स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये डॉ. ऊर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण…
सर्व रसिक आणि साहित्यप्रेमींना नमस्कार. आजच्या या दुसऱ्या अध्यक्षीय भाषणासाठी मी उभी आहे. सर्वप्रथम या प्रकारचे संमेलन भरवल्याबद्दल संयोजकांचे मी मनापासून अभिनंदन करते. अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची गरज ओळखून लेखिकांना व्यासपीठ मिळवून देणे हे कौतुकास्पद आहे. स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणारे पुरस्कार ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
१. ताराबाई शिंदे स्त्रीवादी लेखन पुरस्कार – शिल्पा कांबळे, मुंबई.
२. सावित्रीमाई फुले समाजप्रबोधन पुरस्कार प्रा. डॉ. विजया गेडाम, चंद्रपूर.
३. स्नेहलता मारुती पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रा. डॉ. नागोराव कुंभार, लातूर.
४. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्रा. डॉ. नारायण भोसले, मुंबई. या सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे मी अभिनंदन करते.
साहित्य संमेलनाचा सगळा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक हात लागतात. परंतु त्यातल्या श्रीकृष्णाच्या बळकट हाताचे बळ प्रा. समाधान दहिवाळ यांनी पुरवले आहे. साहित्य व्यवहारात तन मन आणि धनाने स्वतःला झोकून देवून काम करणारे प्रा. दहिवाळ सर कधीही पहा साहित्य विषयक जगातच असतात. ‘शब्द हाच ‘श्वास’ अशी त्यांची अवस्था असते. आज या निमित्ताने साहित्य विश्वातल्या अनेक लेखिका एकत्र आलेल्या आहेत. दलित लेखिका, आदिवासी लेखिका, स्त्रीवादी लेखिका वगैरे, यासर्वांमध्ये वैचारिक घुसळण होणे अपेक्षित आहे.
आसवांचं गोंदण गं ।
बाई कुठे कुठे लेवू ।
पापणीच्या कोंदणातून ।
नको निखळू ग देवू ॥१॥
जन्म सारा लोटला गं ।
लेणं दुःखाचं लेवून ।
पैठणीच्या पदरात ।
जरतारी त्याची खूण ॥२॥
कमावत्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रियांचे प्रश्न वेगळे, कष्टकरी भगिनींचे प्रश्न वेगळे, गिरीजन आणि आदिवासी भगिनींचे प्रश्न अजूनच वेगळे आणि शिक्षित पण आर्थिक दृष्ट्या परावलंबी स्त्रिया त्यांचे प्रश्न निराळे, ग्रामीण महिलांचे निराळे – या सर्वांच्या भावभावनांचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटतं आहे का ? झेन झी च्या बंडखोर वागण्याचे कारणे, त्यांचे भावनिक विश्व त्यांना तोंड द्यावया लागणाऱ्या तीव्र स्पर्धेचा मारा हे सुद्धा त्यांची Global (So called) जीवनशैली साहित्यात आलं पाहिजे. जागतिकीकरणामुळे समाज जीवन घुसळून निघाला आहे. जुन्या चौकटी मोडून चाललेल्या आहेत. पण नव्या चौकटी तयार आहेत का? की सगळीच मोडतोड करून आपण उद्ध्वस्तपणा आणतोय आयुष्यात? हे ही विचारमंथन झालं पाहिजे. स्त्रियांच्या लेखनाचा फार मोठा भाग स्त्रीचे पांरपरीक चित्र रेखाटणारा आहे. सुखासिन आणि आत्मतुष्ट वृत्तीच्या कोषात अडकलेले लेखन भावविश आणि कृतक होते. रंजनप्रधान साहित्य निर्माण करण्याच्या नादात अशी विपुल साहित्यनिर्मिती होते आहे हा चिंतेचा विषय आहे. स्त्रीवादी साहित्य निर्मिती करताना उच्चवर्गीय, मध्यवर्गीय आणि उपेक्षित या थरांमधील लेखिकांच्या जाणीवा खूप भिन्न आहेत हे लक्षात येते. मुक्त जीवन, पाश्चिमात्य सुखासीन आणि स्वैर जीवनशैली, अतिरेकी व्यक्तिवाद यात उच्चवर्गिय लेखिका गुरफटलेल्या आहेत. पाश्चात्य स्त्रीवादाचे अंधानुकरण त्या करताना दिसतात. वंचित वर्गातील स्त्रियांपुढे रोजच्या जगण्याचेच प्रश्न जटिलपणे ‘आ’ वासून उभे असतात. त्यामुळे स्त्रीवाद, चळवळ स्त्रीवादी लेखन हे त्यांच्यापर्यंत पोचणे अवघड असते. त्यामुळे अस्सल जीवनानुभव, मानवतेची आस, जीवनाची प्रगल्भ जाण असल्याशिवाय अव्वल साहित्यनिर्मिती होऊ शकणार नाही. लेखकाने आपली भूमिका नेहमी लख्खपणे मांडली पाहिजे. सामान्य माणसाच्या भावभावनाचे प्रतिनिधित्व करणं, लेखनातून दुरितांची, पददलितांची व्यथा मांडणं हे लेखक म्हणून आपलं काम आहेच. परंतु कुठल्याही सरकारच्या वळचळणीला गेलं की आपले हात बांधले जातात, आपण मिंधे होत जातो. त्यामुळे कुठल्याही सरकारच्या विरोधतच आपण असलं पाहिजे. म्हणजे लोकशाही, मानवता यांच्याच बाजूने असलं पाहिजे. कुठल्या तरी पुरस्कारासाठी, सन्मानासाठी जी जी करून बोटचेपं धोरण पत्करणं हे खऱ्या साहित्यिकाचे लक्षण नाही. आपण नेहमी व्यवस्थेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे.
