fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 26, 2026
Home » एका स्त्री-कवयित्रीची युद्ध पुकार
मुक्त संवाद

एका स्त्री-कवयित्रीची युद्ध पुकार

Review of Kavita Morvankar’s Marathi poetry collection Udyacha Dahshatgardh Andhar highlighting resistance and humanity

प्रा. गंगाधर मेश्राम ( कल्याण – पश्चिम ) यांनी “उद्याचा दहशतगर्द अंधार” या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेची केलेली समीक्षा…

कवयित्री कविता मोरवणकर यांच्या सर्वच कविता अत्यंत तीव्र, धगधगत्या आणि आजच्या काळाच्या अतिशय जवळ जाऊन बसणाऱ्या आहेत. “उद्याचा दहशतगर्द अंधार” हे शीर्षकच एका अर्थाने संपूर्ण कवितेचं सार सांगून जातं – तो अंधार फक्त रात्रीचा नाही, तो सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचा नरसंहार करणारा आहे.
कवितेची पहिली स्तबकं वाचताना शरीरावर काटा उभा राहतो.
“काळजाच्याही आत
ढवळून निघावं काहीतरी
असह्य कळ मस्तकात जावी
ज्ञानेंद्रिये थरथरावीत”

या ओळी फक्त भीतीचं चित्र नाही रंगवत तर त्या भीतीच्या शारीरिक, मानसिक आणि अस्तित्वाच्या थरापर्यंतच्या घुसमटीचं अचूक वर्णन करतात. “शस्त्रधारी अगडबंब काळोख” आणि “धारदार तलवारीच्या लखलखत्या पाती” ही प्रतिमा इतकी भेदक आहे की वाचकाला आपणच त्या तलवारींच्या रोखाणात आहोत असं वाटतं.
मध्यात मात्र कविता एका धाडसी वळणावर येते.
“तरीही मी निर्भिडपणे उभी
माणुसपणाची ढाल घेऊन”

हा टर्निंग पॉईंट आहे. भीतीचं वास्तव नाकारलेलं नाही, ते स्वीकारलंय आणि त्याच्याशी दोन हात करायची तयारी दाखवलीय. “धर्म, जात, राजकारण नावाच्या अजस्त्र चक्रव्यूहात” ही ओळ तर थेट आजच्या भारतातल्या सर्वात मोठ्या राक्षसी शक्तींकडे बोट दाखवते. हा चक्रव्यूह अभिमन्यूला मारणारा नाही; तो रोज लाखो अभिमन्यूंना जिवंतपणी गिळंकृत करतोय.

शेवटच्या “अस्तित्वाचं सोनेरी स्वप्नं गिळंकृत करेल” या ओळीत प्रचंड नैराश्य आहे, पण त्याचवेळी “मी निर्भिडपणे उभी” मध्ये अपार आशेचा झरा दडलाय. ही कविता पराभवाची घोषणा नाही; ही एका स्त्री-कवयित्रीची युद्ध पुकार आहे.

भाषा अगदी साधी-सोपी आहे, पण ती साधेपणातच भयंकर ताकद आणते. अलंकार फारसे नाहीत, पण प्रतिमा इतक्या तीक्ष्ण आहेत की अलंकारांची गरजच पडत नाही. मराठीतल्या समकालीन स्त्री-कवितेच्या बळकट परंपरेत (इंद्रायणी सावरकर, मेघना पेठकर, हेमांगी खोत…) ही कविता सहज स्थान मिळवते.
एकंदरीत ही कविता वाचून मन सुन्न होतं आणि त्याचवेळी काही तरी करावंसं वाटतं. ती फक्त कविता राहात नाही; ती एक प्रखर राजकीय-सामाजिक विधान बनते.

पुस्तकाचे नाव – उद्याचा दहशतगर्द अंधार
कवयित्री – कविता मोरवणकर
प्रकाशक प्रभा प्रकाशन, कणकवली
किंमत – १६० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – ८९७६३३३६८३

◆ कविता वाचकाला अस्वस्थ करते हेच तिचं यश

कवयित्री कविता मोरवणकर यांच्या ‘उद्याचा दहशतगर्द अंधार’ या संग्रहातील “एक झाड वाढत आहे” ही कविता म्हणजे अंतर्मनातील प्रतिकाराची, अस्मितेची आणि जगण्याच्या अढळ इच्छेची घोषणाच आहे. “एक झाड वाढत आहे / माझ्याही आत”—ही पहिलीच ओळ कवितेचा केंद्रबिंदू ठरते. हे झाड म्हणजे केवळ प्रतिमा नाही; ते विचारांचे, मूल्यांचे, स्वातंत्र्याचे आणि मानवी अस्तित्वाचे रूपक आहे. मुळं अंगोपांगात पसरलेली, त्वचेची भिंत भेदून बाहेर येण्याची शक्यता—हा प्रतिकार इतका खोलवर रुजलेला आहे की तो देह-मन शहारून टाकतो.

