हणाले होते- झुरळांसारखे असे तरूणआहेत, ज्यांना व्यवसायात रोजगार मिळत नाही, काही जण मिडिया, सोशल मिडिया , आरटीआय व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनले आहेत.
प्रचंड बेरोजगारी, बेलगाम महागाई आणि चौफेर पसरलेल्या भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या झेन जी ला आपला आवाज व्यक्त करण्यासाठी कॉक्रोच पार्टीच्या रूपाने जणू नवे व्यासपीठच मिळाले. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरूणांचा उल्लेख झुरळ म्हणून केल्यानेच केवळ उपहासात्मक प्रतिक्रीया म्हणून अभिजीतला कॉक्रोच जनता पार्टीची कल्पना सुचली. त्यातून भारतातील लक्षवधी तरूणांच्या मनातील खदखद बाहेर पडली आणि अवघ्या पाच दिवसात इंस्टाग्रावर त्याला सव्वा दोन कोटी फॉलोअर्स हिट झाले. सन २०१४ पासून देशातील सर्वात मोठ्या शक्तिशाली असलेल्या भारतीय जनता पक्षाचे इंस्टाग्रामवर ८० लाख फॉलोअर्स आहेत. काँग्रेस पक्षाचे १ कोटी ३७ लाख फॉलोअर्स आहेत. नीट आणि सीबीएसइ च्या वारंवार पेपर फुटीमुळे देशातील विद्यार्थी कमालीचे अस्वस्थ व संतप्त आहेत.
स्पर्धा परिक्षेसाठी मोठी जीवघेणी स्पर्धा आहे. नीटच्या परिक्षेला यंदा बसलेल्या पंचवीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहेत. पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. एकीकडे पेपर फुटीने मानसिक ताण तणाव वाढला आहे, उच्च शिक्षण प्राप्त करूनही नोकरी मिळत नाही, रोज वाढणारी महागाई व भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था यामुळे सारा देश हतबल झाला आहे. राज्यकर्ते सबका साथ, सबका विकास ची भाषा बोलत असतात. पण बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या तीन मुद्यांवर डबल- ट्रीबल इंजिन सरकामधील कोणीही नेता किंवा लोकप्रतिनिधी ब्र सुध्दा काढत नाही. नव्या उमेदीने कोणाकडे बघायचे हा तरूणापुढे प्रश्न आहे. म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली हजारो तरूण, विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने सहा जून रोजी दिल्लीत जंतरमंतर वर जमले होते. कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ ऑन लाइन सुरू झाली व जंतर मंतरवर प्रथमच प्रकटली. धर्मेद्र प्रधान इस्तिफा दो, असे फलक अनेकांच्या हाती दिसत होते.
अभिजीत दिपके हा कॉक्रोच पार्टीचा चेहरा आहे. तो दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा सुरक्षा दलाचे एक हजार पोलीस तिथे सज्ज होते. जंतर मंतरवर धरणे कार्यक्रमाला परवानगीचे पत्रही तयार होते. मोदी सरकारच्या बारा वर्षाच्या काळात राजधानी दिल्लीत येऊन कोणतेही आंदोलन करणे हे विरोधी पक्षांना शक्य झालेले नाही. सरकारने नवीन शेतकरी कायदे लागू केल्यावर त्याच्या विरोधात लढाऊ शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर काही महिने ठिय्या मांडला होता. त्यांनाही सरकारने दिल्लीत प्रवेश करू दिला नव्हता. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थानमधून दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यावर उंच उंच बॅरिकटेस उभारली होती.
शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स येऊ नयेत म्हणून रस्त्यात पोलिसांनी स्पीड ब्रेकर्स उभारले होते. एवढेच नव्हे तर रस्त्यात खिळे ठोकले होते. पण असा कोणताही प्रकार यावेळी घडला नाही. पोलिसांनी अभिजीतला दिल्लीत येताच ताब्यात घेतले नाही किंवा अटकही केली नाही. जंतर मंतरकडे जाणाऱ्या मोटारी रोखल्या नाहीत. जंतर मंतरवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सरकार विरोधात अश्लाघ्य घोषणा झाल्या नाहीत. मंत्र्यांना त्यांची नावे घेऊन कोणी शिव्याशाप दिले नाहीत. लाठीमार, अश्रूधूर किंवा निदर्शकांवर पाण्याचे फवारे मारण्याची वेळ पोलिसांवर आली नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, ही एकमेव मागणी आंदोलकांनी केली.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची तुलना सन २०१२ च्या अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाशी झाली. तेव्हाही हजारो लोक अण्णांच्या समर्थनार्थ जमले होते. मै हूँ अण्णा अशा टोप्या त्यांनी घातल्या होत्या. अण्णांच्या आंदोलनावर भाजपाचे नेते खूश होते. आंदोलनातून तत्कालीन काँग्रेसप्रणीत युपीए सरकारची भरपूर बदनामी झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवात अण्णांच्या आंदोलनाचा निश्चितच मोठा वाटा होता. अण्णांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊनच आम आदमी पक्षाची स्थापना झाली. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. अण्णाच्या आंदोलनाला काँग्रेस विरोधी पक्षांचा तसेच असंख्य एनजीओंचा पाठिबा मिळाला होता. सहा जूनच्या आंदोलनात अभिजीत यांना पाठिंबा देण्यासाठी कोणी राजकीय पक्ष जंतर मंतरवर उतरला नव्हता. मै हूँ कॉक्रोच अशा घोषणानी रंगवलेल्या टोप्या मात्र अनेक तरूणांच्या डोक्यावर होत्या. अनेक जण झुरळाचे मास्क लावून फिरताना दिसले. पर्यावरणवादी नेते सोनम वाकंचूक जंतर मंतरवर हजर होते. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनला पाठिंबा जाहीर केला. पाच- सहा तासाच्या आंदोलनातून तत्काळ काही साध्य झाले नाही. पण आन लाइनवर स्थापन झालेली पार्टी जंतर मंतरवर मैदानात बघायला मिळाली.
जंतर मंतरवर कोणी राजकीय नेते नव्हते. धर्मेंद्र प्रधान यांनी आठवडाभरात मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर पुन्हा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिजीत व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनाला सोशल मिडियावर मुस्लिम तरूणांचा मोठा पठिंबा मिळाला पण त्यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलनात मुस्लिम तरूणांनी सहभागी होऊ नये असा फतवा निघाला होता. काही वर्षीपूर्वी दिल्लीतील शहिन बाग येथे मुस्लिम समाजाने केलेल्या आंदोलनाच्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत. त्या आंदोलनात पोलिसांनी शेकडो जणांवर गुन्हे दाखल केले होते. जंतर मंतरवरही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते असा इशारा मुस्लिम तरूणांना समाजातील वरिष्ठांनी दिला होता. अण्णा हजारे यांचे आंदोलन हे काही तासांचे नव्हते, ते मागणी मान्य होईपर्यंत अनेक दिवस चालले. त्यांच्या आंदोलनाचे तेव्हा दिवस रात्र थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांनी केले होते.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची वृत्तवाहिन्यांनी फारशी दखल घेतली नाही. कदाचित सरकार विरोधी आंदोलन म्हणून वृत्तवाहिन्यांचे कॅमरे तिकडे फिरकले नसावेत. कॉक्रोच जनता पार्टीत कोणी मुरब्बी राजकारणी नाहीत. त्यामुळे नियोजन, संयोजन किवा रणनितीत ते कमी पडू शकतात. सरकारने त्यांचे आंदोलन संवेदनशीलपणे हाताळले. पोलिसांनी कुठेही आडकाठी केली नाही. या आंदोलनाला सरकारचा आशीर्वाद होते का, अशीही चर्चा ऐकायला मिळाली. पण भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनावर टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आंदोलन अराजकतेकडे अशी प्रतिक्रीया दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही तरूणांना नकारात्मक भूमिकेकडे नेणारे आंदोलन अशी खंत बोलून दाखवली.
सव्वा दोन कोटी फॉलोअर्स संभाळणे हे अभिजीत दिपके यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. धर्मेद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाच नाही तर पुढे काय हे त्यांना ठरवायचे आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाप्रमाणे कॉक्रोच पार्टीकडे केडर नाही. अन्य संघटनांचा पाठिंबा नाही. झेन जी चळवळ पुढे कशी चालू ठेवता येईल याचा रोड मॅपही तयार नाही.
अभिजीत यांनी एक दिवसाच्या आंदोलनाची समाप्ती करताना म्हटले, तुम्ही आमच्या पोस्ट सोशल मिडियावरून हटवू शकता पण आम्हाला मिटवू शकणार नाही…