समाजाला विवेकाची दिशा दाखवली पाहिजे सध्या समाजामध्ये जी नीतीमुल्याची घसरण होते आहे, ती रोखण्याचं काम समाजातल्या विचारवंतांचं, लेखकाचं आहे. काचेच्या मनोऱ्यात बसून साहित्य निर्मिती करणारे लेखकराव कितपत सकस साहित्य निर्माण करू शकतील याची शंकाच आहे.
दायम आबाद रहेगी दुनिया
हम न होंगे कोई हम सा होगा
नसिर काजमी या कवीच्या ओळी आपल्याला दिलासा देतात, लिहिण्याचं आणि लढण्याचं बळ देतात. आपल्याला बंडखोर स्त्री लेखिकांची मोठी परंपरा आहे. महादंबा, संत सोयराबाई, संत कवयित्री जनाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, बहिणाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, मालतीबाई बेडेकर (विभावरी शिरूरकर), विद्या बाळ, इरावती कर्वे, ऊर्मिला पवार, शांता गोखले, ताराबाई मोडक, गौरी देशपांडे, शर्मिला रेगे, हिरा बनसोडे, प्रज्ञा दया पवार, नीरजा प्रिया तेंडूलकर या बंडखोर लेखिकांचा वारसा मराठी भाषेला आहे.
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म ।।
तसं संत सोयराबाईंनी म्हणून ठेवलं आहे. बंडखोरीचा वारसा मराठवाड्यातल्या स्त्रियांना त्यांच्या आज्या पणज्यांकडूनच मिळालेला आहे. स्त्रीशिक्षणाचा मज्जाव होता, निझामी राजवटीमुळे अनन्वित अत्याचार होते. पण महिला मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचे वारे अनुभवत आहोत.आशाताई वाघमारे, दगडाबाई शेळके, गोदावरीबाई टेके, कावेरीबाई बोधनकर, राजकुंवर काबरा, ताराबाई लड्डा, करूणाबेन चौधरी, गीताबाई चारठाणकर, ताराबाई परांजपे, प्रतिभाताई वैशंपायन, कमलाबाई चाकूरकर अशी कित्येक नावं आहेत आणि अनामपणे काम करणाऱ्या असंख्य महिला निजामी राजवट उलथवून टाकण्याच्या जिद्दीने स्वतःचं शील धोक्यात टाकून चळवळीत सामील झाल्या. महादंबा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. लता बोधनकर, सुहासिनी इर्लेकर, अनुराधा पाटील, अनुराधा वैद्य, वृंदा दिवाण, तारा भवाळकर, छाया महाजन, रेखा बैजल, ललिता गादगे, लता मोहरीर, कमल देसाई, गौरी देशपांडे, शांता निसळ, प्रिया तेंडूलकर, मेघना पेठे, ऊर्मिला पवार, रजनी परूळेकर, नीरजा, प्रज्ञा दया पवार, वेदिका कुमारस्वामी, नीलम माणगावे, अरुणा ढेरे, आसावरी काकडे, सिसिलीया कार्वाल्हो, विजया राजाध्यक्ष, छाया दातार, अश्विनी धोंगडे, अंजली कुलकर्णी, सुजाता शेणई, मथु सावंत, शांता जोशी, संगिता बर्वे ही आणखी काही उल्लेखनीय नावे. बेबी कांबळे, जनाबाई गिहे, कुमुद पावडे, शांताबाई कांबळे, मुक्ता सर्वगोड या दलित स्त्रियांच्या आत्मकथनाचा उल्लेख करायलाच हवा.
१९९८ साली माझा पहिला कवितासंग्रह ‘चांदण चाफा’ प्रकाशित झाला, खरं तर कविता लेखन फार आधीपासून चालू होतं. या कवितांचं बाड तसंच वनवासात असल्यासारखं पडून होतं. लग्नानंतर आमचं हॉस्पिटल पैठणला सुरू झालं. तिथे कुणीच स्त्रीरोग – प्रसूतितज्ञ नव्हते. त्यामुळे पेशंटचा अखंड ओघ सुरू झाला. पहिले सोनोग्राफी मशीन, पहिले ऑपरेशन, पहिले सिझेरीयन, पहिली आय. यु. आय. (वंध्यत्व उपचार) अशा अनेक नव्या सुविधा घेऊन आम्ही लोकांना अद्यावत सुविधा देत गेलो. अहोरात्र ज्याला इंग्रजीमध्ये 24 बाय 7 म्हणतात तशी सेवा सुरू होती. नीट झोप अनेक वर्षे मिळालीच नाही. मदतील नीट मदतनीस मिळत नसत. त्यामुळे लेखन वगैरे गोष्टींना वेळ कुठला मिळायला ?