कवितेचा दुसरा टप्पा थेट, निर्भीड आणि चेतावणीचा आहे. झाड उपटण्याची लहर किंवा देहच संपवण्याचा निर्णय—दोन्ही प्रसंगांत “एक नाही दोन खून होतील” हा निष्कर्ष सत्ता, हिंसा आणि दडपशाहीला आरसा दाखवतो. विचार मारले तर देहासोबत विचारही मारले जातात—ही कविता हेच सांगते. म्हणूनच ती केवळ आत्मकथन राहत नाही; ती राजकीय-सामाजिक प्रतिरोधाची साक्ष ठरते.

भाषा साधी, पण धारदार. प्रतिमा ठोस, पण बहुअर्थी. ही कविता वाचकाला अस्वस्थ करते—आणि तेच तिचं यश आहे.

प्रल्हाद पारटे,
अध्यक्ष, माझं कवितांचं गाव
जकातवाडी, राजधानी सातारा.

माणूसपण जपण्याची भाषा ही कविता बोलते

कविता मोरवणकर यांची ‘उद्याचा दहशतगर्द अंधार’ मधील कविता संवेदनशील आणि तितकीच विचारी माणसाचं जगणं भोवंडून टाकणाऱ्या वर्तमानाची टोकदार कविता आहे. काही बोलू नये, काही विचार करू नये; एवढ्या दडपशाहीने सभोवतालचा अंधार आपल्याला पोटात घेतो आहे. यातून उजेडाचा टीपूसही दिसू नये, अशा भयाण काळाला सामोरे जाऊन त्यातील अक्राळविक्राळ स्वरूप नेमकेपणाने दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न या कवितेने केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या काळाची ही कविता आहे. आजच्या बेबंदशाहीत काहीच कळत नसल्याने आपणच कोमात गेल्याचे सांगताना, कवयित्री निष्ठुर, कोरड्या झालेल्या समाजमनाचे प्रातिनिधिक चित्र उपहासात्मक शब्दातून व्यक्त करते, तेव्हा या कवितेचे वाचक म्हणून आपण अंतर्मुख होत जातो. तरीही खऱ्या अर्थाने मानवतेच्या जगण्याची आस बाळगताना, कुठल्याच आदिबंधात न मावणारं माणूसपण जपण्याची भाषा ही कविता बोलते. म्हणूनच ती आज जात-धर्मात विभागले गेलेल्या खळखळाटी जगण्याला धडकवून देते. प्रत्येक माणसाने समष्टीशी एकरूप होण्याचे आवाहन करते. पूर्वी भेदाची उत्तरण जात आणि धर्माची होती. आता मात्र जात-धर्माबरोबरच माणसाच्या मेंदूत अनेक भेदाचे स्तर निर्माण झाले आहेत. या सगळ्याची चिकित्सा तीव्रतेने ही कविता करत असल्यामुळे, समग्र जगण्याचं आकलन ‘उद्याचा दहशतगर्द अंधार’ मधून व्यक्त होतं. त्यामुळेच आजच्या समकालीन मराठी कवितेत या कवितेचे मोल मोठे आहे. सततच्या दडपणाचं भयकंपित जगण्याचं कथन या कवितेच्या गाभ्याशी आहे. या कवितेचे अर्थनिर्णयन समजून घ्यायचे असेल तर भविष्य, वर्तमान आणि ‘भूतकाळालाही आपल्याला समजून घ्यावं लागतं. संकुचित वृत्तीला नकार आणि विद्रोहाचा स्वीकार ही भावना कवितेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे, या कवितेचे भविष्य उज्वल आहे. हे निश्चित !

अजय कांडर

Related posts

अस्वस्थ एकांतमधून समदु:खी लोकांचा आशावाद

सहकारी गृहनिर्माण संस्था – पार्किंग एक समस्या ?

चंदगड बोलीभाषा, माती अन् माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तकः उंबळट

Leave a Comment

1 review

wwGiyAjennQYBSUfDLZDXtr December 19, 2025 at 4:04 PM
PrLvXUPKlEJFTJBcP

PdvsUTVMQAEiyZHPt

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!