डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ ‘स्मार्ट शेती, भरघोस प्रगती’

ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि जनावरांच्या गळ्यात स्मार्ट सेन्सर ! कालपर्यंत स्वप्न वाटणाऱ्या या गोष्टी आज शेताच्या बांधावर प्रत्यक्ष उतरल्या आहेत. पारंपरिक अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची धार देऊन शेतीला खरा नफा मिळवून देणारी ही क्रांती नक्की काय आहे?” याचा उहापोह करणारा हा लेख.
हवामानातील तीव्र बदल, अवेळी येणारा पाऊस, जमिनीचा घटणारा कस आणि मजुरांची भासणारी तीव्र टंचाई या पार्श्वभूमीवर भारतीय शेती क्षेत्र सध्या एका मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीत केवळ मेहनतीवर अवलंबून राहून अपेक्षित उत्पादन मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा वेळी संगणकीय बुद्धिमत्ता, उपग्रह यंत्रणा, मानवरहित हवाई वाहने म्हणजेच ड्रोन आणि विविध डिजिटल प्रणालींचा शेतीत वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाची आणि शेतीची अचूक सांगड घातल्यास पिकांचे नुकसान तर टळतेच, शिवाय शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन एकूण उत्पादकतेत मोठी वाढ साधता येते.
निर्णयांची अचूकता:
पारंपरिक शेती आणि तंत्रज्ञानाधारित शेती यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे निर्णयांची अचूकता होय. पूर्वी शेतकरी केवळ अनुभवावरून किंवा अंदाजावर आधारित निर्णय घेत असत. जसे की, खत कधी द्यायचे, फवारणी कधी करायची किंवा पाणी किती द्यायचे. मात्र आता डिजिटल प्रणालींमुळे शेती अंदाजावरून चालण्याऐवजी अचूक माहितीवर आधारित झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अहवालानुसार, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतीतील उत्पादन खर्चात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होते आणि उत्पन्नात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत थेट वाढ होऊ शकते.
पिकांचे रक्षण:
पिकांवरील रोग आणि कीड नियंत्रण हा शेतकर्यांच्या चिंतेचा मुख्य विषय असतो.अनेकदा रोग पसरल्यानंतर शेतकरी फवारणी करतात, ज्यामुळे आधीच मोठे नुकसान झालेले असते. आता मोबाईल प्रणालीच्या माध्यमातून पिकाच्या बाधित भागाचे छायाचित्र काढताच क्षणात रोगाचे अचूक निदान होते आणि त्यावर कोणती फवारणी किती प्रमाणात करावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन मिळते. देशात सध्या १ लाखांहून अधिक शेतकरी अशा संगणकीय प्रणालींचा वापर करून वेळेवर उपाययोजना करत आहेत. यामुळे पिकांचे सुरुवातीच्या टप्प्यातच रक्षण होते आणि अयोग्य कीटकनाशकांच्या वापरावर होणारा अतिरिक्त खर्च टळतो.
‘नमो ड्रोन दीदी’:
ड्रोन तंत्रज्ञान आणि सूक्ष्म उपग्रह डेटाने शेतीची पाहणी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. मानवरहित विमानांद्वारे काही मिनिटांत संपूर्ण शेताचा नकाशा तयार केला जातो. शेतातील कोणत्या भागात पाणी कमी पडत आहे, कुठे पिकाची वाढ खुंटली आहे किंवा कोणत्या भागात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, याची माहिती रंगीत नकाशांच्या स्वरूपात शेतकर्याला मिळते. यामुळे पूर्ण शेतात विनाकारण रसायने किंवा खत पसरण्याऐवजी केवळ गरज असलेल्या भागावरच अचूक फवारणी केली जाते. केंद्र सरकारच्या ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेअंतर्गत देशातील सुमारे १५ हजार महिला बचत गटांना ड्रोनचे प्रशिक्षण व साधनसामग्री देण्यात येत आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगारासोबतच आधुनिक शेतीला मोठा वेग मिळत आहे. एका एकर शेतात फवारणीसाठी पारंपरिक पद्धतीने ३ ते ४ तास लागतात आणि शेकडो लिटर पाणी खर्च होते; मात्र ड्रोनच्या साहाय्याने हीच फवारणी अवघ्या ७ ते १० मिनिटांत आणि ९० टक्के कमी पाण्यात पूर्ण होते.