मग डॉ. शांताबाई जोशी यांनी मला झोपेतून उठवलं – म्हणाल्या “अगं तुझं हॉस्पिटल अव्याहतपणे चालूच राहील. मग इतक्या चांगल्या कविता तशाच तशाला बासनात बांधून ठेवणार का? त्यांना उजेडात आण मी करते प्रकाशित.” मग कविता निवडणे, त्यांचा क्रम लावणे, संग्रहाच्या पाठराखणीसाठी फ. मु. शिंदे यांना भेटणे हे सगळं सुरू झालं. मुखपृष्ठ माझी चित्रकार मावस बहिण डॉ. अंजली दीक्षित हिने तयार केलं. मग मावशीचा फोन आला – पुस्तकासाठी एक चांगला फोटो पाठव ! झालं !! परत आमची भंबेरी उडाली. त्यावेळी दवाखान्याला सुटीच नसे आणि बाहेर कुठे जाऊन फोटो काढणही जमलं नाही, मग लग्न ठरवण्याच्या वेळेस काढलेला फोटोच पाठवून दिला. कहर म्हणजे मनोगत लिहिण्यासाठीही मला वेळ काढायला जमलं नाही. शेवटी एकदाचे पुस्तक तयार झाले, त्याचा देखणा प्रकाशन सोहळा आमच्या हॉस्पिटलच्या शेजारच्या श्री. बलदवा यांच्या मोकळ्या जागेत पार पडला. कवयित्रीचा फोटो अतीच तरुण दिसतो. असे म्हणून अशोक परांजपे यांनी कोपरखळी मारली. प्रकाशन समारंभा दरम्यान काही इमर्जन्सी येऊ नये अशी प्रार्थना मनात केली, निदान कार्यक्रमापुरतं तरी व्यासपीठावर बसता आलं पाहिजे येवढाच विचार होता.
फ. मुं. शिंदे, अशोक परांजपे, डॉ. सुहास जेवळीकर यांनी सुरेख भाषणं केली. पुढे कुठे पुरस्कारासाठी वगैरे पुस्तक पाठवायचं असतं याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे कविता संग्रह इतरत्र फार पोचला नाही. १९९८ नंतर मात्र नियमित लेखन आणि पुस्तक प्रकाशन चालू राहीलं. आतापावेतो २४ स्वलिखीत पुस्तके, काही संपादने असा प्रवास झाला आहे. एक स्त्रीरोग व प्रसूति तज्ञ व लेखिका या दुहेरी भूमिकेतून वावरताना समाजाच्या सगळ्याच स्तरांचा उभा आडवा छेद मला दिसतो. अनेक सामाजिक स्तरांकडे जवळून बघता येतं. त्यामुळे भविष्यात आपल्याला नव्याने तोंड द्याव्या लागणाऱ्या प्रश्नांची चाहूलही लागते. ही धोक्याची घंटा ऐकून आपण स्वस्थ राहिलो तर आपल्या समाजाचे वस्त्र उसवून जायला वेळ लागणार नाही. मला वाटतं की आजही ‘मुलगा हवा’ या हव्यासापोटी मुलींचा जन्मदर घटता राहिला आहे. साहित्य आणि समाज यांचे नाते अतूट असल्यामुळे आज या व्यासपीठावरून हा उहापोह करणे मला संयुक्तिक वाटते. दवाखान्यात येणारे जोडपे जरा दबकतच आत येते, त्यातील बाई धीटाईनें सांगते सोनोग्राफी करायची आहे. पहिल्या दोन मुली आहेत. उघडच त्यांना गर्भलिंग निदान करायचे असते. मग मी त्यांचे बौद्धिक घेते. समाजात स्त्री – पुरुष जन्मदर कसा विषम आहे आणि भविष्यात असंख्य, उपवर तरूणांना बायका मिळणार नाहीत. त्यासाठी आपली पिढी जबाबदार असेल मुलगीच आई बापांची खरी काळजी करते म्हातारपणाची काठी आहे, वगैरे ?
खरोखरच आपल्या पिढीने अनेक मुली ‘गायब केलेल्या आहेत’. महाराष्ट्राचा सध्याचा मुलींचा जन्मदर ८२९ प्रती १००० मुले असा आहे. त्यातही ग्रामीण भागात ९१०/१००० मुले असा दर आहे. याऊलट धनदांडग्या आणि सुशिक्षित शहरी भागात हाच दर ८८५ इतका कमी होतो. हे लक्षणीय आहे की अदिवासी भागात अशी ‘मुली जन्माला न घालण्याची परंपरा’ नाही. याचा अर्थ आपण उच्चशिक्षित झालो, सुसंस्कारीत झालो, सधन झालो तसातशी आपली मानसिकता ‘रानटी’ म्हणावी अशी होत गेली आहे काय? ‘स्त्री भ्रूण हत्त्या’ करायला सांगताना घरातल्या म्हाताऱ्या कोताऱ्या आणि जाणत्या स्त्रियाही मागेपुढे पहात नाहीत. ‘काढून टाका’ हा शब्द इतका सहज उच्चारला जातो की फळ्यावर लिहिलेली ‘मुलगी’ ही अक्षरे पुसून टाकावीत! वरचेवर येणारा हा निर्वावलेपणा थक्क करणारा आहे. आणि सगळ्या भारताचे धुरीणत्व करणारा, वैचारीक प्रबोधन करणारा महाराष्ट्र यात पहिल्या पाचात आहे – म्हणजे काळ्या यादीत! माता जिजाऊ, सावित्रीबाई यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब लाजवणारी आहे. त्यामुळे समस्त स्त्रीवर्गाने यावर विचार मंथन करण्याची वेळ आलेली आहे. भविष्यात याचे दुष्परीणाम पुन्हा स्त्रियांनाच भोगावे लागणार आहेत.
