सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अर्थात शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदू धर्मावर निष्ठा होती. ते धर्माभिमानीही होते, तरीही ते धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी नेहमीच सहिष्णुतेचे धोरण अवलंबले आणि आपल्या राज्यात सर्व जातिधर्माच्या लोकांना आश्रय दिला. इतकंच नाही, तर कोणत्याही स्वरूपात धर्मभेद, जातीभेद न करता महाराजांनी शूर, पराक्रमी आणि एकनिष्ठ लोक आपल्याभोवती गोळा केले. त्यांनी कायमच हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल उदार आणि पुरोगामी दृष्टिकोन बाळगला. स्वराज्यातील सर्व धर्मांच्या बांधवांना सन्मान देत सामाजिक सलोखा निर्माण करत सर्वाथनि हिंदवी स्वराज्य बळकट केले. जगभरात सर्वांनीच गौरविलेल्या शिवरायांच्या या सहिष्णू धार्मिक धोरणाची प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी आपल्या या ग्रंथात साधार, तपशीलवार चर्चा केली असून समाजस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ती मार्गदर्शक ठरणारी अशी आहे.
प्रा. (डॉ.) अरुण भोसले
माजी प्रमुख, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराजांची गणना भारताच्या इतिहासातील श्रेष्ठ राज्यकर्त्यांमध्ये केली जाते. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक दुसरा पुलकेशी, अकबर अशा विख्यात राज्यकत्यांच्या मालिकेत शिवाजी महाराजांचा समावेश केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत.
मध्ययुगीन भारतातील समाजजीवनावर धर्माचा फार मोठा पगडा होता. सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. नव्या युगाचा प्रारंभ झाला. असामान्य धैर्य व धार्मिक सहिष्णुता या गुणांचा महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात समन्वय झाला होता. शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. हिंदू धर्मावर त्यांची निष्ठा होती. आपण हिंदू असल्याबद्दल त्यांना अभिमानही होता त्यांनी हिंदूमधील स्वाभिमान जागृत केला, धर्म प्रेम जागृत केले आणि आपल्या धर्मबांधवांना अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. शिवाजी महाराज हिंदूच्या धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.
शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक वृत्तीचे असले तरी ते धर्माध, धर्मवेडे नव्हते. त्यांनी नेहमी धर्म, सहिष्णुतेचे धोरण अवलंबले. त्यांनी आपल्या राज्यात सर्व जातिधर्माच्या लोकांना आश्रय दिला. सैन्यात नोकरी देताना धार्मिक दृष्टी ठेवली नाही. महाराजांनी शूर, पराक्रमी आणि एकनिष्ठ लोक आपल्याभोवती गोळा केले. सर्व धर्मातील लायक लोकांना त्यांनी आपल्या नोकरीत घेतले. त्यांनी मुस्लिमांनाही अधिकार पदे दिली. डॉ. इस्माईल पठाण यांनी म्हटल्याप्रमाणे “… पात्र असतानाही अपात्र ठरविलेल्या भूमिपुत्रांना रोजगार आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊन हिंदवी स्वराज्य सर्वार्थाने बळकट होण्यास मदत झाली.”
शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लीम रयतेला धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले. त्यांचे धर्मग्रंथ व धर्मस्थळे यांना धक्का लावला नाही. त्यांचे धार्मिक विधी व समारंभ यांना प्रतिबंध न करता त्यांना सन्मान देत सामाजिक सलोखा निर्माण केला. शिवरायांनी परधर्मातील साधूसंतांचा आदर केला. मुस्लीम धर्माच्या धर्मस्थळांना संरक्षण दिले. त्यांच्या खर्चासाठी उत्पन्न लावून दिले. परधर्मीय स्त्रियांना त्यांनी कधीच त्रास दिला नाही. उलट महाराजांनी त्यांना आदरपूर्वक सन्मानाने वागवले.
शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाचा सर्वांनीच गौरव केला आहे. शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार बनला. मराठे, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा तिरस्काराने उल्लेख करणारा मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान याने शिवाजी महाराजांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाची प्रशंसा करणारा अभिप्राय व्यक्त केला आहे.
त्याने म्हटले आहे, “लोकांच्या घरादारांची राखरांगोळी करून मोठमोठ्या लोकांची मानखंडना व अवहेलना करणारा हा शिवाजी आपल्या कुराण, बायबल यांचा अपमान कधीही करू देत नसे. तसेच कवकांच्या अबूला यत्किंचितही पक्ट करताना उससे बर्तन देत नसे. मालमत्तेची जाळपोळ व लूट करताना जर त्याला कुराण किवा बायबल आढळले तर ते तो मोठ्या आदरपूर्वक जवळ घेई व आपल्या नोकरबर्गातील मुसलमान अगर खिस्ती धर्मियांना देत असे. कैद केलेल्या स्त्रियांच्या मग त्या हिंदू अगर मुसलमान असोत अबुला कोणाला धक्का लावू देत नसे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे पापदृष्टीने न पाहण्याची सक्त ताकीद असे.”
प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण हे मराठ्यांच्या इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक, संशोधक आणि विख्यात लेखक आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ (२०१८) आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (२०२१) या दोन चरित्रग्रंथांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. पठाण यांनी अलीकडेच ‘शिवरायांची धर्मनीती’ हा छोटेखानी संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. डॉ. पठाण यांनी शिवरायांच्या धर्मनीतीची आपल्या ग्रंथात साधार, तपशीलवार चर्चा केली असून ती समाजस्वास्थ्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल अशी आहे.
शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