मातीचे आरोग्य आणि जलव्यवस्थापन:
हा उत्पादकता वाढवण्याचा पाया आहे. जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण न तपासता रासायनिक खतांचा अतिवापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. आता बाजारात उपलब्ध असलेल्या पोर्टेबल माती परीक्षण यंत्रांद्वारे अवघ्या काही मिनिटांत जमिनीची धूप, सेंद्रिय कर्ब आणि खतांची गरज समजते. तसेच, जमिनीत बसवलेल्या स्वयंचलित संवेदकांमुळे (सेंसर) मातीतील ओलाव्याचे प्रमाण थेट भ्रमणध्वनीवर कळते. जेव्हा जमिनीला खरोखर पाण्याची गरज असते, तेव्हाच सूक्ष्म सिंचन यंत्रणा आपोआप सुरू होते. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार, या पद्धतीमुळे शेतीतील पाण्याची सुमारे ४० ते ५० टक्के बचत होते आणि पिकाच्या मुळांना गरजेनुसार पाणी मिळाल्याने उत्पादनाची गुणवत्ता उत्तम राहते.
हवामानाचा अंदाज आणि बाजारपेठेची जोड: हे या तंत्रज्ञानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जागतिक हवामान बदल आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (CGIAR) अभ्यासानुसार, अचूक हवामान अंदाजावर आधारित शेती केल्यास नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे पिकांचे नुकसान ४० टक्क्यांनी कमी करता येते. डिजिटल प्रणालींद्वारे शेतकर्यांना ढगफुटी, गारपीट किंवा वादळाची पूर्वसूचना ३ ते ४ दिवस आधीच मिळते, ज्यामुळे काढणीस आलेले पीक वाचवणे शक्य होते. याशिवाय, देशातील प्रमुख बाजार समित्यांमधील आवक आणि दरांचे विश्लेषण करून आगामी काळात पिकाला काय भाव मिळू शकतो, याचा अंदाजही या प्रणाली देतात. यामुळे शेतकरी आपला माल योग्य वेळी आणि योग्य बाजारात विकून अधिक नफा मिळवू शकतात.
‘स्मार्ट सिंचन आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान’:
उसाच्या आणि फळबागांच्या शेतीमध्ये ‘स्मार्ट सिंचन आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान’ उत्पादकता वाढवण्यासाठी क्रांतिकारी ठरत आहे. जमिनीत बसवलेले सेन्सर्स मातीतील ओलावा आणि खतांची पातळी मोजतात. आवश्यकतेनुसार स्वयंचलित ड्रिप सिस्टीम सुरू होऊन उसाच्या मुळांना थेट विरघळलेली खते आणि पाणी दिले जाते. यामुळे उसाचे एकरी उत्पादन ६० टनांवरून थेट १०० टनांपर्यंत वाढल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाहायला मिळतात. तसेच, सफरचंद आणि द्राक्ष बागांमध्ये ‘स्मार्ट कॅमेरा व रोबोटिक्स’ च्या माध्यमातून फळांचा रंग आणि आकार तपासून आपोआप वर्गवारी (Grading) आणि काढणी केली जाते, ज्यामुळे मनुष्यबळाचा खर्च ६० टक्क्यांनी घटतो.
भारतात तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये झालेल्या विविध प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे की, तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या कपाशी, द्राक्ष, डाळिंब आणि भात पिकांच्या उत्पन्नात २० ते ३० टक्क्यांची भर पडली आहे. परंतु, हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यात काही आव्हाने नक्कीच आहेत. साधनांची सुरुवातीची किंमत, ग्रामीण भागातील इंटरनेटची उपलब्धता आणि तांत्रिक साक्षरतेचा अभाव या प्रमुख अडचणी आहेत. यासाठी पंचायत स्तरावर तंत्रज्ञान भाड्याने देणारी केंद्रे उभारणे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान हे शेतकर्याच्या अनुभवाला पर्याय नसून त्याच्या अनुभवाला अधिक धार देणारे एक प्रभावी साधन आहे. जेव्हा पारंपरिक ज्ञान आणि संगणकीय तंत्रज्ञान एकत्र येतात, तेव्हा शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता एक फायदेशीर उद्योग बनू शकते. येत्या काळात भारतीय शेतीला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे हाच सर्वात शाश्वत आणि यशस्वी मार्ग ठरेल.
( लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. )