माझ्या सुरुवातीच्या प्रसूतिगृहातील अनुभवांमध्ये एक विलक्षण धक्कादायक प्रसंग घडलेला मला आजही आठवतो. आधी पाच मुली झाल्यामुळे सहाव्यांदा राजस्थानातून माझ्याकडे बाळंतपणासाठी आलेली सारडा विजया अगदी घाबरून गेलेली होती. यावेळेस तरी मुलगा व्हावा या अपेक्षेने ती रात्रंदिवस चिंतेत होती, मुलगीच झाली तर नवरा दुसरं लग्न करेल अशी धास्ती, सासू नीट पहाणार नाही, टोमणे मारत राहील ही पण भिती. ‘तुमचा पायगुण चांगला लागू दे’ अशी दर तपासणीच्या वेळी इच्छा व्यक्त करत होती. शेवटी प्रसूति झाली. बाळ खूप मोठं होतं त्यामुळे टाके पडले, मी बाळाला ट्रेमध्ये घालून सिस्टरसोबत बाहेर आजीकडे पाठवले. मी टाके देऊन बाहेर आले, पाहते तो काय काकी बाळाला हातात धरून धुणं पिळल्यासारखं मुंडी मुरगाळत होत्या. मुलगीच झाली होती ना ! मग मी झटकन बाळ ताब्यात घेतलं, तिच्या मानेवर जरासे वळ आले होते. तिला पाणी मारून थापट्या मारून रडायला लावलं. आणि सुटी होईपर्यंत बाळाला सिस्टर, कामवाल्या यांच्याच ताब्यात ठेवलं पण घरी गेल्यावर? वंदना पहिलटकरीण होती. तिच्या आईने वडिलांच्या पश्चात मोठ्या कष्टाने वाढवलेली नाजूक, देखणी मुलगी, नवव्या महिन्यात माझ्याकडे आली तेव्हा पायावर सूज होती. मी तपासण्या सांगितल्या पण पैसे कशाला खर्च करा म्हणून त्या केल्या नाहीत. तसंच तपासणीलाही ती आली नाही. नंतर थेट प्रसूतिच्यावेळेला रक्तदाब खूपच वाढला इतका की झटके यायला लागले. पैशाच्या अडचणीमुळे ती सरकारी दवाखान्यात दाखल झाली. खूप झटके यायला लागले. मग डॉक्टरांनी घाटीत वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलं, संध्याकाळची वेळ नेमका धोधा पाऊस कोसळत होता. गाडी ambulance काहीच मिळेना. कशीबशी गाडी मिळाली तर पुलावरून कधी नव्हे इतकं पाणी चाललं होतं – गाडी पुढे काढता येईना. मग २० कि.मी.चा वळसा घालून दुसऱ्या रस्त्याने गाडी तिला घेऊन घाटीला गेली. पण उपाय करूनही वंदना आणि बाळ दोघांना ही वाचवता आलं नाही. खेडोपाडीच्या बायकांची ही अशी अवस्था असते. त्यामुळेच तिथे सेवा देणं हे आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटत होतं. इथे मला तपन सिन्हा यांच्या ‘आदमी और औरत’ या सिनेमाची आठवण होते. त्यात एका टपोरी खेडुताच्या भूमिकेत अमोल पालेकर आहेत. त्यात डोंगर चढून गरोदर बाईला प्रसूतिसाठी जायचे असते. या सगळ्या अनुभवांचे प्रतिबिंब लेखनात पडले नाही तरच नवल.दवाखान्यातील भेदक अनुभव माझ्या ‘हिपोक्रेटीसची शपथ’ या कादंबरीत शब्दबद्ध झाले. ग्रामीण भागात डॉक्टरांना सोसाव्या लागणाऱ्या अभावाचं, पेशंटच्या अज्ञान, दारिद्र्यामुळे बायकांच्या होणाऱ्या ससेहोलपटीचं चित्रण त्यात आहे.
ऑस्ट्रेलिया, पॅरिश मधील डिस्नेलँड येथे जाऊन आल्यानंतर तो अनुभव इथल्या सर्व थरातल्या बाळगोपाळांना मिळायला हवा, म्हणून मी ‘आदित्याची डिस्नेलँड’, ‘सफर’ आणि ‘ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध’ ही पुस्तके लिहिली, हैद्राबाद मुक्ती संग्रामावर आधारीत बालवाङ्मय उपलब्ध नाही म्हणून मग त्या विषयावरचे “अग्निशिखा कावेरी”, हे नाटक, स्वा. सेनानि श्यामराव बोधनकर यांचे चरित्र आणि मुक्ती लढ्यातील अठरा महिलांची प्रेरणादायी चरित्रे अशी पुस्तके लिहीली. वेळोवेळी केलेल्या देशांटनांनंतर त्यावर लेख लिहिले. त्यांची प्रवास वर्णनपर पुस्तके झाली.’गुजरते हुए’ या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की, एका प्रथितयश उर्दू आणि हिंदी साहित्यिकाचं चरित्र प्रथम मराठीत माझ्याकडून लिहून झालं. प्रोफेसर सादीक यांचा जन्म उज्जैनचा, काही वर्ष त्यांनी नांदेड आणि औरंगाबाद येथे वास्तव्य केले नोकरी केली. त्यानंतर दिल्ली येथील दिल्ली विद्यापीठात ते उर्दू चे प्रोफेसर झाले. उर्दू साहित्य अकादमीच सचिव पद अनेक वर्ष त्यांनी सांभाळले, उत्कृष्ट चित्रकार, सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, उत्तम वक्ते, हिंदी व उर्दू साहित्यिक अशा चतुरस्त्र व्यक्तीमहत्त्वाच्या प्रो. सादीक यांच्या चरित्राचं आता उर्दू तूनही भाषांतर होत आहे.
