जिज्ञासे पोटी भराभर पाने पलटून वाचून काढणे आणि संपवणे अशा प्रकारचा हा कथासंग्रह मुळीच नाही. सांजड हा कथासंग्रह जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक एकेक शब्द, वाक्य, प्रसंग, घटना त्यांचे अर्थ वाचणे आणि त्यावर त्या भागातील अर्थानुसार चिंतन करणे अशा पद्धतीने सांजड हा कथासंग्रह वाचायला हवा. भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकबूल करता येत नाही.
लक्ष्मी गायकवाड.
एम. ए. मराठी
सेट. नेट (JRF),पेट. मराठी
सुचिता घोरपडे यांचा ‘सांजड’ हा दुसरा कथासंग्रह, हा कथासंग्रह वाचत असतांना ग्रामीण समाजजीवन, कृषी संस्कृती, उन्हाच्या झळा सोसत आत्मभान जागृत झालेल्या स्त्रियांच्या या कथा आपल्याला आपल्या अंतर्मनात डोकवायला लावणारा हा कथासंग्रह.’सांजड’ या कथासंग्रहात प्रत्येक कथेत उन्हाची तीव्रता सोसून संसाराचा गाडा ओढत मनाची होणारी लाही लाही सुचिता घोरपडे यांनी अचूकपणे टिपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कथा वाचत असताना शब्दांनी, भाषेने नकळत आपल्याला तो प्रसंग जणू आपल्या भोवताली घडत आहे असा भास होतो.
महावीर जोंधळे म्हणतात, “सांजड या कथासंग्रहाबद्दल या दशकातील कथा लेखकांकडे चोखंदळ दृष्टीने पाहिले असता, नव्या पिढीतील सुचिता घोरपडे या कथालेखिकेचे नाव अपेक्षा वाढविणारे आहे.”
मराठी साहित्याला भाषेच्या अलंकृतपणाची, गेयतेची आणि लालित्याची अशी परंपरा आहे. तसेच महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या अस्सलपणाचाही सुगंध आहे, गोडवा आहे. मराठी मातीतला हा रांगडेपणा अनेक मान्यवर ग्रामीण कथाकारांनी कथा आणि काव्याच्या रूपाने शब्दबद्ध केला आहे. मी स्वतः उत्तर महाराष्ट्राचा रहिवासी येथील विदर्भाची भाषा आणि सुचिता घोरपडे यांच्या वास्तव्याचे लेखन आणि लिखाणातील दक्षिण महाराष्ट्रातील भाषा असा हा लेख भाषेला अधोरेखित करून लिहीत आहे.
सुचिता घोरपडे या मूळच्या निपाणी या गावातील. निपाणी गावाला तंबाखूचे कारखाने आहेत. रसायनशास्त्र ही पदवी घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुचिता घोरपडे यांनी स्त्रियांच्या भोवतीचे जे परिस्थितीरुपी रसायन आहे ते रसायन लेखनाच्या माध्यमातून अनुभव विश्वाला फुलवत नेलेले दिसते. मराठी साहित्याला भाषेच्या अलंकृतपणाची गेयतेची आणि लालित्याची जशी परंपरा आहे, मराठी मातीतला रांगडेपणा हा अनेक लेखकांच्या लेखनातून आपल्याला खेळवून ठेवतो. प्रत्येक लेखकाची भाषा निराळीच भाषेतील अंतर पाहताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा लागतो. येथे मात्र कौशल्य अपेक्षित असते. अधून मधून म्हणींचा वापर करून नीती मूल्यांची केलेली जपणूक किंवा मोडतोड करून ही लवचिक अंगाने अपेक्षित असते. बोली भाषेतील सौंदर्य आणि गोडवा एकत्र आणला की निर्माण होणारा जिव्हाळा हा सुचिता यांच्या लेखनातून कायमच झळकतांना दिसतो. प्रत्येक प्रांताची एक खाद्य संस्कृती असते ,पोशाख संस्कृती असते तशीच एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड. सांगली, कोल्हापूर ,नागपूर ,नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात.