‘विठोबा’ सारखा एक वेगळा कविता संग्रह माझ्या हातून लिहून झाला. त्याचा इंग्रजी आणि हिंदी या भाषेत अनुवाद झालेला आहे. त्यात नेहमीप्रमाणे भक्ती आणि समर्पणाच्या कविता नाहीत तर व्यंगात्म कविता आहेत. समाजातल्या अन्याया विषयी विठोबाशी भांडण, वादावादी करत त्याला प्रश्न ही विचारले आहेत. एकप्रकारे स्वतःचाच शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.जागतीक आणि भारतीय साहित्यातील घडामोडीकडे मराठी लेखिकांनी लक्ष ठेवून असलं पाहिजे. भारतीय स्त्रिया कशा व्यक्त होत आहेत हे आपल्याला माहीत असल पाहिजे. ‘साहेबपुरा की बारीश’ या अनुराधा शर्मा पुजारी या आसामी लेखिकेने लिहिलेल्या कादंबरीत परदेशस्थ नवऱ्याच्या सुखी जीवनाला त्यागून दुर्गम खेड्यामध्ये रहायला जाणारी नायिका आहे. त्यानिमित्त्याने एका स्वयंसेवी संस्थेतलं जीवन, त्यांची कार्यशैली त्यांचे प्रश्न याचं चित्रण खूप बारकाव्यांनिशी येतं. कथानकाच्या ओघात उच्च सांस्कृतीक आसामी परंपरा, समाज जीवन यांचं चित्रण लेखिका घडवते. माणूस प्रगल्भ करण्याची तळमळ लेखनातल्या चितनातून प्रकट होते.
लेखकाचे घर या लेखमालेसाठी मी देशविदेशातील लेखकांच्या घरांना भेटी देण्याचा घाट घातला. ‘लिओ टॉलस्टॉय’ या माझ्या गुरुस्थानी असलेल्या लेखकाचे घर अतिशय नेटकेपणाने म्युझियन म्हणून पर्यकांसाठी खुले केले गेले आहे. रशियन सरकारने ते अतिशय उत्तमरीत्या जतन केलेले आहे. आपल्याकडे त्याबाबतीत एकुणच अनास्था आहे. परत आल्यावर मग भारतात लेखकांच्या घरांचा धांडोळा घेतला खरं तर मला लेखिकांचा समावेश प्रामुख्याने करायचा होता. महाश्वेतादेवी, अन्नपूर्णादेवी, इंदिरा गोस्वामी या लेखिकांच्या घराविषयी काहीच माहिती मिळाली नाही. त्यांच्या नातेवाईकांचे संपर्क क्रमांक मिळाले नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही केवळ चार लेखिकांच्या घरी मी भेट देवू शकले. त्यातल्या मल्लीका सेनगुप्ता या दिवंगत होत्या. बंगाली कविता लिहिणारी ही कवयित्री इतकी बंडखोर होती की तिच्या कविता वाचून मला रात्री झोप आली नाही. त्यांचे पती सुबोध सरकार हे सुद्धा प्रसिद्ध बंगाली कवी. व्होल्गा या स्त्रीवादी लेखिकेचं साहित्य वाचून भारतीय साहित्यातील स्त्रीवाद काय असतो? ते तेलुगू समाजाला कळलं. प्रत्यक्ष आयुष्यातही चळवळीतलं जीवन त्या जगल्या. आयुष्यभर त्यांनी स्वतःच्या तत्त्वांबरोबर तडजोड केली नाही. स्त्रीयांसाठी त्यांनी ‘अस्मिता’ ही एक स्वयंसेवी संस्था चालवली. दूरचित्रनिर्मिती, लेखन आणि प्रत्यक्ष चळवळ या सर्वांमधून स्त्रीच्या अन्यायाला वाचा फोडणे हेच त्यांनी अविरतेपणे केलं अजूनही करत आहेत. लेखकाचे घर मधल्या ज्ञानपीठ विजेत्या लेखिका प्रतिभाराय यांनी आपल्या लेखनातून भारतीय पुराणातील व्यक्तिरेखांना वेगळ्या स्वरूपात उजागर केलं, ‘याज्ञसेनी’ कोणार्क मंदिराच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी ‘शिलापद्म’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या.
ओदिशातील दुर्गम आदिवासी भागात जाऊन त्यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यावर आधारीत ‘आदिभूमी’ ही बोडो आदीवासींवरची कादंबरी खूप वेगळी आहे. MBBS ला प्रवेश मिळाल्यानंतरही त्या तिथून पळून गेल्या. ‘मला फक्त माझ्या सारखंच व्हायचंय’ ही त्यांची तेव्हापासूनची भूमिका होती. या पुस्तकाच्या निमित्त्याने मला भारतातल्या इतर भाषिक लेखक लेखिकांच्या साहित्याचा धांडोळा घेता आला. एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या लेखनात विसाव्या शतकाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली दिसते.
स्त्रीचे शोषण, अल्पवयीन मुलींवर होत असलेले अत्याचार सामूहिक बलात्कारांचे वाढते प्रमाण याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या साहित्यात उमटत आहे.कोरोना काळात जगात खूप उलथापालथ झाली. लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आयुष्याचे खरे तत्त्व काय आहे, त्याची जाणीव झाली. केवळ दिखावा आणि भपका हेच आयुष्य नाही खऱ्या प्रतिष्ठेचे लक्षण नाही हे कळत गेले. आपली आपली म्हणवणारी माणसं दुरावली आणि नात्यागोत्यात नसलेल्यांनी आधार दिला. या सर्वाचं प्रतिबिंब कथा, कवितांमधून उमटलं आहे.समाजातली नीतीमुल्ये झपाट्याने बदलत चालली आहे. आधी असं म्हणत होते की बारा वर्षांनी पिढी बदलते. परंतु आता हे अंतर झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या युगातल्या नितीमूल्यांशी जमवून घेणं जुन्या पिढीला अवघड जात आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, खुल्या लैंगिकतेने निर्माण होणारे प्रश्न, ट्रान्सजेंडरर्स चे प्रश्न हे सारे स्त्रियांच्या साहित्यात उमटत आहे. ही अशादायक गोष्ट आहे. परंतु राजकारण, समाजकारण यांच्या विषयी स्त्रिया पाहिजे त्या प्रमाणात लिहीत नाहीत.
स्टँडहाल हा फ्रेंच साहित्यिक म्हणतो, ‘Politics in a literary work are a pistol short in the middle of a concert a crude affair though impossible to ignore.’एम.बी.बी.एस. ला प्रवेश मिळाल्यानंतरचा पहिला दिवस बहुधा सर्वच डॉक्टरांना आठवतो. कारण मृतदेहांच्या विच्छेदनासाठी असलेल्या मोठ्या हॉलमध्ये अनेक मृतदेह ठेवलेले असतात. Formalin चा उग्र वास वातावरणात भरुन राहिलेला असतो. हे सगळे पहिल्या प्रथम पाहिल्यावर अनेकांना तिथून पळ काढावा वाटतो. मला लख्ख आठवतंय. आमचे शरीरशास्त्राचे सगळे गुरुवर्य आमच्यासोबत आले होते. “या देहांमुळे तुम्हाला शरीशास्त्राचं ज्ञान मिळणार आहे. त्यांच्या जोरावरच तुमच्या डॉक्टरकीचा ज्ञानाचा डोलारा उभा राहणार आहे. त्यांच्या प्रती प्रथम आपण कृतज्ञता अर्पण करूया. Dissection करताना या देहांचा अनादर होईल असं काही तुम्ही करू नका. तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.” त्यानंतर आम्हीही या लक्ष्मणरेषेचं उल्लंघन कधी केल्याचं मला स्मरत नाही.’माती असशी मातीत मिळशी’ हे वाक्य ऐकूनच सरांनी आमच्या शिक्षणाची सुरूवात केली होती आणि आता एका महिलेने अतिशय घृणास्पद रीतीने मृतदेहांच्या अवयवां कर विनोद करणे, त्या विनोदावर सर्व सभागृहाने खो खो हसणे हे सगळं घृणास्पद आहे. लज्जास्पद आहे. आपल्या समाजाच्या अभिरूची कुठे चाललीय? यावर हा धोक्याचा इशारा आहे.जग झपाट्याने बदलत चालले आहे. AI चा धोका हा हा म्हणता नजीक येऊन ठेपला आहे. मिया बॅलार्ड (Mia Bellard) या लेखिकेची ‘शाय गर्ल’ (Shy Girl) नावाची कादंबरी युएसए आणि युकेतून प्रकाशकाने बाजारातून काढून घेतली कारण त्या लेखिकेने AI च्या मदतीने कादंबरी लिहिली होती. तोवर कादंबरीच्या २००० प्रती विकल्या गेलेल्या होत्या. ठिसूळ कथानक, विचित्र वाक्प्रचार आणि बोजड वाक्ये यामुळे मोठ्या प्रमाणावर वाचकांकडून त्यावर टीका झाली. काय खरं? आणि काय खोटं? हे कळणं अवघड होत चाललं आहे. त्यामुळे सच्चा जीवनानुभव असेल तर साहित्यकृती उत्तम होईल अन्यथा सत्वहीन साहित्याची निर्मिती करत राहील. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला असता लिहिणाऱ्या स्त्रियांची संख्या तुलनेने कमी होती असे निदर्शनास येते.
प्राचीन काळी, जेव्हा स्त्रीस्वातंत्र्य किंवा स्त्रीवाद हे शब्दसुद्धा जन्माला यायचे होते, तेव्हा स्त्रियांची परिस्थिती किती दारूण असेल याची आपल्याला कल्पनासुद्धा करता येणे अशक्य आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती’ अशा पोलादी पकडीच्या बंधनातून अध्ययन, ज्ञानार्जन करण्यास कुठेच वाव नव्हता. शूद्र आणि स्त्री यांना ज्ञानी होण्याचा मार्ग नाकारल्यामुळे आपसूकच पुरुष आणि संस्कृतिरक्षकांसाठी कायम गुलाम मिळण्याची सोय झाली. ज्ञानाचा प्रकाश नाकारल्यानंतर कायम अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांनी साहित्यनिर्मिती करणे कठीण होते. तरीही ओव्या, लोकगीते या माध्यमांतून त्यांची प्रतिभा आपला अंतस्वर उमटवीत राहिली. त्यांच्या प्रतिभेचे मनाची तार छेडणारे आणि जिवाला चटका लावणारे अविष्कार पाहिल्यानंतर स्तिमीत व्हायला होते.