जिज्ञासे पोटी भराभर पाने पलटून वाचून काढणे आणि संपवणे अशा प्रकारचा हा कथासंग्रह मुळीच नाही. सांजड हा कथासंग्रह जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक एकेक शब्द, वाक्य, प्रसंग, घटना त्यांचे अर्थ वाचणे आणि त्यावर त्या भागातील अर्थानुसार चिंतन करणे अशा पद्धतीने सांजड हा कथासंग्रह वाचायला हवा. भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकबूल करता येत नाही.
व्याकरण हे पुस्तके आणि परीक्षा यांच्याशी जास्त कटिबद्ध असते. ते रोज जिभेवरच्या भाषेत फार काळ टिकत नाही आणि टिकवले जात देखील नाहीत. भाषेच्या विविध प्रकारच्या अविष्कारांमध्ये व्यवहारभाषा, साहित्यभाषा, आणि शास्त्रभाषा हे प्रतिनिधिक स्वरूपाचे परस्परभिन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण असे अविष्कार आहेत. नित्याच्या व्यवहारात आपण विशिष्ट प्रदेशाची विशिष्ट समाजाची आणि विशिष्ट काळाची निगडित अशी बोली वापरत असतो. तीच बोली सुचिता घोरपडे यांच्या कथेमध्ये अनुभवायला मिळते. ती बोलणाऱ्या व्यक्तींपुरती मर्यादित आणि तत्कालीक स्वरूपाची असते, ते विशिष्ट व्यक्ती व समाज या पुरते मर्यादित नसते. ते सार्वत्रिक आणि सर्वकालिक असते, त्यामुळे त्यांची भाषा सर्वसमावेशक अशी प्रमाणभाषाच असते रोजच्या व्यवहारातील व्यक्ती आपापसात बोलत असतात. तेव्हा त्यांच्या बोलींवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे उमटलेले असतात. साहित्याच्या सामाजिकतेची सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे भाषा होय.समाजातूनच साहित्यनिर्मिती होत असते ती अर्थातच समाजाच्या भाषेतून होत असते. भाषा ही समाजाची निर्मित असते .समाजाविना भाषा संभवत नाही आणि समाजाचा सर्व व्यवहार हा भाषेतून होत असतो. तोच व्यवहार सुचिता घोरपडे यांच्या कथेमध्ये जाणवतो.
सुचिता घोरपडे यांच्या सांजड या कथासंग्रहातील “हुरदं ”ही कथा मला काळीज पिळवटून टाकणारी वाटली, बालवयात आलेलं शहापण,३.. ४ वय वर्ष असलेली ही मुल शहाण्या माणसाला लाजवतील, परिस्थितीला भीक न घालणारी त्यातून बाहेर पडण्यासाठी हिंमतीने लढणारी आहेत. त्यातील तानी नावाचं पात्र मनात घर करुन जातं, “ओ दादा…ओ काका…हिकल या…लाल लाल सलबत…. थंदगाल सलबत.”
तिच्या या गोड आवाजाला भुरळ पडून लोकांची जमलेली गर्दी. स्थिती आणि परिस्थिती कसे माणसाला घडवते बिघडवते याचे दर्शन या कथांमधून होते.यातील बऱ्याच कथा काळजाला हात घालतात. सांजड या कथासंग्रहाच्या मुख्यपृष्ठ तळपत्या सूर्याचे तेज ग्रामीण,कृषी संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. कोल्हापुरी भाषेतील संदर्भ, नविन शब्द कामगार स्त्रियांची रोजची भाषा याचे दर्शन होते. ग्रामीण लेखकांच्या मांदियाळीत सुचिता घोरपडे हे एक अजुन एक नाव ओवले गेले आहे. सांजड हा कथासंग्रह जाणीवपूर्वक वाचायला हवा.
पुस्तकाचे नाव – सांजड । कथासंग्रह
लेखक : सुचिता घोरपडे
प्रकाशक: सॅम पब्लिकेशन्स
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे : १३६ | किंमत : १८० ₹
मूल्य- १८० ₹ (घरपोच, पोस्टेज फ्री )
Online Booking साठी
Google Pay / Phone Pe – 9823015319