साहित्यनिर्मितीसाठी लागणारा अवकाश चोवीस तासांच्या कामातून मिळणे किती अशक्यप्राय असेल ते आजच्या स्त्रीच्या दिनचर्येकडे पाहूनही समजू शकेल. साहित्यनिर्मितीनंतरची पुढची प्रक्रिया साहित्यप्रकाशन आणि समाजात रूजण्याची. पुरुषप्रधान संस्कृतीत हे किती अवघड असेल (आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही.) याची केवळ कल्पना करा. या पार्श्वभूमीवर महदंबा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई तसेच इतर संत कवयित्री आणि बहिणाबाई यांच्या काव्यरचेनेचे महत्त्व आत्यंतिक आहे हे सांगायला नको. पिढ्यानपिढ्यांच्या शोषणाला कुठेतरी उद्गार मिळणे आवश्यकच असते. भुईतून वर येणाऱ्या लसलसत्या कोंबासारखा तो कधीतरी प्रकटतोच. परंतु खरेच हा स्वर फक्त बंडखोरीचा आणि वेदनेचा आहे? पूर्वसूरींप्रमाणेच अनेक साहित्य कृती समर्पणाच्या पातळीवरच रेंगाळते. शारीर पातळीवरचे रोमान्सचे किंवा प्रणयाचे अभिव्यक्तीकरण आधुनिक कवयित्रींच्या कवितेत कमीच आढळते. स्त्रीची प्रेमभावना ही शारीर प्रेमात परिणत होण्याऐवजी मुख्यत्वे समर्पणातच आपले पूर्णत्व शोधते, हेच बहुधा त्याचे कारण असावे.
पुरुषांविषयीचा तिरस्कार, राग, अन्यायाची भावना या दुसऱ्या टोकाच्या भावना व्यक्त करणाऱ्या कविताही अलीकडे लिहिल्या जात आहेत. पुरुष म्हणजे स्त्रीचा शोषणकर्ता, तिच्या प्रगतीतला अडसर, तिच्या पायात परंपरेच्या बेड्या ठोकणारा तथाकथित संस्कतिरक्षक अशा अर्थाच्या या कविता. स्त्रीवादाची चर्चा करताना या टोकाच्या भूमिकेचाच विचार नेहमी समीक्षक करताना दिसतात. अशा भूमिकांचे समर्थन करून स्त्रीवादाच्या ठराविक व साचेबद्ध चौकटीत परत स्त्रीला अडकवण्याचेच हे प्रयोजन आहे की काय? अशीही शंका येते. त्यामुळे कुठल्याही इझममध्ये न अडकता स्वच्छ, निकोप भूमिकेतून स्त्रीवादाची पाठराखण करणे, नव्याने त्याची मांडामांड करणे, कुठलेही जोखड मानेवर न घेता माणूस म्हणून नव्या शक्यता तपासणे हे नव्या लेखिकांसमोरचे खरे आव्हान आहे. जुन्या परंपरांना आणि मूल्यविचारांना मोडीत काढताना केवळ पाश्चात्य विचारसरणी आणि जीवनपद्धती यांचेच अंधानुकरण होण्याचा धोका जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे वाढतो आहे. जुनी चौकट तर मोडीत काढली आहे; परंतु नव्या निर्माणाची, बांधणीची काहीच व्यवस्था किंवा कोणताच आराखडा नाही अशा भरकटलेल्या अवस्थेत आपली समाजव्यवस्था आलेली आहे. या व्यवस्थेची पुनर्बाधणी करण्यासाठी विचारवंतांनी दिशादिग्दर्शन करणे ही काळाची गरज आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकामुळे केवळ स्वार्थ वाढीला लागला असून सहचर्य, बंधुभाव, सहिष्णुता हे शब्द केवळ शब्दकोषातच सापडतात की काय? अशी भीती वाटते. मी, तू, आपण यातील ‘आपण’ ही संकल्पनाच लयाला जाऊन केवळ ‘मी’ सगळ्या जीवनावर आणि जीवन व्यवहारावर राज्य करतो आहे. ‘मी’साठीच सर्व जीवनव्यापार उरला आहे. या पराकोटीच्या व्यक्तिकेंद्री व इहवादी जीवनपद्धतीमुळे अनेक सामाजिक व मनोवैज्ञानिक समस्या उभ्या राहाणार आहेत. यात मुलांच्या संगोपणाच्या समस्या, त्यांच्यात निर्माण होणाऱ्या मानसिक विकृती, व्यसनाधिनता या सगळ्या समस्या अनुस्यूत आहेत. समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि विचारवंत या साऱ्यांनी मिळून जर समाजाची काही घुसळण केली तर हे आव्हान आपल्याला पेलता येईल. लेखणीने परिवर्तन होऊ शकते किंवा नाही असे कोरडे परिसंवाद घेण्यापेक्षा काही करण्याची संधी हाती आली तर ती आपण दवडता कामा नये. आधुनिक कथा, कादंबरी व कविता यांमधून समाजाच्या तुटलेपणाचे, चौकटीच्या आणि परंपरेच्या मोडतोडीचे प्रतिबिंब उमटते आहे.कादंबरीलेखनाचा विचार करताना लक्षात आली ती गोष्ट वाचकांच्या निदर्शनास आणून देणे मला आवश्यक वाटते. आधुनिक कादंबरीलेखिका या अभिधानाला पात्र होणाऱ्या लेखिका शोधताना असे लक्षात आले की, बहुशः कादंबरीलेखनाकडे स्त्रिया त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातच वळतात.
कथा, कविता अशा सुरुवातीच्या लेखनानंतर कादंबरीलेखनाला हात घातला जातो. एक तर कादंबरीलेखनाचा पट, विस्तार आणि आवाका मोठा असल्यामुळे तो सुरुवातीलाच झेपेल याची खात्री नसते. लेखिकेला असलेली व्यवधाने रोजची गृहकर्तव्ये, मुलांच्या जबाबदाऱ्या, नवरा, पै-पाहुणा यांची उस्तवार यातून कादंबरीलेखनाचा सलग धागा पकडून ठेवणे अवघडच असते. आजकाल बाहेरच्या जबाबदाऱ्या, नोकरी, आभासी मिडीया यामुळे उरलेला वेळही लेखनासाठी देता येईल याची काहीएक खात्री नसते. शिवाय कादंबरी लेखनासाठी आवश्यक असणारी परिपक्वता व्यापक जीवनानुभव आणि चिंतन सर्वच लेखिकांमध्ये आढळत नाही. आपल्या अनुभवविश्वाचा परीघ विस्तारणे, आकलनाच्या मर्यादा वाढवत नेणे यासाठी नव्या लेखिका व कवयित्रींनी परिश्रम घेणे आवश्यक आहे.
त्यानंतरच ‘मराठीपणाच्या’ मर्यादा ओलांडून भारतीय व त्यानंतर जागतिक क्षितिजावर झळकण्याची काही शक्यता भविष्यात निर्माण होईल.नाट्यलेखन हा स्त्रियांचा प्रांत नाही, असा जणुकाही अलिखित नियम होता; परंतु आता याही प्रांतात आपला ठसा उमटवण्यास मनस्विनी लता यांच्यासारख्या लेखिका सिद्ध झालेल्या आहेत. स्त्रिया नाट्यलेखन का करीत नाहीत, हा प्रश्न मला पडायचा. आता त्याची थोडीफार उत्तरं मिळालेली असली तरी वैषम्यच अधिक वाटते. कारण नाट्यलेखनाच्या आपल्या क्षमतांचा वापर स्त्रियांकडून केला जात नाही हे उत्तर स्वीकारणे अवघड जाते. अर्थात नाटक हा प्रकार सादरीकरण केल्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. नुसते नाट्यसंहितालेखन या प्रकाराला तसा फारसा अर्थ नाही. आणि ‘नाटक करणे’, त्याचे दिग्दर्शन-निर्मिती करणे, प्रयोग लावणे, जाहिरातव्यवस्था करणे ही सगळी साखळी त्यात अपेक्षित आहे आणि ही साखळी बहुताशः पुरुषांच्याच हातात असल्यामुळे या व्यावहारिक कौशल्याचा कस बघणाऱ्या आणि बेभरवशाच्या क्षेत्राकडे स्त्रिया कमी प्रमाणात वळाल्या असाव्यात. ‘माझ्यासाठी एक नाटक लिहून दे’ असे जेव्हा एखादा निर्माता सांगतो तेव्हा त्या नाटकाला व्यावसायिक यश लाभेल असे काय रसायन त्याला हवं आहे ते लेखकाला माहिती आहे याची त्याला खात्री असते. तसेच लेखकाच्या गुणवत्तेची आणि क्षमतेचीही त्याला संपूर्ण कल्पना असते. प्रयोगिक नाटकांच्या बाबतीत तर ही नाट्यलेखनाची प्रक्रिया अजूनच गुंतागुंतीची होत जाते. दूरदर्शन मालिकांसाठी पटकथालेखन करणाऱ्या लेखिकांची संख्या वाढते आहे. तरीही नाट्य लेखिका म्हणून मनस्विनी लता रवींद्र, उषा परब, सुनंदा साठे, मीना देशपांडे, सुनंदा गोरे, विद्या जोशी, ऊर्मिला चाकूरकर ही नावे ठळकपणे समोर येतात. भविष्यात नाट्यलेखनावरही स्त्रिया आपली नाममुद्रा उमटवतील अशी आशा करणे अयोग्य ठरणार नाही.
समीक्षात्मक लिखाणात स्त्रिया मागे नाहीत हे नुस्ती समीक्षात्मक ग्रंथांच्या सूचीवर नजर टाकली तरी लक्षात येते. मराठी वाचकांसाठी स्त्रीवादाची मांडणी करण्यात अश्विनी धोंगडे यांनी पहिले पाऊल उचलले तर तौलनिक समीक्षेच्या प्रांतात सुलभा हेर्लेकरांनी. संतवाङ्मय, नाट्यवाङ्मय, कादंबरी, कथा, कविता, दलित वाङ्मय इत्यादी क्षेत्रांतही स्त्रियांचे समीक्षालेखन उठून दिसते. खरे संत जनाबाईंपासून स्त्रीमुक्तीचे वेध लागलेले होते हे खरे आहे. या संदर्भातील ओव्या, स्त्रीगीते, म्हणी, वाक्प्रचार यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यात स्त्रीवादी आशय चमकून जातो. त्या दृष्टीनेही स्त्रीवाद ही केवळ पाश्चात्यांची देणगी नाही. ‘साप म्हणून नये धाकला नवरा म्हणू नये आपला’ यासारख्या वाक्प्रचारांतून हे प्रत्ययास येतेच.शेवटी साहित्यिक म्हणून वेगळे आत्मभान, वेगळी दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय होणारी साहित्यनिर्मिती सकस असणार नाही हे स्त्रियांइतकेच पुरुषांनाही लागू आहे. अभ्यासपूर्ण संशोधन करून लिहिते होणे, काळाच्या पुढची दृष्टी असणे ही श्रेष्ठ साहित्यिकाची लक्षणे स्त्री-पुरुष भेदाच्या पुढे जाऊनच तपासावी लागतात यात शंका नाही!पुनः एकदा सर्वांचे आभार.
